फळबागेतील गवत, वाळलेल्या, रोगग्रस्त फांद्या काढून बागेची साफसफाईची कामे पूर्ण करून घ्यावीत. बाष्पीभवनात वाढ संभवत असल्याने बागायती फळबाग, फळबाग रोपवाटिका आणि भाजीपाला पिकांना पाणी देण्याची व्यवस्था करावी. खरीप भात हवामान अंदाजानुसार भात पिकाच्या कापणीस योग्य वातावरण आहे. तयार भात पिकाची कापणी व मळणी पूर्ण करून घ्यावी. मळणी केलेले धान्य २ ते ३ उन्हे देऊन वाळवून घ्यावे. त्याची सुरक्षित आणि कोरड्या जागी साठवणूक करावी. नागली, वरई
तयार नागली, वरई पिकांची कापणी व मळणी पूर्ण करून घ्यावी. मळणी केलेले धान्य २ ते ३ उन्हे देऊन सुरक्षित आणि कोरड्या जागी साठवणूक करावी. जमिनीच्या अंग ओल्यावर विनामशागत कुळीथ पिकाची पेरणी करता येते. भात कापणीनंतर जमीन वाफसा स्थितीत आल्यावर शेतातील तणांचे अनिवडक तणनाशकाचा वापर करून नियंत्रण करावे. त्यानंतर एक ते दोन दिवसांनी कोणतीही मशागत न करता कुळथाची टोकण पद्धतीने दोन ओळींत ३० सें. मी. अंतर ठेवून पेरणी करावी. पेरणी करतेवेळी बियाण्याशेजारी छिद्र करून त्यामध्ये दाणेदार मिश्रखत (नत्र, स्फुरद, पालाश १५-१५-१५) गुंठ्यास एक किलो या प्रमाणे द्यावे. जमिनीची मशागत करून कुळीथ पिकाची लागवड करणार असल्यास, भात कापणीनंतर जमिनीत वाफसा असताना नांगरणी करावी. जमीन समपातळीत आणून कुळीथ बियाण्याची दोन ओळींत ३० सें. मी. अंतर ठेवून पेरणी करावी. पेरणीपूर्वी ५४० ग्रॅम युरिया, ३ किलो सिंगल सुपर फॉस्फेट १ किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति गुंठा खताची मात्रा ओळीत सरीमध्ये द्यावी. पेरणीपूर्वी प्रती किलो बियाण्यास २.५ ग्रॅम थायरम प्रक्रिया करावी. त्यानंतर २५ ग्रॅम रायझोबिअम प्रति किलो या प्रमाणे जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करून बियाणे सावलीत सुकवावे. रायझोबिअमची प्रक्रिया केल्यामुळे मुळांवरील गाठींची संख्या वाढून नत्राचे स्थिरीकरण जास्त प्रमाणात होते. निरभ्र आकाश आणि वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनात वाढ संभवते. नारळ बागेस ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी. नारळाच्या मोठ्या झाडास ठिबक सिंचनाद्वारे पाणी द्यावयाचे असल्यास प्रति दिन ३० लिटर पाणी द्यावे. यासाठी माडाच्या खोडापासून १.२५ मीटर अंतरावर गोलाकार लॅटरल पाइप टाकून सहा ड्रीपरच्या साह्याने पाणी द्यावे. आळ्यामध्ये ओलावा टिकविण्यासाठी नारळाच्या शेंड्या पुराव्यात आणि झावळ्यांचे आच्छादन करावे. निरभ्र आकाश आणि वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनात वाढ संभवते. सुपारी बागेस ६ ते ८ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी. काकडी, पडवळ, दोडका, दुधीभोपळा, कारली या वेलवर्गीय भाजीपाला पिकांची लागवड करावी. लागवड आळे पद्धतीने १.५ बाय १ मीटर अंतरावर करावी. लागवड करताना प्रत्येक आळ्याला २ किलो शेणखत व ५० ते ६० ग्रॅम मिश्रखत (१५-१५-१५) मातीत मिसळून द्यावे. वाल भाजीपाला पिकाची लागवड करण्यासाठी भात कापणीनंतर जमिनी वाफसा स्थितीत आल्यावर नांगरट करावी. त्यानंतर एकरी ४ ते ६ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळावे. त्यानंतर ३ बाय ३ मीटर आकाराचे सपाट वाफे तयार करावेत. पेरणी ६० बाय ६० सें. मी. अंतरावर २ ते ३ बियाणे टाकून करावी. पेरणीच्या वेळेस प्रत्येक वाफ्यास ६० ग्रॅम युरिया, ३०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट आणि ४५ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. पेरणीनंतर हलके पाणी द्यावे. काजूच्या पालवीवर ढेकण्या (टी मोस्किटो बग) आणि थ्रीप्स किडीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. या किडींच्या नियंत्रणासाठी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.६ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. ( टीप : कीटकनाशकास लेबल क्लेम नाहीत, मात्र ॲग्रेस्को शिफारस आहे.) काजूचे उत्पादन वाढविण्यासाठी इथ्रेल या संजीवकाची १० पीपीएम या प्रमाणे पहिली फवारणी पालवी आल्यावर करावी. संपर्कः ०२३५८- २८२३८७ डॉ. विजय मोरे, ९४२२३७४००१ (ग्रामीण कृषी मौसम सेवा व कृषी विद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)