शेतीसोबत संलग्न व्यवसाय म्हणून वनौषधी वनस्पतींची लागवड केली जाते. लागवडीसाठी लागणारी रोपे, बियाणे किंवा लागवडीयोग्य भाग रोपवाटिकेमध्ये तयार केले जातात. रोपवाटिका साधारणपणे वनौषधींचे लागवड क्षेत्र जास्त असणाऱ्या क्षेत्रापासून मध्यवर्ती ठिकाणी असावी. शतावरी जमीन व हवामान
शतावरीची लागवड विविध प्रकारच्या जमिनीत करता येते. मध्यम काळी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी व भुसभुशीत जमिनीत लागवड केल्यास उत्तम प्रतीच्या मुळ्यांचे उत्पादन मिळते. लागवडीसाठी बहुवर्षीय तण असलेल्या जमिनीची निवड करू नये. कारण बहुवर्षीय तणांची मुळे जमिनीत पसरत जातात. आणि शतावरीच्या मुळ्यात गुंततात व कंद काढणे कठीण जाते. त्यामुळे मुळ्यांची प्रत खराब होते. पिकास उष्ण व कोरडे हवामान अनुकूल असते. अति थंडी किंवा अति पाऊस या पिकाला मानवत नाही. अशा हवामानात हे पीक सुप्तावस्थेत जाते. परंतु हवामान अनुकूल झाल्यावर पुन्हा फुटवे फुटतात. पावसाळा सुरू होण्यापूर्वी जमीन चांगली नांगरून, वखरून भुसभुशीत करावी. पेरणीपूर्वी जमिनीत चांगले कुजलेले शेणखत हेक्टरी १० टन या प्रमाणात मिसळावे. लागवडीकरिता हेक्टरी १ किलो बियाणे पुरेसे होते. बियांपासून लागवड करताना ६० सेंमी अंतरावर बी टोकून पेरणी करावी. एका ठिकाणी २ ते ३ बिया पेराव्यात. जमिनीच्या उतारानुसार पाण्याचे दांड काढावेत शतावरीची लागवड रोपांपासून देखील करता येते. रोपांपासून लागवड करताना मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात गादीवाफ्यावर बी पेरून प्रथम रोपे तयार करावीत. रोपांची लागवड जुलै महिन्यात ९० बाय ६० सेंमी अंतरावर सरी-वरंब्यावर करावी. अडुळसा पीक सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येते. या पिकास उबदार, दमट हवामान काही प्रमाणात सावली अनुकूल असते. लागवडीपूर्वी मे महिन्यात जमीन नांगरून भुसभुशीत करावी. लागवड बियांपासून व फांदी कलमापासून करता येते. बियांपासून लागवड करताना ६० बाय १५ सेंमी अंतरावर बिया पेराव्यात. फांदीपासून लागवड करताना उन्हाळ्यात कलमे तयार करून रोपे तयार करावीत. रोपे दीड महिन्यांची झाल्यावर लागवडीसाठी वापरावीत. ब्राह्मीची वाढ पाणथळ जमिनीत उपोष्ण कटिबंध हवामानात चांगली होते. या पिकांस ३० ते ४० सेल्सिअस तापमान आणि ६०-६५ टक्के आर्द्रता चांगली मानवते. लागवड साधारणपणे जून ते जुलै महिन्यामध्ये केली जाते. या पिकाची लागवड खोडापासून केली जाते. लागवडीपूर्वी जमीन चांगली भुसभुशीत करून घ्यावी. लागवडीसाठी ६ ते ८ इंच लांबीचे छाट कलम तयार करावीत. छाट कलमांची लागवड २० बाय २० सेंमी अंतरावर २ इंच खोल जमिनीत करावी. लागवडीनंतर जमिनीत पाणी साचून राहणार नाही, परंतु जमीन ओलसर राहील याची काळजी घ्यावी. उष्ण व दमट व भरपूर सूर्यप्रकाश असलेले हवामान असलेल्या ठिकाणी बेल वृक्षाची चांगली वाढ होते. लागवडीसाठी चांगल्या गाळाची, रेताड मातीची जमीन योग्य असते. मुरमाड जमिनीतही लागवड करता येते. जमिनीत ६० बाय ६० बाय ६० सेंमी आकाराचे खड्डे ६ बाय ६ मीटर अंतरावर तयार करून घ्यावेत. माती व शेणखताचे मिश्रण ६ किलो याप्रमाणे खड्डे भरावेत. जून ते जुलै महिन्यात बियांची पेरणी करावी. रोपांच्या वाढीचा वेग अत्यंत कमी असल्याने रोपे एका वर्षापर्यंत रोपवाटिकेत वाढू द्यावीत. प्रत्येक महिन्यानंतर २-३ किलो शेणखत किंवा कंपोस्ट खत प्रत्येक खड्ड्यात मातीत मिसळावे. - वैशाली मिसाळ, ८७८८३६२१८७ (कृषी हवामानशास्त्र विभाग, आदित्य कृषी महाविद्यालय, बीड)