
Soil Management : कोणत्याही राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात भारी आणि काळ्या जमिनीचे प्रमाण खूप जास्त आहे. आणि अशा भारी, काळ्या जमिनीमध्येच क्षार आणि पाण्याच प्रमाण वाढून सुपीक जमिनी क्षारपड-पाणथळ होऊन नापिक होण्याच प्रमाण वाढल आहे. ही समस्या प्रामुख्याने ऊस पट्ट्यात दिसून येते. अशी क्षारपड जमीन भूमिगत सच्छिद्र पाइप निचरा पद्धतीने सुधारता येते.
पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे, नगर आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड आणि विदर्भात वर्धा, अमरावती, अकोला जिल्ह्यात क्षारपड जमिनीच प्रमाण वाढत आहे. क्षारपड जमिनीमुळे ऊस उत्पादन हेक्टरी ५० ते ६० टनांपर्यंत कमी झालेल आहे. त्यामुळे अशा जमिनीत पीक घेणँ परवडणार नाही.
या क्षारपड जमिनी सुधारण्यासाठी सांगली जिल्ह्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या कसबे डिग्रज येथील कृषी संशोधन केंद्राने प्रयत्न सुरु केले. या प्रयत्नातून मध्यम ते भारी, काळ्या, पाणथळ आणि क्षारपड जमिनीची सुधारणा करण्यासाठी भूमिगत निचरा पद्धत, सेंद्रिय आणि रासायनिक भूसारकांचा एकात्मिक वापर फायदेशीर असल्याच आढळलं. यापैकी भूमिगत सच्छिद्र पाइप निचरा पद्धत फायदेशिर ठरत आहे.
काय आहे भूमिगत सच्छिद्र पाइप निचरा तंत्रज्ञान?
भूमिगत सच्छिद्र पाइप निचरा तंत्रज्ञान हे खूप काही अवघड अशी पद्धत नाही. या पद्धतीत क्षारपड जमिनीत सच्छिद्र पाईप गाडून या पाईपवाटे शेतातील क्षारयुक्त पाणी गोळा करुन शेताबाहेर काढल जात. त्यासाठी सुरुवातीला क्षारपड जमिनीत ०.९ ते दीड मीटर खोलीचे चर काढले जातात. त्यात च्छीद्र असलेले पीव्हीसी निचरा पाइप गाडले जातात. पाईप गाडण्यापुर्वी या पाईपभोवती गाळण म्हणजेच फिल्टर म्हणून ७.५ ते १० सेंमी जाडीचा कराळा किंवा चाळ वाळूचा थर किंवा सिंथेटिक फिल्टर गुंडाळून जमिनीमध्ये विशिष्ट उतार देऊन गाडले जातात. या मुख्य पाईपला लॅटरल पाइप, कलेक्टर पाइप, सबमेन पाइप जोडले जातात.
पिकांच्या मुळांजवळचे क्षार आणि जास्तीचे पाणी मातीतून पाझरून पहिल्यांदा लॅटरल पाइपमध्ये येईल अशा पद्धतीने च्छीद्र असलेले लॅटरल पाइप, कलेक्टर पाइप, सबमेन पाइप आणि मेन पाइप एकमेकांना जोडावेत. लॅटरल पाइपमधून वाहत येणारे पाणी आणि क्षार कलेक्टर पाइपमध्ये येऊन कलेक्टर पाइपमधून सबमेन आणि मेन पाइपवाटे शेवटी नैसर्गिक ओढा, नाला किंवा नदीमध्ये सोडावे. ज्या ठिकाणी नदी, नाले ओढे नसतील अशाठिकाणी मेन पाईप मधून निचरा होणारे पाणी विहीर किंवा तलावामध्ये साठवून उपसा करून शेताबाहेर काढले पाहिजे.
किती खर्च येतो?
या भूमिगत सच्छिद्र पाइप निचरा पद्धतीसाठी हेक्टरी दीड ते अडीच लाख रुपये खर्च येतो. हा खर्च जास्त वाटत असला तरी एकदाच अशी व्यवस्था करुन ठेवली तर पुढे कमीत कमी २५ वर्षापर्यंत फायदा होत राहतो. त्यामुळे या पद्धतीसाठी प्रति हेक्टरी प्रति वर्ष ६ ते १० हजार रुपये खर्च येतो.
---------
माहिती आणि संशोधन- कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, जि. सांगली
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.