Yavatmal News : जिल्ह्यात जवळपास ६६ पाणीसाठवण (Water Stock) बंधाऱ्यांची कामे प्रस्तावित करण्यात आली. यातील ४८ कामे मर्जीतील कंत्राटदाराला देण्याचा घाट घातला जात आहे.
त्यामुळे सुरू असलेली निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. यासाठी खासदारांच्या अर्ध शासकीय पत्राचा संदर्भ देण्यात आला आहे.
यवतमाळ, राळेगाव, कळंब, बाभूळगाव, पुसद या तालुक्यांतील ४८ साठवण तलावांची कामे प्रस्तावित होती. त्यासाठी प्रत्येक तालुकानिहाय प्रस्तावित कामांची स्वतंत्र निविदा प्रक्रिया करण्यात आली.
संपूर्ण जिल्ह्यातील ६६ कामांसाठी याच पद्धतीने निविदा बोलविण्यात आल्या होत्या. मात्र, नेर, दारव्हा, दिग्रस हे तीन तालुके वगळून उर्वरित पाच तालुक्यांतील निविदा प्रक्रिया रद्द झाल्या.
यासाठी खासदारांच्या अर्ध शासकीय पत्रानुसार वरिष्ठ कार्यालयाने ई-निविदेसंदर्भात दिलेल्या आदेशावरून ही निविदा रद्द करीत असल्याचे नमूद करण्यात आले.
नियमानुसार कोणत्याही लोकप्रतिनिधीला निविदा प्रक्रियेत थेट हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. मात्र, मृद व जलसंधारण विभागात खासदाराने दहा मार्च रोजी दिलेल्या अर्ध शासकीय पत्राचा हवाला देऊन ई-निविदा प्रक्रिया रद्द करीत असल्याचे स्पष्ट केले आहे.
या आदेशात यवतमाळ व कळंब तालुक्यातील सात कोटींच्या कामांची निविदा रद्द झाली आहे. त्यामध्ये यवतमाळ तालुक्यातील कापरा, पारडी नाका, कळंब तालुक्यातील पार्डी नस्करी, पिंपळगाव होरे, पिंपळशेंडा येथील तीन कामे, शिवपुरी येथील दोन कामे, आंतरगाव या गावातील साठवण बंधाऱ्यांचा समावेश होता.
सात कोटी रुपये किमतीची स्वतंत्र निविदा प्रत्येक कामासाठी बोलाविण्यात आली होती. अचानक अर्ध शासकीय पत्राचा संदर्भ देत जलसंधारण विभागाने निविदा रद्द केल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.