Womens Self Help Group : महिला बचत गट करतील गावाला गरिबीमुक्त

Bachat Gat : ग्रामपंचायतीनी गावातील गरीब कुटुंबांना एकत्र घेऊन विकास आराखडा, त्याचे नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी केल्यास गरिबी दूर निश्‍चित होऊ शकते. यासाठी गावातील स्वयंसाह्यता गटांना सोबत घेणे आवश्यक आहे.
Womens Self Help Group
Womens Self Help GroupAgrowon

डॉ. सुमंत पांडे
Poverty free village : गावातील गरिबी दूर करणे ही ग्रामपंचायतीची घटनात्मक जबाबदारी आहे. ग्रामपंचायतीनी गावातील गरीब कुटुंबांना एकत्र घेऊन विकास आराखडा, त्याचे नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी केल्यास गरिबी दूर निश्‍चित होऊ शकते. यासाठी गावातील स्वयंसाह्यता गटांना सोबत घेणे आवश्यक आहे.

शाश्‍वत विकासाच्या संकल्पनेमधील सर्व नऊ संकल्पना समर्पक आणि यथोचित आहेत. गावाला आत्मनिर्भर आणि गरिबीमुक्त करण्यासाठी त्या अत्यंत उपयुक्त आहेत. पंचायतींनी आपल्या कार्यक्षेत्रातील असलेल्या गरीब आणि गरिबात गरीब कुटुंबांना एकत्र करून नियोजनबद्ध पद्धतीने कार्य केल्यास गरिबीचे चित्र निश्‍चित बदलते. बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकामध्ये आपल्या देशातील दारिद्र्यात झालेली घट हेच दर्शविते. संदर्भ काळामध्ये देशातील सुरुवातीला दारिद्र्य कमी असलेली पाच राज्ये असलेली आता तेरा राज्ये झालेली आहेत आणि ज्यामध्ये महाराष्ट्रही आहे. या राज्यात बहुआयामी निर्देशांकानुसार दारिद्र्याची टक्केवारी ही दहा टक्क्यांपेक्षाही कमी आहे, असा निती आयोगाचा अहवाल सांगतो.

गरिबीच्या कारणांमध्ये स्थानिक स्तरावरील झालेले अभ्यासाचे निष्कर्ष सांगतात, की गरिबी समाजातून मिटविण्यासाठी मूलभूत गरजांसोबत, गुणवत्तापूर्ण शिक्षण, आरोग्य, उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा, आवश्यक विम्याचे छत्र, गरजेनुसार सूक्ष्म पतपुरवठ्याची उपलब्धता, शाश्‍वत रोजगार या व इत्यादी बाबी यात समाविष्ट आहेत.
वास्तविक पाहता गावातील गरिबी दूर करणे ही ग्रामपंचायतीची घटनात्मक जबाबदारी आहे. ग्रामपंचायतीनी गावातील गरीब कुटुंबांना एकत्र घेऊन विकास आराखडा, त्याचे नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी केल्यास गरिबी दूर निश्‍चित होऊ शकते. यासाठी गावातील स्वयंसाह्यता गटांना सोबत घेणे आवश्यक आहे.

Womens Self Help Group
Women's Self-help Group : कापशी रोड येथील महिला बचत भवनाचे भूमिपूजन

उमेद अभियान आणि गरिबीनिर्मूलन :
आपल्या देशात ‘गरिबी हटाव’ हा नारा गेल्या अनेक दशकांपासून देण्यात येतो. दारिद्र्य हे अर्थ व्यवस्थेवरील सर्वांत मोठे आव्हान आहे. गरिबी कमी करण्यासाठी यापूर्वी अनेक योजना आणि उपक्रम राबविण्यात आले. याचा परामर्श मागील लेखात घेतलेला आहे.
“दीनदयाळ अंत्योदय योजना - राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानास” महाराष्ट्रात ‘उमेद’ अभियान या नावाने संबोधले जाते. अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात गरिबीनिर्मूलन करण्यासाठी कालबद्ध आणि सुसंगत असा कार्यक्रम आखलेला असून, त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे चालू आहे.

स्वयंसाह्यता गट आणि गरिबी
गावातील गरिबी दूर करण्यासाठी खालील प्रमाणे प्राथमिक टप्पे असावेत.
१) स्वयंसाह्यता गटांच्या माध्यमातून गावातील गरीब कुटुंब ओळखणे.
२) गरीब आणि गरिबात गरीब कुटुंबांना एकत्र करून त्यांना स्वयंसाह्यता गटात सामील करून घेणे.
३) त्यांची योजनाबद्ध पद्धतीने क्षमता बांधणी करणे.
४) सेवा साधने आणि आर्थिक लाभ देण्यासाठी सक्षम करणे.
स्वयंसाह्यता गटात सामील केल्यानंतर गरिबातील गरीब कुटुंबांना मानसिक आणि आर्थिक आधार देण्यात येतो. गावातील गरीब कुटुंबांची निवडण्याचे काम उमेद अभियानाचे कर्मचारी आणि ग्रामसभा हे संयुक्तपणे करतात. ग्रामसभेची मान्यता मिळाल्यावर त्यांना उमेद अभियानात समाविष्ट करण्यात येते. आता हा टप्पा पार पडला आहे. तथापि, काही कुटुंबे समावेश करावयाची असल्यास ही पद्धती अवलंबता येईल. स्वयंसाह्यता गटांच्या माध्यमातून गरिबीतून बाहेर पडण्यासाठी काही पायऱ्या निश्‍चित केलेल्या आहेत. त्यानुसार मार्गक्रमण करण्यासाठी एक समर्पित अशी फळी निर्माण करण्यात आलेली आहे.

गरिबी निर्मूलनासाठी दशसूत्री ः

१) स्वयंसाह्यता गटांत किमान दहा ते कमाल वीस अशा महिलांचा समावेश असतो. महिला स्वयंसाह्यता गटांशी सातत्याने संवाद साधून त्यांच्यातील गरिबीमुळे आलेला न्यूनगंड, वंचितता कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात. गरिबांना गरिबीतून बाहेर पडण्याची तीव्र इच्छाशक्ती असते. त्यांच्यात तशी क्षमतादेखील असते, फक्त योग्य संधी मिळायला हवी. यावर आधारित गरीब कुटुंबांना प्रथमतः मानसिक आधार देण्यात येतो. जेव्हा वाडी वस्तीवरील सर्व समान पार्श्‍वभूमीचे असलेली कुटुंब एकत्र आणली जातात. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक अशी समानता असते. वंचित, आर्थिकदृष्ट्या कमकुवत, शारीरिकदृष्ट्या अपंग, एकट्या राहणाऱ्या महिला, विधवा, परित्यक्ता, तृतीय पंथी, दुर्धर आजाराने बाधित असलेल्या महिलांना गटामध्ये समाविष्ट करण्यात येते. जसे की, गावात मी एकटीच गरीब नाही माझ्यासारखे अनेक आहेत आणि आपण सगळ्यांनी एकत्र मिळून यावर मात करावयाची आहे.
समान पार्श्‍वभूमीच्या महिला एकत्र आल्यानंतर त्यांच्यामध्ये एक आत्मविश्‍वास दृढ होतो आणि त्यांना समाधान मिळते. समूह शक्तीची या ठिकाणी प्रचिती येते. या प्रक्रियेमुळे त्यांचा वाढलेला आत्मविश्‍वास त्यांना कार्यप्रवण करण्यास साह्यभूत ठरतो.


स्वयंसाह्यता गटांचे संस्कार :
महिला स्वयंसाह्यता गटांच्या माध्यमातून गावातून संस्कारक्षम, कार्यप्रवण आणि विश्‍वासार्ह समाज निर्मितीचा प्रयत्न होत आहे. त्याला अपेक्षित प्रतिसादही मिळत आहे. संस्कारक्षम यासाठी की नियमित होणाऱ्या बैठकांमधून आणि संवादातून त्यांच्यामध्ये एकमेकांबद्दल संवेदना आणि सहकार्याची भावना निर्माण होते. एकमेकांच्या दुःखात आणि कठीण प्रसंगात साह्य करण्यासाठी बचत गटांसाठी संस्था आपल्याला सदैव मदत करण्यासाठी तयार आहे, ही भावनाच केवळ सुखावून जाते. गरिबीतून बाहेर पडण्यासाठी हा खरा पहिला टप्पा होय. या दहा सूत्रांमध्ये गुंफून त्यावर आधारित गटांवर संस्कार होतात
१. नियमित बैठक.
२. नियमित बचत.
३. आवश्यकतेनुसार अंतर्गत देवाण-घेवाण.
४. कर्जाची नियमित परतफेड.
५. सर्व बाबींची नोंद ठेवणारी लेखे अद्ययावत असणे.
६. गुणवत्ता पूर्ण शिक्षण.
७. आरोग्याची सुविधा.
८. पंचायत राज संस्थांची समन्वय.
९. शासकीय योजना.
१०. शाश्‍वत उपजीविका.

नियमित बैठक :
- स्थापन झालेल्या महिला गटांच्या नियमित बैठका हा त्यांचा एकत्र आणि अभेद्य राहण्यासाठीचा पाया होय. बैठक आळीपाळीने सर्व सदस्यांच्या घरी होते.
नियमित बचत :
- नियमित बैठकांना येणाऱ्या महिलांनी आपली मासिक अथवा आठवड्याची बचत स्वयंसाह्यता गटाच्या खजिनदाराकडे बैठकीच्या वेळी देणे गरजेचे आहे.
अंतर्गत देवाणघेवाण :
- सर्व स्वयंसाह्यता गटातील महिलांकडून जमा झालेले पैसे एकत्र करून ज्यांची गरज अधिक आहे आणि ज्यांच्या गरजेचे कारणही प्राधान्यक्रमाने आहे, अशा महिलांना प्राधान्याने अल्प व्याजदरात स्वयंसाह्यता गटांच्या माध्यमातून कर्ज देण्यात येते.
नियमित परतफेड :
- अशाप्रकारे घेतलेल्या कर्जाचा हप्ता देखील बचतीच्या बरोबर नियमितपणे परतफेड करणे गरजेचे आहे, त्या हप्त्याची ठरवून दिलेली रक्कम व्याजासह बैठकीच्या वेळी गटातील महिलांनी एकत्र घेऊन येणे गरजेचे आहे
वरील चारही टप्प्यांमध्ये गटांमध्ये बैठकीतून होणाऱ्या चर्चेमधून त्यांच्या क्षमता विकसित आणि वृद्धिंगत होतात. उदाहरणार्थ, आठवड्याला एक बैठक या पद्धतीने वर्षातील एकूण ५२ बैठका होतात. प्रत्येक बैठक किमान ४५ मिनिटे ते एक तास चालत आहे असे गृहीत धरल्यास ५२ तासांची चर्चा होते. यामधून ज्ञान आणि कौशल्यामध्ये निश्‍चित भर पडते. या बैठकांमधून केवळ धन व्यवहारच नव्हे तर मनाचे व्यवहारदेखील होत असतात.
गटातील कोणाला दुःख आहे का? कोणी अडचणीत आहे का? घरी कोणी आजारी आहे का? अशा प्रकारच्या अडचणी सुरुवातीलाच विचारण्यात येतात, सर्व महिला त्याच गावात आणि शक्यतो त्याच वाडी वस्तीवर राहणारे असल्यामुळे त्यांचे दुःख आणि अडचणी लगेचच लक्षात येतात. गटांच्या बैठकीच्या वेळी त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात. बहुतेक वेळेस आर्थिक विवंचना आणि पतींची / मुलांची व्यसनाधीनता हा एक मोठा प्रश्‍न असतो. आरोग्याच्या प्रश्‍नांची देखील वाढ होते आहे.

अद्ययावत लेखे :
स्वयंसाह्यता गटामधील एकसंधता आणि विश्‍वास टिकून राहण्यासाठी व्यवहारामध्ये पारदर्शकता असणे अनिवार्य आहे. यासाठी त्यांनी कष्टाने आणि स्वर्जीत पैशातून जमा केलेली मदत योग्य ठिकाणी असावी ही माफक अपेक्षा असते.
१) जमा झालेल्या पैशाची नोंद वहीत योग्य पद्धतीने ठेवणे गरजेचे राहते.
२) परतफेड करून जमा झालेली रक्कम त्या महिलेच्या नावासमोर नोंदविण्यात येते.
३) जमा झालेले पैसे आवश्यकतेनुसार आपापसांत वाटण्यात येतात.
४) शिल्लक रक्कम राहिल्यास बँकेमध्ये भरण्यात येतात. बँक गावापासून दूर असल्यास बँक सखी अथवा बिझनेस करस्पॉन्डंट यांच्या माध्यमातून बँकेचे व्यवहार करण्यात येतात. ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चांगली सुविधा पुरविलेली आहे.
५) धन व्यवहारात प्रत्येकाचे हिशेब चोख ठेवणे आणि प्रत्येक बैठकीमध्ये नोंदवही प्रत्येकाला वाचनासाठी देण्यात येते. बऱ्याच ठिकाणी त्यांचे सामूहिक वाचन करण्यात येते.
६) प्रत्येक सदस्याला बचतीचे पासबुक देण्यात येते.
७) स्वयंसाह्यता गटांचे बँकेतील पासबुकही त्यांना अवलोकनासाठी देण्यात येते. यामुळे स्वयंसाह्यता गटांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये विश्‍वास निर्माण होतो. त्यांची एकजूट अजून मजबूत होते.
८) धनव्यवहारासोबत मन व्यवहारही तेवढेच महत्त्वाचे आहेत, किंबहुना बऱ्याच अंशी मन व्यवहाराचाच अग्रक्रम असतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com