डॉ. प्राची क्षीरसागररानमेव्याच्या माध्यमातून जंगल हे वर्षभर मानव आणि प्राणिमात्रांचे पोषण करते. कधी भाजी, कधी फळे, तर कधी औषधी गुणांनी नटलेल्या वनस्पतींच्या रूपाने आपल्याला विविध पोषणमूल्ये मिळतात. रानमेवा हा केवळ चवीचा किंवा पोषणाचा विषय नसून, तो परिसंस्थेच्या संतुलनाचा निश्चितच एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आजच्या बदलत्या जीवनशैलीत रानफळांचे जतन आणि संवर्धन अत्यंत आवश्यक आहे..मी जेव्हा रानभाज्यांच्या अभ्यास करायला लागले, तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, बहुतेकांच्या मनात एक ठाम समज आहे, की रानभाज्या म्हणजे फक्त पावसाळ्याची देणगी. पावसाळा आला, की डोंगरदऱ्या हिरव्या शालीने नटतात आणि रानभाज्यांची मुबलकता डोळे दिपवते. पण निसर्गाची उधळण इथेच थांबत नाही. उन्हाळा आला, की चाखायला मिळतो तो रानमेव्याचा आस्वाद, गोड, आंबट, तुरट, कधी किंचित कडवटही; पण प्रत्येक चव जिभेवर रेंगाळणारी. हा रानमेवा केवळ चवीचा नव्हे, तर आरोग्याचा आणि परंपरेचा ठेवा आहे. जंगल हे वर्षभर मानव आणि प्राणिमात्रांचे पोषण करत असते, कधी भाजी, कधी फळे, तर कधी औषधी गुणांनी नटलेल्या वनस्पतींच्या रूपाने. या माध्यमातून आपल्याला विविध पोषणमूल्ये मिळतात..Wild Fruits: ओळख पोषक रानमेव्याची....रानमेव्याला अनेक ठिकाणी ‘माकडमेवा’ असेही संबोधतात. कारण रानफळे ही केवळ मानवासाठी नव्हे, तर वनपरिसंस्थेतील विविध जीवसमूहांसाठी महत्त्वाची आहारसंपत्ती आहे. माकडांसारखे प्रायमेट्स, विविध फळभक्षी पक्षी, वटवाघळे, खारी, उंदीर, रानससे तसेच काही कीटकसमूह या सर्वांची या फळांवर उपजीविका अवलंबून असते.त्याचबरोबर रानफळे बीजप्रसार प्रक्रियेत केंद्रस्थानी असतात. फळभक्षी प्राणी फळे खातात आणि त्यांच्या विष्ठेद्वारे बिया दूरवर पोहोचवतात; काही वेळा त्या जमिनीत साठवल्या जातात किंवा विस्मरणात जातात. या प्रक्रियेला प्राण्यांद्वारे बीजप्रसार असे म्हणतात. परिणामी, वनस्पतींचे पुनरुत्पादन सुलभ होते, आनुवंशिक विविधता वाढते आणि जंगलाचे नैसर्गिक पुनरुज्जीवन घडते. म्हणूनच रानमेवा हा केवळ चवीचा किंवा पोषणाचा विषय नसून, तो परिसंस्थेच्या संतुलनाचा निश्चितच एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे..उपजीविकेचा महत्त्वपूर्ण घटकरानमेवा हा केवळ पोषणमुल्ये आणि जैवविविधता संवर्धनापुरता मर्यादित नसून, तो स्थानिक ग्रामीण व आदिवासी समाजाच्या उपजीविकेचा महत्त्वपूर्ण घटक आहे. वनाधारित अर्थव्यवस्थेत रानफळे ही लघू वनउत्पादने म्हणून ओळखली जातात. ही उत्पादने हंगामी असली तरी त्यांचे संकलन, प्रक्रिया व विक्री यांमुळे विशेषतः महिलांना पूरक उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होतो..Wild Animal Attacks Deaths: राज्यात ५ वर्षात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ४२० व्यक्तींचा मृत्यू, वाघांनी घेतला २४८ जणांचा बळी.ग्रामीण भागातील महिला सकाळी जंगलातून रानफळे गोळा करून टोपल्यांतून जवळच्या शहरातील बाजारपेठेत विक्रीस आणतात. त्यामुळे शहरी ग्राहकांनाही स्थानिक आणि नैसर्गिक फळे उपलब्ध होतात. या प्रक्रियेमुळे स्थानिक जैवसंपत्तीचे आर्थिक रूपांतर घडते. विविध फळांचे दर त्यांच्या उपलब्धता, चव व मागणीवर अवलंबून बदलतात. उदाहरणार्थ, करवंद आणि बारके जांभूळ साधारणपणे १० रुपये प्रति वाटा या दराने विकली जातात. एका टोपलीत सुमारे ५० ते ६० वाटे भरतात; त्यानुसार दिवसाला अंदाजे ४५० ते ५०० रुपये उत्पन्न मिळू शकते, असे अनेक विक्रेते सांगतात. मोठी जांभळे ३०० ते ४०० रुपये किलोने विकली जातात. ताडगोळे डझनाला ५० ते ७० रुपये दराने विकले जातात. आंबुळकी सुमारे २० रुपये प्रति माप मिळते, तर खिरणी १२० ते १५० रुपये प्रतिकिलो दराने विकली जाते. चारोळी आणि टेंभुर्णी यांना तुलनेने अधिक बाजारभाव मिळतो, कारण त्यांच्या मागणीच्या तुलनेत उपलब्धता मर्यादित असते तसेच साठवण व प्रक्रियेनंतर त्यांचे मूल्यवर्धन होते..शाश्वत संकलन पद्धतरानमेव्याचे संकलन करताना स्थानिक समुदाय शाश्वत संकलन पद्धतींचे पालन करताना दिसतो. पारंपरिक ज्ञानाच्या आधारे त्यांनी काही अलिखित, परंतु पिढ्यान्पिढ्या काटेकोरपणे पाळले जाणारे नियम जपले आहेत. उदाहरणार्थ, कच्ची किंवा अपक्व फळे तोडली जात नाहीत, कारण त्यामुळे नैसर्गिक बीजप्रसार प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊ शकतो. फांद्या न मोडता केवळ पिकलेली फळे गोळा केली जातात, ज्यामुळे वृक्षाची पुनरुत्पादक क्षमता अबाधित राहते. काही प्रमाणात फळे जाणीवपूर्वक पक्षी व इतर वन्यप्राण्यांसाठी झाडावरच ठेवली जातात; यामुळे परिसंस्थेतील अन्नसाखळी आणि प्राण्यांद्वारे होणारा बीजप्रसार अखंडित राहतो. अनेक ठिकाणी हंगामातील प्रथम तोडलेली फळे देवाला अर्पण करण्याची प्रथा आढळते. यातून निसर्गाबद्दल कृतज्ञता, संयम आणि मर्यादित उपभोग यांची जाणीव दृढ करते. परिणामी अति संकलन टाळले जाऊन संसाधनांचा संतुलित वापर सुनिश्चित होतो..Wild Boar: रानडुकरांच्या उच्छादामुळे उत्तर सोलापुरातील पिके धोक्यात.भारतीय उपखंडात सर्वत्र आढळणारी आणि प्राचीन साहित्य पुराणांत उल्लेखित बोर, आवळा, आंबा आणि चिंच ही फळे सांस्कृतिक मूल्यांनी समृद्ध मानली जातात. आदिवासी समजुतीनुसार बोरांचे सेवन सतर्कता वाढवते, अशी धारणा आहे. तुळशीविवाहात ‘बोर भाजी, आवळा कृष्णदेव सावळा’ म्हणत बोर अर्पण करण्याची परंपराही या फळांच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक महत्त्वाची साक्ष देते. रानभाज्या असोत वा रानमेवा, निसर्गाची देणगी ही ऋतूंच्या चौकटीत बंदिस्त नाही, तर ती वर्षभर उलगडत राहणारी वनसंपदा आहे. रानफळे केवळ जिभेचे समाधान करत नाहीत, तर जंगलाशी, जैवविविधतेशी आणि आपल्या सांस्कृतिक स्मृतींशी असलेली नाळ अधिक बळकट करतात..शाश्वत संकलनाच्या लोकपरंपरा, देवाला अर्पण करण्याची कृतज्ञ भावना आणि ‘जितके हवे तितकेच’ या संयमशील जीवनमूल्यांमुळे रानमेव्याचा गोडवा अधिक अर्थपूर्ण ठरतो. आजच्या बदलत्या जीवनशैलीत रानफळांचे जतन आणि संवर्धन अत्यंत आवश्यक आहे. शाश्वत संकलन करून त्यापासून रोपे तयार करणे आणि ती त्यांच्या नैसर्गिक अधिवासात लावणे, यामुळे त्यांच्या संख्यावाढीस मदत होऊ शकते. कारण अनेक रानझाडांची वाढ मंदगतीने होते आणि सर्व बीज रुजली तरी परिपक्व झाडांमध्ये रूपांतर होण्याचे प्रमाण कमी असते. त्याचबरोबर त्यांच्या पोषणमूल्यांचा अभ्यास करून त्यांची उपयुक्तता आणि सांस्कृतिक महत्त्व पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. रानमेवा हा केवळ अन्न नाही, तर तो निसर्गाशी असलेल्या आपल्या सहजीवनाचे प्रतीक आहे..Wild Boar Attack: रानडुकराच्या हल्ल्यात पती-पत्नी गंभीर जखमी.रानमेव्याची विविधता‘रानमेवा’ हा शब्द जरी कानावर पडला, तरी डोळ्यांसमोर चटकन उभी राहतात ती फळं म्हणजे आंबुळकी, बोरं, आवळा, करवंदे, जांभूळ, तोरणं, चारोळी, ताडगोळे, आंबे, बकुळ, अंबाडा, खिरणी, भोकर, गोंदण, अमोनी, मेकीं, अटक, धामोड्या, तेंभुर्णी, चारोळी, चिंच. या प्रत्येक फळाची आपली वेगळी चव आणि गंध आहे. महाराष्ट्र राज्यात सुमारे शंभरहून अधिक प्रकारची रानखाद्य फळे नोंदवली गेली आहेत, ज्यांपैकी अंदाजे ३० ते ४० प्रकारची फळे प्रामुख्याने उन्हाळ्यात दिसतात..विशिष्ट भूभाग, मातीचा पोत आणि हवामानाची लय यानुसार रानमेव्याची विविधता बदलत जाते. विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश (उत्तर महाराष्ट्र) या उष्ण व कोरड्या पट्ट्यात उन्हाळ्याची झळ तीव्र असली, तरी दुष्काळालाही न जुमानता बहरणारी रानफळे या भूमीची खरी ओळख ठरतात. तेंभुर्णी (Diospyros melanoxylon), चारोळी (Buchanania lanzan), बोर (Ziziphus mauritiana), जांभूळ (Syzygium cumini), आवळा (Phyllanthus emblica), अटक / काटबोर (Randia dumetorum), खिरणी (Manilkara hexandra) आणि चिंच (Tamarindus indica) ही फळे येथे मोठ्या प्रमाणात आढळतात. या फळांचा गर साधारणतः घट्ट, चव गोड-आंबट असते. कडक उन्हातही या फळाची टिकून राहण्याची क्षमता असते; उलट उन्हाच्या तप्त स्पर्शाने त्यांचा गोडवा अधिक खुलतो. शरीराला ऊर्जा, क्षार आणि विशेषतः जीवनसत्त्व क पुरवून ही फळे उन्हाळ्यातील तहान, भूक भागवतात, उष्माघातापासून संरक्षण देतात..पश्चिम महाराष्ट्रात तुलनेने दमट हवामान असल्यामुळे पावसाळ्यानंतर झाडांची जोमदार वाढ होते. हिवाळा-उन्हाळ्यात फळांचा बहर खुलतो. फणस, आंबा (Mangifera indica), करवंद (Carissa carandas), ताडगोळे (Borassus flabellifer), बकुळ (Mimusops elengi), अंबाडा (Spondias pinnata), खिरणी (Manilkara hexandra) आणि भोकर (Cordia dichotoma) तसेच आंबुळकीसारखी रानफळे येथे प्रामुख्याने आढळतात. काही भागांत तुरळक प्रमाणात तोंड जांभळे करणारी अंजनीची फळेही खाल्ली जातात.पोषणमूल्यांच्या दृष्टीने पाहता, ताडगोळा उष्णतेत शरीराला थंडावा देणारा मानला जातो; करवंदे व आंबुळकी पचनास चालना देतात; आंबा ऊर्जादायी व खनिजांनी समृद्ध असतो; तर बकुळ व भोकर ही फळे पौष्टिक तसेच औषधी गुणांनी युक्त मानली जातात. कच्च्या भोकराच्या फळापासून चविष्ट लोणचे बनवतात..वनफुलांची रंगीत मेजवानीरानफळांच्या संगतीने ग्रीष्म ऋतू वनफुलांचीही एक रंगीत मेजवानी घेऊन येतो. पळस (Butea monosperma) याच्या तांबड्या फुलांपासून तयार होणारे शीतल पेय उन्हातही ताजेपणा देत राहते. सावरीची कोवळी फुले आणि कळ्यांचा वापर भाजीमध्ये होतो. काही भागांत प्रक्रियेनंतर वापरला जाणारा बिबा (Semecarpus anacardium) आणि औषधी गुणांनी नटलेल्या बहाव्याची फुले (Cassia fistula) ग्रीष्माला आरोग्याची जोड देतात. याच काळात गोडसर सुगंध पसरविणाऱ्या मोहफुलांपासून (Madhuca longifolia) विविध पाककृती तयार केल्या जातात.- डॉ. प्राची क्षीरसागर ९९२३३६७४५२(लेखिका निसर्ग अभ्यासक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.