स्वतःच्या विश्वात मस्तीत जगणाऱ्या वाघाला तुम्ही उचकवले आणि वाघाने तुम्हाला प्राणांतिक जखमा केल्या तर दोष तुमचा की वाघाचा ? अजून उचकवाल तर घरात येऊन तुम्हाला फाडून खाईल तो.
लाखो वर्षांच्या उत्क्रांतीत डोंगर, नद्या, समुद्र, जंगले स्थिर झाली होती आणि छान चालले होते. त्यांच्या अंगा खांद्यावर पशु, पक्षी, जलचर यांच्या लाखो प्रजाती सुखाने राहत होते / आहेत. त्यात अजून एका प्रजातीची भर पडली - माणूस !
हजारो वर्षे माणसे देखील इतर प्रजातींसारखीच होती. पृथ्वी, निसर्गाच्या अंगाखांद्यावर खेळणारी, त्यांना फारशी इजा न पोचवणारी, त्यांच्याबद्दल कृतज्ञता बाळगणारी.
गेल्या दोन तीन शतकात मात्र माणसांमधील मूठभर लोकांनी स्थापन केलेल्या कॉर्पोरेटनी उच्छाद मांडला आणि त्या स्थिर पृथ्वीला, निसर्गाला (Nature), पर्यावरणाला (Environment) उचकवले. तो अंगावर येण्याचा राहणार आहे का ?
या कॉर्पोरेटच्या मीडियाची भाषा बघा.
समुद्र आत आला ; आम्ही समुद्राला काही नाही केले.
डोंगर आमच्या हायवेवर कोसळला ; आम्ही डोंगराला काही नाही केले.
नदीचा पूर शहरात घुसला ; आम्ही नदीला काही नाही केले.
वन्यप्राण्यांनी आमच्या वस्त्यांवर आक्रमण केले : आम्ही वन्य प्राण्यांच्या अधिवासावर अतिक्रमण नाही केले.
सगळा दोष जणू काही समुद्र / डोंगर / नद्या / वन्य प्राण्यांचा ; आम्ही काही नाही केले .
यांनी पावसाळा / उन्हाळा / हिवाळा / बर्फवृष्टी / तापमान / वारे यांची एकमेकांत गुंफलेली चक्रे बिघडवून टाकली आहेत, तो भाग वेगळा.
वर `माणसाने निसर्गाचा नाश केला` असा आपला सबगोलंकारी ब्रेनवॉश करून कॉर्पोरेटचे उन्मत्त बैल शिंगे मोडून आम्ही तुमच्यापैकीच एक असे सतत भासवतात आणि आपल्याला दिग्मूढ करतात.
दुसरा मुद्दा खासगी / सार्वजनिक मालकीच्या कॉर्पोरेटचा. जर राजकीय आर्थिक फ्रेम जनहित / पर्यावरण हित केंद्रस्थानी ठेवणारी नसेल तर सार्वजनिक मालकीचे कॉर्पोरेट्सदेखील बेजबाबदार वागतात.
सत्य हे आहे की जगातील १० टक्के व्यक्ती / कुटुंबाकडे जी ९० टक्के संपत्ती गोळा झाली आहे तिला कष्टकऱ्यांचा घाम लागला आहे आणि कार्बन उत्सर्जन / ओरबाडलेली माती इत्यादी लागले आहे.
या माजलेल्या कॉर्पोरेट बैलाच्या नाकात आज वेसण घालायला सुरुवात केली तरी त्यातून बिघडलेले निसर्ग चक्र पूर्ववत व्हायला अजून काही दशके म्हणजे चार-पाच पिढ्या जातील.
आणि निसर्गात झालेले अनेक संरचनात्मक बदल तर कायमस्वरूपी आहेत. पृथ्वीवरील पशु, पक्षी, अनेक प्रजाती कायमच्या नष्ट झाल्या आहेत. अर्धांग वायूने विद्रुप झालेल्या मानवी चेहऱ्याप्रमाणे निसर्गाची अवस्था झाली आहे.
मित्रांनो, लक्षात घ्या. कॉर्पोरेट स्वतःहून सुधारणारा प्राणी नाही , कारण कॉर्पोरेट भांडवलाचे भूत कॉर्पोरेट चालवणाऱ्या / मालकी असणाऱ्या माणसांच्या मानगुटीवर स्वार झाले आहे. त्या अमूर्त भांडवलाचे चारित्र्य समजून घेतले पाहिजे , ना फक्त अंबानी / अदानीचे.
त्या भांडवलाला फक्त दंडसत्तेच्या फटक्याची भाषा कळू शकेल, दुसरी कोणतीही नाही. म्हणून लोकशाहीत सत्ताधारी विचार करून निवडा.
प्रश्न कॉर्पोरेटचा नव्हता आणि नसणार आहे ; कारण झालेले नुकसान भरून काढण्याचे नाना मार्ग त्यांच्याकडे आहेत. त्यांची जोखीम क्षमता अफाट आहे. झालेले नुकसान सार्वजनिक पैशातून भरून काढण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले आहे.
प्रश्न आपल्या कोट्यवधी सामान्य नागरिकांच्या जीवनमरणाचा आणि आपल्या कच्च्या बच्यांच्या भवितव्याचा , आपल्या न जन्मलेल्या भावी पिढयांचा होता / आहे आणि राहील. तुम्हा-आम्हाला त्याचे गांभीर्य कळत आहे वा नाही यामुळे सत्य बदलणार नाहीये.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.