
Indian Agriculture: पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या पिकांचा हंगाम म्हणजे खरिप हंगाम. खरीपातील पीके पावसाच्या पाण्यावर अलंबून येतात. पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतर खरीपातील पिकांची पेरणी जून महिन्यात सुरु होते. जुलै महिन्यापर्यंत पेरण्या आटोपतात. काही वेळा पाऊस लांबला किंवा पावसाता खंड पडला तर ऑगस्ट महिन्यात पेरण्या जातात. खरीपातील पिकांची काढणी सप्टेंबरपासून सुरु होते. मूग आणि उडदासारखी पीके लवकर येतात. नोव्हेंबरपर्यंत पिकांची काढणी सुरु असते. कापूस आणि तुरी सारख्या पिकांची लागवड खरीपात होते. मात्र काढणी जानेवारी, फेब्रुवारीपर्यंत चालते. कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, मका, ज्वारी, बाजरी, भूईमूग, कारळे, कांदा ही प्रमुख खरीप पीके आहेत.
महाराष्ट्रात घेतली जाणारी महत्वाची पीके म्हणजे कापूस, सोयाबीन, तूर, ऊस आणि मका. या पिकांच महाराष्ट्रात सर्वाधिक पेरणी केली जाते. यापैकी कापूस आणि सोयाबीनचे क्षेत्र खरीपातील एकूण क्षेत्रापैकी ६० टक्के आहे. कापसाची लागवड मागील काही वर्षांपासून कमी होत असून सोयाबीनची लागवड वाढत आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक क्षेत्रावर सोयाबीन पिकाची लागवड होते. सोयाबीनने मागील काही वर्षांमध्ये कापसाला मागे टाकले. कापसाची लागवड ५० लाख हेक्टरवरून कमी होत ४० लाख हेक्टरवर आली. मात्र सोयाबीनची लागवड वाढत जाऊन ५० लाख हेक्टरच्याही पुढे गेली. २०२४ च्या खरीपात सोयाबीनची ५१ लाख ५९ हजार हेक्टरवर लागवड झाली होती. सोयाबीनची लागवड जून आणि जुलै महिन्यात होते. तर काढणी ऑक्टोबरमध्ये होते. सोयाबीन हे महाराष्ट्रातील महत्वाचे तेलबिया पीक आहे.
महाराष्ट्रातील कापसाची लागवड कमी होत आहे. वाढता उत्पादन खर्च, गुलाबी बोंडअळीचा वाढता ब्रादुर्भाव आणि मजुरांची टंचाई यामुळे कापूस पीक तोट्याचे ठरत आहे. कापसाच्या भावातही चढ उतार मोठ्या प्रमाणात दिसून येतात. पावसामुळे नुकसानही वाढत आहे. यामुळे कापूस पिकाची लागवड कमी होत गेली. २०२४ च्या हंगामात महाराष्ट्रात ४० लाख ८६ हजार हेक्टरवर कापसाची लागवड झाली होती. देशात महाराष्ट्रात कापसाची सर्वाधिक लागवड होते. मात्र गुजरातमध्ये लागवड कमी राहूनही उत्पादकता जास्त असल्याने उत्पादन जास्त मिळते.
महाराष्ट्रात महत्वाचे कडधान्य पीक म्हणजे तूर. राज्यात तुरीचे क्षेत्रही कमी होत गेले. जास्त कालावधीचे पीक आणि ऐन काढणीच्या काळात होणारे नुकसान यामुळे तुरीची लागवड कमी झाली. महाराष्ट्रात २०२४ मध्ये तुरीची लागवड १२ लाख २३ हजार हेक्टरवर झाली होती. तर जवळपास १३ लाख टन उत्पादन झाले होते. तूर लागवड आणि उत्पादनात महाराष्ट्रात देशात अव्वल आहे.
ऊस उत्पादनात महाराष्ट्र उत्तर प्रदेशनंतर दुसऱ्या क्रमांकावर येतो. काही वेळा महाराष्ट्र उत्तर प्रदेशला ऊस आणि साखर उत्पादनातही मागे टाकतो. २०२४ मध्ये राज्यात ११ लाख ६७ हजार हेक्टरवर ऊसाची लागवड झाली होती. तर साखऱ उत्पादन २०२३ च्या हंगामापेक्षा कमी होऊन ८१ लाख टनांवर आले होते.
देशात मका उत्पादनात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. मध्य प्रदेश आणि कर्नाटकनंतर महाराष्ट्रात मक्याची लागवड होते. २०२४ च्या खरीपात मक्याची ११ लाख २१ हजार हेक्टरवर मक्याची लागवड झाली होती. तर उत्पादन ३९ लाख टन झाल्याचा राज्याच्या कृषी विभागाचा अंदाज आहे. मक्याचा वापर पोल्ट्री खाद्यासाठी जास्त होतो. स्टार्च उद्योगातही मक्याला मागणी असते. तसेच मक्यापासून इथेनाॅलची निर्मीतीही केली जाते
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.