
Crop Insurance Regulations : मृग बहरातील फळपिकांसाठी विमा योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याचा ॲग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक आवश्यक आहे. योजनेत अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित फळपिकांसाठी सर्व शेतकरी भाग घेऊ शकतात. पीक कर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदारांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक राहणार आहे.
कमी पाऊस/जास्त पाऊस, पावसातील खंड, सापेक्ष आर्द्रता अशा विविध हवामान धोक्यांमुळे फळपिकांचे मोठे नुकसान होते. अशा नुकसानीच्या परिस्थितीत शेतकऱ्याचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी शासनाने हवामान आधारित पीक विमा योजना लागू केली आहे. मृग बहर २०२५ मध्ये या योजनेत संत्रा, मोसंबी, डाळिंब, पेरू, चिकू , लिंबू, सीताफळ, द्राक्ष या फळपिकांचा समावेश आहे.
ज्या महसूल मंडळात त्या फळपिकाखाली २० हेक्टर किंवा त्याहून अधिक उत्पादनक्षम क्षेत्र आहे अशा महसूल मंडलांना त्या फळपिकासाठी अधिसूचित करण्यात येऊन तेथे ही योजना राबविण्यात येते. केवळ उत्पादनक्षम फळबागांना विमा संरक्षण लागू राहणार आहे. योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याचा ॲग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक आवश्यक आहे. योजनेत अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित फळपिकासाठी सर्व शेतकरी भाग घेऊ शकतात.
पीककर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदारांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक राहणार आहे.बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेने किंवा ऑनलाइन फळपीक विमा पोर्टल www.pmfby.gov.in वर विमा हप्ता जमा करून सहभाग घेऊ शकतात. त्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक, आधार कार्ड, जमीन धारणा ७ /१२, ८(अ) उतारा व पीक लागवड स्वयंघोषणा पत्र, फळबागेचा जिओ टॅगिंग केलेला फोटो, बँक पासबुकवरील बँक खात्याबाबत सविस्तर माहिती लागेल. कॉमन सर्व्हिस सेंटर मार्फत अर्ज ऑनलाइन भरता येतील.
शेतकऱ्यांनी फळपीक लागवड केलेली नसताना किंवा उत्पादन योग्य फळपीक नसताना, दुसऱ्याच्या जमिनीवर किंवा शासनाच्या जमिनीवर, अकृषक जमिनीवर विमा काढून विमा योजनेत सहभाग घेतल्यास त्यांचे विरुद्ध कडक कारवाई होऊ शकते. यासाठी ज्या शेतकऱ्यांकडे उत्पादन योग्य वयाची फळबाग आहे, त्यांनीच योजनेत सहभाग घ्यावा.
शेतकऱ्यांनी फक्त स्वतःच्या जमिनीवर विमा घ्यावा. शेतकऱ्यांना ई-पीकपाहणी बंधनकारक आहे. ई-पीकपाहणी आणि विमा घेतलेले पीक यात तफावत आढळल्यास विमा अर्ज केव्हाही रद्द होऊ शकतो .
शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता हा विमा संरक्षित रकमेच्या ५ टक्क्यांच्या मर्यादेत असतो. मात्र वास्तव दर्शी विमा हप्ता ३५ टक्क्यांहून अधिक असल्यास त्या अधिक विमा हप्त्यातील ५० टक्के भार शेतकऱ्यांना उचलावा लागतो. विमा हप्ता दर जिल्हानिहाय वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे शेतकऱ्याने भरवायच्या विमा हप्त्यात जिल्हानिहाय फरक असू शकतो.
टीप
विमा योजनेअंतर्गत हवामान धोक्याच्या ट्रिगर कार्यान्वित झाल्यास त्या महसूल मंडळातील त्या पिकासाठी भाग घेतलेल्या शेतकऱ्यास नुकसान भरपाई रक्कम संबंधित विमा कंपनीकडून देण्यात येणार आहे.
एक शेतकरी त्याच्याकडे एकापेक्षा अधिक अधिसूचित फळपिके असल्यास तो या सर्व पिकांसाठी तो विमा योजनेत सहभाग घेऊ शकतो.
अधिसूचित फळपिकांपैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग किंवा आंबिया बहर पैकी, कोणत्याही एकाच हंगामासाठी विमा संरक्षण अर्ज करता येईल (उदा. संत्रा, मोसंबी, द्राक्ष, डाळिंब)या योजनेत प्रति शेतकरी सहभागासाठी कोकण विभागासाठी एका फळपिकाखालील कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र १० गुंठे (०.१० हे.) आणि उर्वरित विभागाकरिता कमीत कमी उत्पादनक्षम क्षेत्र २० गुंठे (०.२० हे.) अशी मर्यादा राहील. तसेच जास्तीत जास्त क्षेत्र मर्यादा ही सर्व फळपिके व दोन्ही हंगाम मिळून प्रति शेतकरी ४ हेक्टर मर्यादेपर्यंत राहील.
विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आणि विमा नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्याचे बँक खाते आधार आधारित पेमेंट साठी लिंक असावे.
शेतकऱ्यासाठी ऑनलाइन हप्ता भरण्यासाठी विमा पोर्टल www.pmfby.gov.in
अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित विमा कंपनी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयासाठी संपर्क साधावा.
- विनयकुमार आवटे, ९४०४९६३८७०
(कृषी संचालक (नियोजन व प्रक्रिया), कृषी आयुक्तालय, पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.