Satara News : जिल्ह्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने पाणीटंचाई स्थिती कायम आहे. जिल्ह्यात ५८ गावे व २६८ वाड्या-वस्त्यांवर ६० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. माण तालुक्यात सर्वाधिक टंचाईच्या झळा बसत आहेत. या तालुक्यात पाण्यासाठी तब्बल ३९ टँकर सुरू आहेत.
('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
जिल्ह्यातील पाण्याची टंचाई स्थिती ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे टँकरच्या मागणीत वाढ होत आहे. सध्या प्रशासनाकडून जिल्ह्यातील ५८ गावे व २६८ वाड्या-वस्त्यांवरील ८३ हजार ३९४ लोकांना ६० टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच ७३ हजार १९६ पशुधनही या पाणीटंचाईने बाधित आहेत. माण तालुक्यात सर्वाधिक झळा बसत आहेत. माण तालुक्यात ३९ टॅंकरद्वारे ३१ गावे व २२८ वाड्या-वस्त्यांवर पाणीपुरवठा केला जात आहे.
खटाव तालुक्यात ३ टँकरद्वारे सहा गावे व ३१ वाड्या-वस्त्यांवर, फलटण तालुक्यात ११ टॅंकरद्वारे नऊ गावे ३१ वाड्या-वस्त्यांवर, कोरेगाव तालुक्यात सहा टँकरद्वारे ११ गावांत, वाई तालुक्यात एका टँकरद्वारे एका गावात पाणीपुरवठा केला जात आहे.
संरक्षित पाण्यासाठी प्रशासनाकडून विहीर व बोअरवेलचे अधिग्रहण केले आहे. यामध्ये माण तालुक्यात पाच विहिरी व दहा बोअरवेल व खटावमध्ये तीन विहिरी व २१ बोअरवेल, फलटणमध्ये एक विहिर व एक बोअरवेल, कोरेगावात तीन विहिरी व तीन बोअरवेलचे व वाईमध्ये पाच विहिरींचे अधिग्रहण केले आहे.
टंचाईग्रस्त तालुकेच दुष्काळातून वगळले
माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यात टंचाई स्थिती कायम आहे. खरीप हंगामात पिके पाण्या वाचून वाया गेली आहेत. सध्या पाणी टंचाईची स्थिती गंभीर आहे. पुढील काळात टँकरच्या संख्येत वाढ होणार आहे. मात्र राज्य शासनाने दुष्काळी जाहीर केलेल्या यादीत या चारही तालुक्यांचा समावेश नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.