
Mumbai News : यंदाच्या खरीप हंगामातील ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानीच्या मदतीपोटी पाठविण्यात आलेला २७९६ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरीसाठी नव्या सरकारच्या प्रतीक्षेत आहे.
आचारसंहिता लागल्यानंतर २२ नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आलेल्या या प्रस्तावाकडे कोणताही निर्णय न घेतल्याने आता नव्या सरकारमधील मदत व पुनर्वसन मंत्र्यांकडे हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे. मंत्रिमंडळ निर्मितीबाबत अनिश्चितता असल्याने नव्या मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेसाठी हा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे समजते.
राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जोरदार अतिवृष्टी झाल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक आणि पुणे विभागात अतिवृष्टीने मोठे नुकसान झाल्याने येथे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते.
दरम्यान, आचारसंहिता लागल्याने निर्णय घेण्याचे अधिकार सरकारच्या हातातून गेले. त्यामुळे विभागीय आयुक्तांकडून आलेल्या प्रस्तावांवर नुकसान आणि मदतीची रक्कम निश्चित करून मान्यतेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. २२ नोव्हेंबर रोजी पाठविण्यात आलेल्या या प्रस्तावावर कोणताही निर्णय न घेतल्याने अद्याप शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही.
छत्रपती संभाजी नगर विभागात तब्बल २७२३ कोटी रुपयांची मदत निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये बीड ५२० कोटी, नांदेड ८१२ कोटी, जालना ४१२ कोटी, हिंगोली ४१९ कोटी, धाराशिव २११ कोटी, तर सप्टेंबरमध्ये झालेल्या नुकसानीपोटी संभाजीनगरमध्ये २३४ कोटी रुपयांची रक्कम निश्चित करण्यात आली आहे.
नागपूर विभागात ६४ कोटी ४ लाख रुपयांची रक्कम निश्चित करण्यात आली असून, वर्धा दोन कोटी ८३, नागपूर २४ कोटी, ४८ लाख, गोंदिया २६ कोटी २९ लाख, भंडारा १० कोटी तसेच ऑगस्टमध्ये झालेल्या नुकसानीपोटी वर्धा जिल्ह्यासाठी ४१ लाख ४८ हजार रुपयांची मदत निश्चित केली आहे.
पुणे विभागात १० लाख ७३ हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तर नाशिकमध्ये ८ कोटी ९४ लाख रुपयांची मदत निश्चित केली आहे. यामध्ये धुळे १८ लाख ७५ हजार, नाशिक २१ लाख ८२ हजार, नंदुरबार ४१ लाख ५२ हजार, अहिल्यानगर २४ कोटी रुपयांची, तर जळगाव जिल्ह्यात ५७ कोटी एक लाख रुपयांची मदत नुकसानीपोटी देण्यात येणार आहे.
१९४७ हेक्टरवरील क्षेत्र बाधित
छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, पुणे या विभागांतील जालना, हिंगोली, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा, धुळे, नाशिक, नंदुरबार, अहिल्यानगर, जळगाव आणि पुणे जिल्ह्यातील काही गावांमधील तब्बल १९४७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीमध्ये २ लाख ५४ हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.