
Latur News : माजी मंत्री आमदार अमित देशमुख हे संस्थापक अध्यक्ष असलेल्या निवळी (ता. लातूर) येथील विलास सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार शुक्रवारपासून (ता. सात) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. कारखान्यावर स्थापनेपासून देशमुखांचे वर्चस्व आहे.
परंतु लातूर ग्रामीण विधानसभा निवडणुकीत नुकत्याच झालेल्या धीरज देशमुख यांच्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत अमित देशमुख यंदा भाकरी फिरवण्याची शक्यता आहे. यातूनच संचालक मंडळाच्या नव्या टीममध्ये नवख्यांना संधी मिळण्याची शक्यता असून, कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्याचेही संकेत मिळत आहेत.
महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था निवडणूक प्राधिकरणाने कारखान्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे - विरोळे यांची नियुक्ती केली असून, त्यांच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासह छाननी व अन्य प्रक्रिया पार पाडणार आहे. तालुक्यातील उसाचे वाढते क्षेत्र लक्षात घेता मांजरा शेतकरी सहकारी कारखान्यानंतर दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी विलास (पूर्वाश्रमीच्या विकास) कारखान्याची स्थापना केली.
याच कारखान्याच्या माध्यमातून अमित देशमुख यांनी सहकारातील राजकारणात प्रवेश केला. कमी कालावधी व कमी खर्चात कारखान्याना उभारणीसह चाचणी गळीत हंगामापासून आतापर्यंतच्या अनेक गळीत हंगामातील उत्पादन, तांत्रिक क्षमता व अन्य क्षेत्रातील विक्रम कारखान्याच्या नावावर आहेत. स्थापनेपासूनच कारखान्यावर देशमुख परिवाराचे पर्यायाने काँग्रेसचे वर्चस्व आहे. प्रत्येक संचालक मंडळ निवडणुकीत अमित देशमुख नवीन कार्यकर्त्यांना संचालकपदी संधी देतात. सध्याच्या टर्ममध्ये वैशालीताई देशमुख यांनी कारखान्याच्या अध्यक्षा म्हणून जबाबदारी सांभाळली.
याच दरम्यान झालेल्या विधानसभा निवडणुकीत धीरज देशमुख यांचा पराभव झाला. मतदारसंघात सहकारी व खासगी साखर कारखानदारीच्या माध्यमातून चांगले काम असतानाही या पराभवामुळे सर्वांनाच आत्मचिंतन करण्याची वेळ आली. पराभवाला बऱ्याच ठिकाणी कार्यकर्त्यांची वर्तणूक कारणीभूत ठरली आहे. यामुळेच कारखान्याच्या निवडणुकीत देशमुखांकडून भाकरी फिरवून नवीन कार्यकर्त्यांना संचालकपदी संधी मिळण्यासह कारखान्याची निवडणूकही बिनविरोध होण्याचे संकेत मिळत आहेत.
एकवीस जागांसाठी होणार निवडणूक
कारखान्याच्या एकवीस संचालकांच्या जागेसाठी ही निवडणूक होत असून ७ ते १३ मार्च दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करणे, १७ मार्च रोजी अर्जांची छाननी होऊन १८ मार्च ते एक एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. गरज पडल्यास १३ एप्रिलला मतदान होऊन १५ एप्रिलला मतमोजणी होणार आहे. २१ पैकी १५ संचालक ऊस उत्पादक शेतकरी गटातून निवडले जाणार आहेत.
यात निवळी, शिराळा, कासारजवळा, चिंचोलीराव वाडी व बाभळगाव गटातून प्रत्येकी तीन, सहकारी संस्था गट, अनुसूचित जाती, ओबीसी, व्हीजेएनटीतून प्रत्येकी एक तर महिला गटातून दोन संचालकांची निवड होणार आहे. ऊस उत्पादक पाच गटात मिळून बारा हजार सहा शेतकरी मतदार असून संस्था मतदारसंघात केवळ तीनच मतदार असून त्यात अमित देशमुख, विजय देशमुख व प्रताप पाटील यांचा समावेश आहे. यामुळे याच गटातून संस्थापक अध्यक्ष आमदार अमित देशमुख बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.