Unseasonal Rain : जिल्ह्यात अवेळी पावसाने शेतकऱ्यांना धडकी

Rain Update : दिंडोरी तालुक्यात रात्री आठच्या सुमारास १५ ते २० मिनिटे पावसाच्या सरी झाल्या. त्यामुळे काढणीस आलेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे धाबे दणाणले.
Rain Update
Rain UpdateAgrowon
Published on
Updated on

Nashik News : भारतीय हवामान विभागाच्या मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राकडून हलक्या पावसाची शक्यता वर्तविली होती. तर मंगळवारी (ता. ९) सायंकाळी दिंडोरी, पेठ व सिन्नर तालुक्यांत हलक्या पावसाने हजेरी लावली. तर बुधवारी (ता. १०) निफाड, सिन्नर, चांदवड तालुक्यात हलक्या सरी बरसल्या.

सध्या खरीप हंगामातील लाल कांदा काढणी व द्राक्ष खुडे सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी पावसाची धास्ती घेतली आहे. गेल्या पाच वर्षांत नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांना रडविले आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात २ ते ४ मिमी दरम्यान पाऊस झाला आहे. या पावसाने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे.

Rain Update
Unseasonal Rain : शिरोळमध्ये शाळूला अवकाळीचा फटका

मंगळवारी (ता. ९) दिंडोरी तालुक्यात रात्री आठच्या सुमारास १५ ते २० मिनिटे पावसाच्या सरी झाल्या. त्यामुळे काढणीस आलेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे धाबे दणाणले. गेल्या तीन वर्षांत अनेक शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडलेले नाही. त्यात पुन्हा नैसर्गिक आपत्तीने डोके वर काढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे सावट आहे.

पेठ तालुक्यात पावसाने सुमारे अर्धा तास हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. या पावसामुळे टोमॅटो, मिरची, वांगी, हरभरा, गहू आदी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. तर कांदा पिकावर करपा पडण्याची शक्यता आहे.

Rain Update
Unseasonal Rain : पावसाने आंबा, द्राक्ष बागायतदारांचे धाबे दणाणले

निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत, साकोरे मिग, कोकणगाव, शिरसगाव, उंबरखेडसह गोदाकाठ परिसरातही हलक्या सरी झाल्या. सध्या द्राक्ष घड पाणी उतरण्याच्या अवस्थेत आहेत, तर काही ठिकाणी काढणी सुरू आहे.

या परिस्थितीत द्राक्ष घडात पाणी गेल्याने तडे जाण्याची शक्यता आहे. सिन्नर तालुक्यातील जायगाव परिसरात पावसाच्या हलक्या सरी झाल्या. चांदवड तालुक्यातील वाहेगाव साळ परिसरात रात्री तीन वाजेनंतर सकाळपर्यंत पाऊस सुरूच होता. येवला तालुक्याच्या पूर्व भागात हलक्या सरी झाल्या.

दुष्काळात तेरावा महिना

अल्प पर्जन्यमान, भांडवलाची समस्या, खरीप हंगामाच्यावेळी सोंगणी दरम्यान अंतिम टप्प्यात वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान अधिक होते. त्यात सिंचनासाठी पाण्याची अडचण असल्याने लेट खरीप व रब्बी उन्हाळ कांदा लागवडी कशाबशा पूर्ण झाल्या आहेत.

मात्र या अवेळी पावसामुळे कांदा पिकावर करपा रोगाचा तर द्राक्षबागांमध्ये डाऊनी व भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे पीक संरक्षण खर्चात वाढ होणार असून शेतकऱ्यांसमोर दुष्काळात तेरावा महिना अशीच परिस्थिती आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com