Mango Producer : विक्रमगड तालुक्यात रविवारी व सोमवारी अशा दोन दिवसांत पुन्हा पावसाच्या सरी बरसल्याने पिकलेल्या आंबा, काजू, तृणधान्य, तसेच वीटभट्ट्यांचे नुकसान झाले.
असे असताना मंगळवार, बुधवारी आणि गुरुवारी तालुक्यात ढगाळ वातावरण असल्याने पुन्हा अवकाळी पाऊस येईल, या भीतीने आंबा उत्पादक, भाजीपाला लागवड केलेले शेतकरी धास्तावले आहेत.
तालुक्याच्या काही भागात ४ ते ७ मार्चदरम्यान अचानक विजेच्या गडगडाटासह अवकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसल्याने त्याचा परिणाम विविध पिकांवर झाला.
उरले सुरले पीक हाती येत नाही, तोच पुन्हा व रविवारी आणि सोमवारी तिसऱ्यांदा अवकाळी पावसामुळे उरलेले पीक नष्ट झाले आहे. सलग तीन दिवस ढगाळ वातावरण असल्याने अवकाळीच्या शक्यतेने शेतकरी धास्तावला आहे.
गुरुवारी (ता. ४) तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून सूर्याचे दर्शन झाले नाही. मात्र पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुन्हा अवकाळी पाऊस पडण्याच्या शक्यतेने आंबा उत्पादक चांगलेच धास्तावले आहेत.
या वर्षी अवकाळी पावसामुळे आंबा पिकाची पुरती वाट लागली असून केवळ २० ते ३० टक्के आंबा उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती येणार आहे. तालुक्यातील आंबापीक येत्या १५ दिवसांत काढणीस तयार होणार असून अद्यापही आंबे झाडावर असल्याने अवकाळी पावसाने आंबा खराब होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना सरकारची मदत कधी मिळणार?
मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाल्याने आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. सरकारने या नुकसानीचे पंचनामेही केले, मात्र सरकारने अद्याप ही आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मदत केलेली नसल्याने आंबा उत्पादक शेतकरी अद्याप नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.