Akola News : पश्चिम विदर्भातील तीनही जिल्ह्यांत गेल्या चार दिवसांत भाग बदलून पाऊस पडतो आहे. शुक्रवारी (ता.१२) बुलडाणा जिल्ह्यात मोताळा, मेहकर, वाशीम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यांत वादळासह जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे पिके भुईसपाट झाली. तीन जिल्ह्यांत २० हजार हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
या भागात सोमवार (ता. ८) पासून पावसाचे संकट निर्माण झालेले आहे. शुक्रवारी दुपारी मोताळा (जि. बुलडाणा) शहरासह तालुक्यात काही गावांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस व गारपीट झाली. सांगळद, बोराखेडी, खरबडी, आडविहीर, कोथळी, तरोडा, लोणघाट यासह अनेक गावांना गारपिटीचा फटका बसला.
त्यामुळे शेतकऱ्यांचा रब्बी पिकाचा तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला. मिरची, ज्वारी, मका, कांदा बी, तीळ, बाजरी, केळी, पपई यासह इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले. अनेक झाडे मुळासह उखडली.
मेहकर तालुक्यात बेलगाव, भोसा, मोहना मांडवा, नांदुरा तालुक्यात माटोडा व इतर गावांतही जोरदार पाऊस झाला. यात मका, कांदा बीजोत्पादन व इतर पिकांचे नुकसान झाले. वाशीम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यात डोंगरकिन्ही, शिरपूर जैन, केनवड व इतर भागात वादळी पाऊस झाला.
पातूरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी नुकसानीची पाहणी केली. आंब्याची झाडे, लिंबू बागा, उन्हाळी भुईमूग, कांदा आदी विविध पिकांचे नुकसान झाल्याचे त्यांना दिसून आले. सर्व तपशीलासह काटेकोर पंचनामे करावेत. एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये, असे निर्देश कुंभार यांनी यंत्रणांना दिले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.