
शेतकरी : उदय शिवाजी सावंत
गाव : करूळ, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग
एकूण क्षेत्र : ७.५ एकर
काजू लागवड : ४ एकर
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करूळ (ता. वैभववाडी) यांनी उदय सावंत यांनी ४ एकरांत काजू लागवड केलेली आहे. त्यात दोन झाडांत १६ फूट अंतरावर काजूची एकूण ६२० झाडे लावली आहेत. त्यात वेंगुर्ला-४ जातीची २५०, तर वेंगुर्ला ७ जातीची ३७० कलमे आहेत.
संपूर्ण लागवड डोंगरभागातील जमिनीत केली आहे. काजू बागेचे व्यवस्थापनासाठी ८० टक्के सेंद्रिय आणि २० टक्के रासायनिक खतांचा वापर केला जातो.
व्यवस्थापनातील बाबी
- साधारण जून महिन्यात पावसाचे प्रमाण कमी असताना, काजू झाडांना खत देण्याचे नियोजन असते. त्यानुसार सेंद्रिय आणि रासायनिक खतांची उपलब्धता केली जाते. खतांच्या मात्रा देण्यासाठी चर काढले जातात. त्यानंतर बागेतील पालापाचोळा, वाढलेले तण आणि वाढलेल्या खुरटी झुडपे तोडून चरामध्ये टाकले जाते.
- साधारणपणे जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत पावसाचे प्रमाण अधिक असते. या काळात बागेत कामे करणे शक्य होत नाही.
- सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस बागेमध्ये पुन्हा कामांना सुरुवात होते. पावसामुळे बागेतील तणांची पुन्हा जोमाने वाढ होते. पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर, ग्रास कटरच्या साह्याने संपूर्ण तण काढले जाते.
- पाऊस थांबल्यानंतर बागेभोवती आगरेषांची आखणी केली जाते. जेणेकरून बागेत वणवा लागून झाडांचे नुकसान होणार नाही.
- लागवड डोंगर आणि जंगल भागात असल्यामुळे झाडांना ताण लवकर बसत नाही. साधारण नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस पालवी फुटण्यास सुरुवात होते.
- डिसेंबर महिन्यात झाडांना मोहोर येण्यास सुरुवात होते. काजू लागवडीमध्ये सुरुवातीपासूनच कोणत्याही कीटकनाशकांची तसेच बुरशीनाशकांची फवारणी केलेली नाही.
हंगाम नियोजन
- या वर्षी फेब्रुवारी महिन्यापासून काजू बी परिपक्व होण्यास सुरुवात झाली. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून काजू हंगामाला गती आली आहे.
- सध्या हंगाम अंतिम टप्प्यात असून दररोज सकाळी काजू बी बोंडासह गोळा करणे, बोंड वेगळे करून काजू बी योग्य ठिकाणी साठवणूक इत्यादी कामे केली जातात.
- त्यानंतर काजू बी स्वच्छ पाण्यात धुऊन उन्हात वाळवून घेतले जातील. त्यानंतर पिशवीमध्ये भरून ठेवले जातात.
- हंगाम पूर्ण संपल्यानंतर झाडाखाली पडलेला पालापाचोला, पडलेले काजू बोंडे गोळा करणे इत्यादी काम केली जातील.
- मे महिन्यात झाडाखाली पडलेला पालापाचोळा गोळा करून झाडाच्या बुध्यांवर टाकला जाईल. त्यानंतर जुनमध्ये खतमात्रा देताना त्यावर थोडी माती टाकली जाते. त्यामुळे काजूच्या मुळांभोवती तणांचा प्रादुर्भाव कमी होतो.
- बागेतील मर झालेली झाडे काढून टाकली जातील. त्या ठिकाणी जून महिन्यात पुन्हा नव्या कलमांची लागवड केली जाईल. तत्पूर्वी मे महिन्यात कलम लागवडीसाठी खड्डे काढून त्यात सेंद्रिय खतांच्या मात्रा दिल्या जातील.
संपर्क - उदय शिवाजी सावंत, ९३७३९४२४५३ - (शब्दाकंन : एकनाथ पवार)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.