Amaravati News : सातत्याने वाढणाऱ्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर पाणी आणि चाऱ्याचा प्रश्न अतिशय गंभीर झाला आहे. त्यामुळे जनावरांना सांभाळणे हाताबाहेर जाऊ लागले आहे. गुरुवारी (ता. १८) भरलेल्या राजुरा बाजारात विक्रीला आलेल्या तब्बल २ हजार बैलजोड्यांमुळे ही विदारक स्थिती समोर आली.
वरुड तालुका हा संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. वरुड व लगतच्या मोर्शी या दोन तालुक्यात सुमारे ७० हजार हेक्टर संत्रा लागवड क्षेत्र आहे. त्यामुळेच या भागाला विदर्भाचा कॅलिफोर्निया असे म्हटले जाते. परंतु संत्रा बागा वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर झालेला पाण्याचा उपसा आणि त्या तुलनेत पुनर्भरण कमी झाल्याने पाण्याची पातळी खालावली.
त्यामुळेच या भागाला ड्राय झोन म्हणून घोषित करण्यात आले. परिणामी, दरवर्षी उन्हाळ्यात या भागात पाणी समस्या उग्ररूप धारण करते. त्याच कारणामुळे चाऱ्याचा प्रश्न देखील गंभीर होतो. सध्या अशीच स्थिती निर्माण झाल्याने पशुपालकांकडून मोठ्या प्रमाणावर पशुधन विक्रीसाठी बाजारात आणलेजात आहे.
वरुड बाजार समिती अंतर्गत भरणाऱ्या राजुरा येथील प्रसिद्ध गुरांच्या बाजारात तब्बल ४ हजार बैलांच्या दोन हजार जोड्या विक्रीसाठी आल्या होत्या. ग्रामीण भागात आतापासूनच पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले आहेत. त्यामुळे पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाल्याने शेतकरी आपल्याकडील पशुधन विक्रीसाठी काढत आहेत.
गाई- म्हशींचाही सौदा
या बाजारात १५० गाई आणि तितक्याच म्हशी देखील शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणल्या होत्या. त्यावरूनच ग्रामीण भागातील दुष्काळी स्थितीचे विदारक रूप स्पष्ट झाले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.