
डॉ. मनोज माळी
हळद लागवड होऊन सात महिन्यांचा कालावधी (२१० दिवस) पूर्ण झाला आहे. या कालावधीमध्ये पिकामध्ये हळकुंड भरणे ही महत्त्वाची अवस्था सुरु झालेली असते. या अवस्थेत हळकुंडाची जाडी आणि वजन वाढण्यास मदत होत असते. नव्याने आलेल्या फुटव्यांपासून हळकुंड भरण्याचा हा कालावधी असतो. यावेळी वातावरणात साधारणपणे १८ ते २० अंश सेल्सिअस तापमान असते. प्रकाश संश्लेषण क्रियेतून पानांत तयार झालेले अन्न खोडाद्वारे हळकुंडापर्यंत पोहोचत असते. अशावेळी पाने निरोगी राहणे गरजेचे असते.
हळद पिकाच्या योग्य वाढीसाठी सद्यःस्थितीत आंतरमशागतीची कामे वेळेवर करणे गरजेचे आहे. यामध्ये खते देणे, पाणी व्यवस्थापन, तण नियंत्रण, फुलांचे दांडे न काढणे इत्यादी महत्त्वाच्या कामांचा समावेश होतो. जर तापमान फारच कमी झाले, तर हळद पिकांवर विविध कीड-रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. परिणामी गड्ड्यांची संख्या आणि आकार यावर परिणाम होतो. अशावेळी हळद पिकाचे योग्य व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे.
आंतरमशागत (भरणी करणे)
हळद पिकाला मातीची भर लावलेली नसेल, तर फुटव्यांपासून नव्याने आलेले हळकुंड उघडे राहतात. हळकुंड सूर्यप्रकाशात सान्निध्यात आल्यास ते हिरवे पडतात आणि वाढ खुंटते. उघड्या राहिलेल्या हळकुंडावर किंवा गड्ड्यांवर कंदमाशी सारख्या किडी अंडी घालतात. त्यामुळे कंदकुज रोगाचा प्रसार होतो. त्यासाठी तत्काळ मातीची भर लावून हळकुंडे पूर्णपणे झाकून घ्यावीत. त्यामुळे हळकुंडांचे चांगले पोषण होऊन चांगली पोसली जातात.
हळदीच्या दोन्ही गड्ड्यांमधील मोकळ्या जागेमधील माती १.५ ते २ इंच शिपीच्या कुदळीने खणून दोन्ही बाजूंच्या गड्ड्यांना लावणे म्हणजेच भरणी करणे. भरणी केल्यामुळे नवीन येणारे हळकुंडे झाकले जाऊन त्यांची चांगली वाढ होते.
योग्यवेळी भरणी केल्यामुळे एकूण उत्पादनामध्ये साधारणपणे १० ते १५ टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
गादी वाफ्यावर भरणी करताना पॉवर टिलरच्या साह्याने किंवा दोन गादीवाफ्यांमधील जागेतील माती मोकळी करून गादीवाफ्यावर भर द्यावी. पॉवर टिलरद्वारे भरणी केल्यामुळे मजुरी खर्चात बचत होते. गादीवाफ्यावर ठिबक सिंचन केले असल्यास, भरणी करताना ड्रीपर मातीखाली जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
खत व्यवस्थापन
शाकीय वाढ पूर्ण झाल्यानंतर हळद पिकास कोणतीही नत्रयुक्त रासायनिक खते जसे युरिया देऊ नये. नत्रयुक्त खते दिल्यामुळे पिकाची अतिरिक्त शाकीय वाढ होते. परिणामी हळद पिकाची पुढील अवस्था जसे हळकुंड भरणे, हळकुंडाची जाडी आणि वजन वाढणे लांबणीवर पडते. ज्या ठिकाणी पोटॅशयुक्त खतांची कमतरता असेल, तेथे हेक्टरी १२५ किलो पांढरा पोटॅश द्यावा. त्यामुळे हळकुंडांचे वजन वाढून हळकुंडांना चकाकी येते.
सिंचन व्यवस्थापन
पावसाळा सुरू झाल्यानंतर पावसाचे पाणी जमिनीमध्ये साठून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकामध्ये पाणी साठून राहिले तर मुळांना हवा (ऑक्सिजन) घेण्यास अडथळा निर्माण होतो. परिणामी हळदीची पाने पिवळी, निस्तेज होऊन मलूल होतात. त्यासाठी पिकामध्ये साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा तत्काळ निचरा करावा.
वाकोऱ्याची शेवटची सरी कुदळीच्या साह्याने फोडून पाणी काढून द्यावे. जमिनीतील ओलावा अभ्यासून पाणी देण्याचे नियोजन करावे.
रुंद वरंबा पद्धतीने लागवड असल्यास ठिबक सिंचनाचा अवश्य उपयोग करावा. ठिबक सिंचनाच्या वापरामुळे पाण्याचा अपव्यय टाळला जाऊन जमिनीचे जैविक गुणधर्म सुधारण्यास मदत होते. परिणामी जमिनीमध्ये मुळांच्या भागांत वाफसा लवकर आणि जास्त प्रमाणात तयार होतो. त्यामुळे सूक्ष्मजिवांच्या क्रिया सुधारतात, मातीची सच्छिद्रता वाढते, जलधारणक्षमता वाढते, जमिनीची उत्पादनक्षमता वाढते. अन्नद्रव्यांचे वहन सुलभ होऊन हळद पिकांच्या मुळाद्वारे शोषण अधिक होते. सूक्ष्म पाने लवकर मोठी होतात. एकूण पीक उत्पादनात वाढ होऊन हळदीचा मुख्य गुणवत्ता घटक असलेल्या कुरकुमीन प्रमाण वाढण्यास मदत होते.
ठिबकद्वारे सिंचन करताना दोन लॅटरमधील अंतर ४ ते ५ फूट ठेवावे. दोन तोट्यांमधील अंतर जमिनीच्या प्रतीनुसार ठेवावे. रेताड जमिनीमध्ये तुषार किंवा ठिबक सिंचनाचा उपयोग अत्यंत उपयुक्त ठरतो. जमिनीतील ओलाव्यानुसार ठिबक संच चालू ठेवावा. सतत पाणी सोडू नये. त्यामुळे सतत ओलावा राहून हळकुंडे कुजण्याची शक्यता असते.
हळद पिकात उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत जमिनीत वाढणारे कंद आहेत. त्यामुळे जमिनीचे चार प्रमुख घटक जसे मातीचे प्रमाण, सेंद्रिय पदार्थ, हवा आणि पाणी यांचे संतुलन राखावे. जमिनीत केवळ मातीचे कण राहिले, तर जमीन कोरडी होते. त्यामुळे मुळांच्या वाढीला वाव मिळत नाही. जमिनीत पाणी जास्त झाले, तर जरुरीहून जास्त ओलेपणा (चिखल) होतो. परिणामी कंद कुजण्याचे प्रमाण वाढते. ज्या जमिनीत मातीचे प्रमाण ४५ टक्के, सेंद्रिय पदार्थ ५ टक्के, हवा आणि पाणी प्रत्येकी २५ टक्के असते, अशा जमिनीत पिकाची वाढ चांगली होते.
हिवाळ्यामध्ये पाण्याच्या दोन पाळ्यांमधील अंतर १२ ते १५ दिवस ठेवावे. पाऊस समाधानकारक असेल, तर हलक्या ते मध्यम प्रतीच्या जमिनीत पाण्याच्या १३ ते १५ पाळ्या द्याव्या लागतात. शिफारशीत मात्रेपेक्षा कमी पाणी पिकास मिळाल्यास कंदांची योग्य वाढ होत नाही. प्रक्रियेनंतर अशा हळकुंडांचा रंग फिका पडतो, चमक घटते. परिणामी विक्रीवेळी कमी दर मिळतो.
पीक आठ महिन्यांचे होईपर्यंत जमिनीच्या मगदुराप्रमाणे पिकास पाणी देत राहावे. कंद पोसण्याच्या कालावधीमध्ये पाण्याची गरज मर्यादित होत जाते.
फुलांचे दांडे न काढणे
शाकीय वाढ पूर्ण झाल्यानंतर हळदीला फुले येण्यास सुरुवात होते. काही जातींना अधिक, तर काही जातींना कमी प्रमाणात फुलांचे दांडे येतात. हळदीला फुले येणे म्हणजे शाकीय वाढीचा कालावधी संपून कंद सुटण्यास सुरुवात झाल्याचे लक्षण आहे. फुलांचे दांडे तसेच झाडावर ठेवल्यास हळद पिकाला त्याचा कोणताही तोटा होत नाही. फुलांचे दांडे काढणे हे काम खर्चीक आहे. संशोधनातील प्रयोगांती असे निदर्शनास आले आहे, की हळदीवर फुलांचे दांडे असल्यामुळे उत्पादनात कोणतीही घट येत नाही.
तसेच फुलांचे दांडे येणे ही न संपणारी क्रिया आहे. एकदा जरी दांडे काढले, तरी ते नव्याने येतच राहतात. फुले काढताना हळद पिकाच्या खोडाला इजा झाली, तर त्या भागातून दुय्यम बुरशींचा शिरकाव पिकात होऊन कंदकुज रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे हळद पिकास आलेली फुले तशीच राहू द्यावीत.
तण नियंत्रण
हळद पिकामध्ये शेणखताचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे शेणखतातून तणांचे बी शेतात येते. अवकाळी पाऊस झाल्यास, हे तणांचे बी मोठ्या प्रमाणात उगवून येते. या तणांचे वेळीच नियंत्रण होणे गरजेचे असते. तणांच्या तीव्रतेनुसार मजुरांच्या मदतीने निंदणी करून घ्यावी. तणनाशक फवारणी करणे टाळावे. तणनाशकाची फवारणी केली तर हळद पिकाच्या शारीरिक क्रियांवर विपरीत परिणाम होतो. तसेच उत्पादनात घट येण्याची शक्यता असते.
डॉ. मनोज माळी, ९४०३७ ७३६१४
(लेखक महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत हळद संशोधन केंद्र, कसबे डिग्रज जि. सांगली येथे प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.