
Weather Update : मार्च ते मे या काळात देशातील बहुतांश भागांत उष्णतेची लाट येण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) (IMD) वर्तवला आहे.
‘आयएमडी’चे ज्येष्ठ शास्त्रज्ञ एस. सी. भान (S.C. Bhan) यांनी मंगळवारी (ता. २८) पत्रकार परिषद घेऊन हवामान अंदाजाची माहिती दिली. मार्चपासून मे महिन्यापर्यंतच्या काळात देशात सर्वत्रच सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली.
देशात उष्णतेची लाट आली तर त्याचा मोठा परिणाम कृषी क्षेत्रावर होणार आहे. वाढत्या उष्णतेमुळे अनेक पिकांचे उत्पादन घटण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे महागाई वाढेल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
यंदाचा फेब्रुवारी महिना हा गेल्या १२२ वर्षांतला सगळ्यात उष्ण फेब्रुवारी ठरला आहे. १९०१ नंतर यंदा पहिल्यांदाच फेब्रुवारीमध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा १.७३ अंश जास्त राहिले, तर किमान तापमान सरासरीपेक्षा ०.८१ अंश जास्त राहिले.
चक्रीवादळांची घटलेली संख्या, त्यामुळे झालेला मर्यादित पाऊस ही फेब्रुवारीतील उष्णतेची प्रमुख कारणे असल्याचे भान यांनी सांगितले. तसेच मार्च महिना फेब्रुवारीपेक्षा उष्ण ठरेल, असा इशाराही त्यांनी दिला.
आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार ईशान्य भारतासह पूर्व आणि मध्य तसेच वायव्य भारतात मार्च ते मे या तीन महिन्यांत सरासरीपेक्षा जास्त कमाल तापमान राहण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यात किमान तापमानही चढे राहण्याची शक्यता आहे.
दिवस-रात्रीतील तापमानात लक्षणीय तफावत राहण्याची चिन्हे आहेत. मध्य भारतात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.