Yavatmal News : पूरस्थिती निर्माण होत संपर्क तुटणाऱ्या गावांतील नागरिकांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय लागावी याकरिता उपाययोजना केल्या जात आहेत. अशा ५१ गावांकरिता तीन महिन्यांच्या अन्नधान्याची तरतूद करण्यात आली असून, येत्या ३१ मे पर्यंत ते गावपातळीवर पोहोचविण्यात येणार आहे.
मॉन्सून काळात जिल्ह्यातील ५१ गावे सर्वाधिक बाधित होतात. या गावांमध्ये आलेल्या पूरामुळे या गावांचा संपर्क तुटतो. यापूर्वी अनेकदा अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर संपर्क तुटणाऱ्या या गावांमध्ये पूरस्थितीच्या काळातही अन्नधान्याची उपलब्धता असावी यावर प्रशासनाकडून भर दिला जात आहे.
त्यानुसार दहा तालुक्यांतील या ५१ गावांमध्ये नवसंजीवनी योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून तीन महिन्यांचे धान्य एकाचवेळी गावपातळीवर पाठविण्यात येईल. रास्त भाव दुकानदार अशा धान्याचा साठा करून ठेवणार आहेत.
मात्र दुकानात असलेले धान्य दर महिन्यालाच न्यावे लागणार असल्याचे पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे. यामुळे नियमित मागणीनुसार विक्रेत्यांकडे धान्य उपलब्ध राहील. यामध्ये गहू, तांदूळ या धान्यांचा समावेश आहे.
धान्य अंत्योदय आणि प्राधान्य गटातील कुटुंबासाठीच राहील, असेही पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. धान्याच्या वितरणाकरिता सर्वसामान्यांना माहिती व्हावी यासाठी गावात दवंडी दिली जाणार आहे. ३१ तारखेपर्यंत हे धान्य गावस्तरावर पोहोचणार आहे.
...या तालुक्यांचा आहे समावेश
वणी, झरी, घाटंजी, केळापूर, दिग्रस, यवतमाळ, दारव्हा, महागाव, आर्णी, उमरखेड या दहा तालुक्यांतील ५१ गावांचा योजनेत समावेश आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.