
Sangli News : यंदाचा मॉन्सून संपत आला, तरी पावसाने ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रावर वक्रदृष्टी ठेवल्याने २३ जुलैला सुरू करण्यात आलेल्या ताकारी योजनेचे पाणी तासगाव तालुक्यातील मतकुणकीजवळून वाहत आहे. हे पाणी दोनच दिवसांत शेवटच्या १४४ किलोमीटरपर्यंत सोनी-भोसे (ता. मिरज) येथे पोहोचण्याची शक्यता आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी दिली.
टंचाईग्रस्त तालुक्यांसाठी ताकारी उपसा योजनेचे यंदा पावसाळ्यात सुरू झालेले पाण्याचे आवर्तन कडेगाव व खानापूर तालुक्यातील लाभक्षेत्राची तहान भागवून सध्या तासगाव तालुक्यातील मुख्य कालव्याच्या १३३ किलोमीटरवर मतकुणकीजवळून वाहत आहे. हे पाणी मागणीनुसार मुख्य कालव्याच्या शेवटी १४४ किलोमीटरवर सोनी (भोसे) या मिरज तालुक्यातील गावापर्यंत पोहोचवण्याचा उद्देशआहे. ‘ताकारी’चे हे पाणी २३ जुलैला सुरू झाले असून बारमाही पिकांसह उन्हाळी शेतीला या पाण्याचा फायदा होत आहे. सुरवातीचे दहा दिवस कडेगाव तालुक्यातील सिंचनक्षेत्राला पाणी दिल्यानंतर खानापूर तालुक्यातील पिकांची होरपळ पाण्याने थांबविली.
आता तासगाव तालुक्यातील मतकुणकीच्या पुढे गेले आहे. ऐन पावसाळ्यात या पाण्याने पिण्यासाठी व लाभक्षेत्रातील पिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. दरम्यान, दूर पल्ल्यावर गेल्यावर मुख्य कालव्यातील पाण्याचा दाब भरपूर राहावा, यासाठी टप्पा १ आणि २ वरील प्रत्येकी ११ पंप सुरू करण्यात आले आहेत. शिवाय टप्पा ३ वरील २ व टप्पा ४ वरील २ पंपांचे पाणी सोनहिरा खोऱ्यातील पिकांसाठी सोडण्यात आले आहे. ते पुढे तडसर भागातही जात असते.
या पाण्याचा लाभ बारमाही बागायती शेतीसह कडेगाव, खानापूर, पलूस आणि तासगाव तालुक्यातील बऱ्याच गावांच्या पाणीपुरवठा योजनांना होतो. यंदा पावसाने या भागाला आजतागायत दिलेल्या हुलकावणीमुळे सर्वत्र जमिनीतील पातळी खालावून पाणीप्रश्न बिकट झाला होता. या पाण्याने सद्यःस्थितीत पाणीप्रश्न मिटला असला तरी हे पाणी जमिनीत किती दिवस टिकणार, हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावीत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.