Weather Update : अबब...तापमानाची पन्नाशी

Weather News : सूर्य आग ओकत असल्याने भारत आणि पाकिस्तानमध्ये कमाल तापमानाचा आगडोंब उसळला आहे. गेल्या काही दिवसांत सातत्याने वर सरकणाऱ्या पाऱ्याने पन्नाशी गाठली आहे.
Weather Summer Update
Weather Summer Updateagrowon

Pune News : सूर्य आग ओकत असल्याने भारत आणि पाकिस्तानमध्ये कमाल तापमानाचा आगडोंब उसळला आहे. गेल्या काही दिवसांत सातत्याने वर सरकणाऱ्या पाऱ्याने पन्नाशी गाठली आहे. शनिवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पाकिस्तानातील जाकोबाबाद येथे तापमानाचा पारा तब्बल ५० अंश सेल्सिअसवर पोहचला आहे. तर भारतात राजस्थानातील फालोदी येथे तापमान ४९ अंशांवर पोचले आहे.

जागतिक हवामानाच्या तीव्र घटकांच्या नोंदी घेणाऱ्या ‘अलडोरॅडो वेदर’ या संकेतस्थळाच्या नोंदीनुसार पाकिस्तान, भारत, नायजर आणि अल्जेरिया या देशांमध्ये सूर्याचा प्रकोप पहायला मिळत असून, जमिनीवर वणवा पेटला आहे. पाकिस्तानातील जाकोबाबाद येथे तापमान जगातील उच्चांकी ५० अंशांवर पोचले आहे. भारत आणि पाकिस्तानातील तब्बल दहा शहरांमध्ये पारा ४७ अंशांच्या पार पोचल्याने उष्णतेची अतितीव्र लाट आली आहे.

Weather Summer Update
Monsoon Rain : माॅन्सूनची वाटचाल कायम; माॅन्सून २४ तासात आणखी पुढे सरकणार; राज्यात पावसाचा अंदाज

पाकिस्तानसह भारतातही तापमानाच्या उष्ण लाटेचा तडाखा बसला आहे. राजस्थानचे फालोदी हे शहर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे उष्ण शहर ठरले असून, तेथे देशाचे यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४९ अंश तापमान नोंदले गेले आहे. जैसलमेर, बारमेर आणि जोधपूर या शहरांचाही जगातील पहिल्या दहा उष्ण शहरांमध्ये समावेश आहे. कोटा आणि गंगानगर देखील चांगलेच तापले आहे.

फालोदीचा विचार करता ४९ अंश हे तेथील आतापर्यंतचे सर्वोच्च तापमान ठरले आहे. यापूर्वी २२ मे १९९८ रोजी तेथे ४८.८ अंश तापमानाची नोंद झाली होती. देशातील तापमानाच्या नोंदी पाहता बारमेर येथे १० मे १९९५ रोजी आणि चुरू येथे २५ मे १९९८ रोजी देशातील आतापर्यंतचे उच्चांकी ४९.९ अंश तापमान नोंदले गेले आहे.

Weather Summer Update
Heat Wave : तापमानाचा हंगामातील उच्चांक

दरम्यान अफगाणिस्तान, पाकिस्तानमधून राजस्थानमार्गे ताशी ३५ ते ४० किलोमीटर वेगाने उष्ण वारे गुजरात आणि महाराष्ट्र, मध्य प्रदेशकडे येत आहेत. पाकिस्तान व राजस्थानातून वाहणारे उष्ण वाऱ्यांचे प्रवाह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भासह राज्याच्या विविध भागात उष्मा वाढण्यास कारणीभूत ठरत आहे. विदर्भातील अकोला, बुलडाणा आणि खानदेशातील जळगाव येथे तापमानाचा पारा ४५ अंशांपार आहे.

थोडक्यात महत्त्वाचे...
- पाकिस्तान, भारत, नायजर आणि अल्जेरिया या देशांमध्ये सूर्याचा प्रकोप
- जमिनीवर वणवा पेटला
- भारत आणि पाकिस्तानातील तब्बल दहा शहरांत उष्णतेची अतितीव्र लाट
- राजस्थानचे फालोदी हे शहर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे उष्ण शहर

जगभरातील सर्वात उष्ण शहरे (सौजन्य : अलडोरॅडो वेदर)

शहर (देश)---तापमान (अंश सेल्सिअस)
जाकोबाबाद (पाकिस्तान)---५०
फालोदी (भारत)---४९
रोहरी (पाकिस्तान)---४८.४
जैसलमेर (भारत)---४८.३
बारमेर (भारत)---४८.२
खानपूर (पाकिस्तान)---४८.२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com