
अॅग्रोवन वृत्तसेवा
Akola News : अकोला ः ग्रामीण भागात शेतीला वीजपुरवठ्याचा विषय गंभीर झालेला आहे. शेतकऱ्यांना आठवड्यातील अर्ध्याअधिक रात्री शेतातच जागावे लागते. थंडीच्या काळात मजूरसुद्धा रात्री कामाला यायला तयार नसतात. आता रब्बीची लगबग सुरू झाली असून शेतकऱ्यांच्या या समस्येकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नसल्याची संतप्त भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.
डोंगरकिन्ही (ता. मालेगाव, जि. वाशीम) येथील हेमंत देशमुख म्हणाले, की आम्हाला पूर्ण वेळ वीज कधीच मिळत नाही. आठवड्यातले चार दिवस रात्री एक वाजता वीज येते. सकाळी नऊ वाजता जाते. रात्री एक वाजता वीज येत असल्यामुळे पूर्ण रात्रभर जागून वीज पुरवठ्याची वाट बघावी लागते. त्यानंतरही वीज आल्यानंतर ती पूर्णदाबाने व सलग सुरू राहत नाही. त्यामुळे शेतीला पाणी देण्यासाठी खूप कसरत करावी लागते. सध्या खूप थंडी असल्यामुळे मजूरसुद्धा पाणी देण्यासाठी टाळाटाळ करतो. रात्री एक वाजता वीज देण्याची ही कोणती पद्धत आहे, हे संबंधित विभागाने सांगितले पाहिजे.
जानेफळ (ता. मेहकर) येथील महादेव पाटील म्हणाले, की आम्हाला दिवसा वीज मिळाली की आठ तासांतील चारच तास पुरवठा सुरू असतो. उर्वरित चार तास कमी दाबाने किंवा तांत्रिक कारणांमुळे वीज बंद राहते.
शेतकरी निंबाजी लखाडे म्हणाले, की शेतकऱ्यांचे सर्वत्रच हाल होत आहेत. वीज पुरवठ्याच्या बाबतीत महावितरण कंपनी व सरकार दोघेही गांभिर्याने लक्ष देत नाहीत. वळती (ता. चिखली, जि. बुलडाणा) येथील मोहन जगताप म्हणाले, की आता रात्रीचा वीजपुरवठा असल्याने एवढ्या थंडीत रात्री साडेबाराला टप्पा बदलावा लागला. रोहित्रावरील भार जास्त असल्याने व दिवसा दुरुस्तीचे काम केले जात असल्याने दिवसा वीज सुरळीत चालत नाही. वीज रात्री सुरळीत चालते पण कडाक्याच्या थंडीत जंगली जनावरांची भीती राहते. यामुळे सुखरूप घरी येईपर्यंत शेतकऱ्यांच्या घरात चिंताच राहते.
जानेफळ (जि. बुलडाणा) येथील रमेश निकस म्हणाले, की शेतीला वीज तीन दिवस रात्री व तीन दिवस दिवसा मिळते. एक दिवस पूर्णतः बंद ठेवण्यात येते. दररोज दुरुस्तीच्या कामासाठी वीजपुरवठा बंद ठेवला जातो. दिवसभरात दोन-तीन वेळ फ्युज उडतात. वेळेवर लाईनमन नसतो. आता तर बिल नाही तसाच लाईनमनही नाही, अशी अवस्था तयार झाली आहे. आम्हाला फुकट नको, पैसे घ्या पण वीजपुरवठा दिवसा व वेळेवर तर द्या.
सीताफळाचा पूर्ण हंगाम संपला व संत्र्याचा सुद्धा अर्धा हंगाम संपत आला आहे. आम्हाला एकदाही ठिबकमधून खते देता आलेली नाहीत. दोन महिने शेतातील वीजच नव्हती. आता १५ दिवसांपासून पुरवठा सुरू केला. तर आम्हाला फक्त आठ तास वीजपुरवठा केला जातो. त्यातही सुरळीत फक्त चार ते पाच तास वीज मिळते. त्यामध्ये रोहित्र जळणे ही नेहमीचीच समस्या आहे. यामुळे रब्बीसाठी तयार केलेले शेत खाली ठेवायची वेळ आमच्यावर आली आहे. आता तर महावितरणने शेतकऱ्यांना शेतीसाठी स्वखर्चाने वीजपुरवठा देणेसुद्धा बंद केले आहे. यावर कोणीही बोलायला तयार नाही.
- प्रभाकर खुरद, शेतकरी, भोसा, जि. बुलडाणा
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.