Marxist Communist Party : लाल वादळाची तूर्त माघार, पुन्हा लढ्याचा निर्धार
Nashik News : वनहक्क दाव्यासह कांदा निर्यातबंदी व आशा सेविकांच्या मानधनवाढ या बाबत येत्या तीन महिन्यांत कार्यवाही पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले. त्यानंतर ‘लाल वादळ’ने अखेर आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील तीन महिन्यांत आश्वासनांची पूर्तता न झाल्यास पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरासमोर मालेगावला आंदोलन करण्याचा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते जे. पी. गावित यांनी दिला.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता काळात आंदोलकांच्या मागण्या मार्गी लावण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर असेल. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाअंतर्गत असलेल्या विविध संघटनांचे प्रतिनिधी व आदिवासी शेतकऱ्यांनी एकूण १८ मागण्यांसाठी आठ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला.
या कालावधीत एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांसह पालकमंत्री भुसे यांच्यासोबत मुंबईत बैठक झाली. दोन वेळा पालकमंत्र्यांनी बैठक घेतली; परंतु लेखी आश्वासन व प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन न उठविण्याचा निर्धार गावित यांनी केला होता. त्यामुळे निर्णय होऊनही आंदोलन कायम असल्याचे दिसून आले.
अखेर सोमवारी (ता. ४) भुसे व गावित यांच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यात पालकमंत्र्यांनी मागण्या मान्य करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यावर आंदोलकांच्या शिष्टमंडळाने विश्वास दाखविला आणि आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला. बैठकीतील निर्णय झाल्यानंतर भुसे व गावित पायी आंदोलकांपर्यंत पोचले आणि सर्वांसमोर त्यांनी चर्चेचा सारांश सांगितला.
या आंदोलकांसमोर पालकमंत्र्यांनी लेखी आश्वासन गावितांना दिले. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडलेले आंदोलक रात्रीच घराकडे निघाले. शिष्टमंडळाच्या चर्चेप्रसंगी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांसह अधिकारी उपस्थित होते.
परतीच्या प्रवासाला सुरवात
आंदोलन स्थगित झाल्याची घोषणा होताच आंदोलकांनी गावाकडे निघण्याची तयारी सुरू केली. सरपण, तांदूळ, मसाले, चुली व गॅस शेगडी गाडीत टाकून घराची वाट धरली. काहींनी गाड्यांची व्यवस्था स्वत:केली होती. रात्री उशिरापर्यंत ही आवराआवर सुरू राहिली. मंगळवार (ता.५) पासून ‘स्मार्ट रस्ता’ पूर्ववत होणार आहे.
दीड तासाच्या चर्चेअंती तोडगा
पालकमंत्री भुसे यांनी सोमवारी दुपारी आंदोलकांचे शिष्टमंडळ व अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेतली. तब्बल दीड ते दोन तास विविध विषयांवर चर्चा झाल्यानंतर लेखी आश्वासन देण्याचा तोडगा पालकमंत्र्यांनी काढला. आश्वासनांची पूर्तता न झाल्यास मालेगावला आंदोलन करा, पण तूर्त महामुक्काम आंदोलन स्थगित करावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. त्यांच्या शब्दावर विश्वास दाखवत आंदोलकांनी माघार घेतली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.