Sugarcane Season : मराठवाड्यातील ४४ कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला

Sugarcane Crushing : मराठवाड्यातील यंदाच्या ऊस गळतात सहभागी ६१ कारखान्यांपैकी ४४ कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम आटोपला आहे.
Sugarcane Season
Sugarcane FactoryAgrowon

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील यंदाच्या ऊस गळतात सहभागी ६१ कारखान्यांपैकी ४४ कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम आटोपला आहे. गाळपात सहभागी होणाऱ्या कारखान्यांनी आजवर दोन कोटी ५३ लाख ८ हजार ३७५ टन उसाचे गाळप करत दोन कोटी ४२ लाख ७१ हजार ८६ क्विंटल साखरेचे उत्पादन केले. हे उत्पादन करताना लातूर जिल्ह्यातील कारखान्यांचा सरासरी साखर उतारा सर्वाधिक, तर बीड जिल्ह्यातील कारखान्यांचा सर्वांत कमी राहिला आहे.

यंदाच्या ऊस गाळपासाठी सहभागी होणाऱ्या ६१ कारखान्यांमध्ये धाराशिव जिल्ह्यातील १४, छत्रपती संभाजीनगरमधील ६, जालन्यातील ५, बीड व परभणीतील प्रत्येकी ७, हिंगोलीतील ५, नांदेडमधील ६ व लातूरमधील ११ कारखान्यांचा समावेश आहे. या कारखान्यांपैकी धाराशिवमधील १२, छत्रपती संभाजीनगरमधील ५, जालन्यातील १, बीड व परभणीतील प्रत्येकी ६, हिंगोलीतील ४, नांदेड व लातूरमधील प्रत्येकी ५ कारखान्यांचा गाळात आटोपला आहे.

Sugarcane Season
Sugarcane Season : यंदाचा ऊस गळीत हंगाम लांबला, १५७ कारखान्यांचे धुराडे बंद

बहुतांश कारखान्यांचा गाळप हंगाम मार्चच्या अखेरीस, तर काही कारखान्यांचा गाळप हंगाम फेब्रुवारी अखेरीसच आटोपला होता. क्षमतेनुसार कारखान्यांचे होणारे गाळप पाहता जालना जिल्ह्यातील अंबड, घनसांगवी तालुक्यात साधारणतः ७५ हजार टन ऊस शिल्लक राहण्याची शक्यता आहे. शिल्लक राहणारा हा ऊस परभणी, बीड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर आदी जिल्ह्यांतील कारखान्यांच्या मदतीने संपविण्याचे नियोजन कारखाना व प्रशासन स्तरावर झाले आहे.

साधारणतः १६ एप्रिलपर्यंत छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालय अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील सर्व २२ कारखाने गाळप करून बंद होण्याची शक्यता साखर विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे. नियोजित गाळप करूनही ऊस शिल्लक राहणाऱ्या जालना जिल्ह्यातील सर्वाधिक चार कारखान्यांच ऊस गाळप अजूनही सुरू आहे. याशिवाय परभणी, बीड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांतील प्रत्येकी एका कारखान्याचा ऊस गाळप हंगाम अजूनही सुरू आहे.

Sugarcane Season
Sugarcane Season : पुणे जिल्ह्यातील चार कारखाने बंद

वाढते ऊन, त्यात मजुरांची वानवा

शिल्लक राहणाऱ्या उसाच्या गाळपासाठी मजुराचा प्रश्‍न ऐरणीवर आहे. वाढत्या उन्हामुळे मजुरांच्या मदतीने गाळपासाठी ऊस तोडणी अवघड आहे. हे लक्षात घेऊन शिल्लक राहणारा ऊस ७० टक्के मशिनच्या साह्याने व ३० टक्के मजुरांच्या मदतीने संपविण्याचे नियोजन केले असल्याचे साखर विभागाच्या सूत्रांनी सांगितले. अर्थात, नियोजनानुसार मजुरांची उपलब्धता राहण्याची शक्यता कमीच आहे. शिवाय या सर्व नियोजनात किती सुसूत्रता राहून उसाचं शेवटचं टिपरू गाळपात येईपर्यंत प्रशासनाला कारखाने कशा पद्धतीने सहकार्य करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

जिल्हानिहाय कारखान्यांचा सरासरी साखर उतारा

जिल्हा उतारा

धाराशिव ९.१९

छत्रपती संभाजीनगर ९.७४

जालना ९.५

बीड ८.२२

परभणी ९.९

हिंगोली ९.९४

नांदेड ९.९५

लातूर १०.६५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com