Jalgaon News : मोहिदे (ता. चोपडा, जि. जळगाव) व होळनांथे (ता. शिरपूर, जि. धुळे) या दोन गावांना जोडणाऱ्या अनेर नदीवरील पूल धोकादायक बनला आहे. या पुलाला संरक्षणाच्या दृष्टीने आवश्यक असलेले कठडेच नाहीत. त्यामुळे लहान-मोठे अपघात होऊन अनेक जण गंभीर जखमी झाले असून, काहींचा तर मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मोहिदे व होळनांथे या दोन गावांना जोडणारा हा पूल २००६ मध्ये मंजूर झाला होता. जवळपास परिसरातील २५ गावांशी संबंध येणाऱ्या या पुलाची सद्यःस्थितीत अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. कठडे नसलेल्या या पुलावर जागोजागी लहानमोठे खड्डे पडून लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत.
या संदर्भात मोहिदेच्या सरपंच शोभाबाई पाटील व डॉ. पवन पाटील यांनी धुळे येथील सार्वजनिक बांधकाम कार्यालयात दोन तीनदा लेखी तक्रारी केल्या आहेत. मागील शुक्रवारी (ता. २४) पहाटे वसंत डुमन पाटील हे पुलावरून जात असताना समोर येणाऱ्या मोटरसायकलच्या हेडलाइटचा प्रकाश त्यांच्या डोळ्यांवर आला. त्यामुळे त्यांना पुढचा रस्ता न दिसल्याने व पुलास कठडे नसल्याने त्यांच्या तोल जाऊन ते पुलावरून खाली पडून गंभीर जखमी झाले.
लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष
अनेर नदीवरील पूल हा दोन तालुक्यांच्या दरम्यान येत असल्याने काम कोण करणार? यामुळे या पुलाची साधी दुरुस्तीदेखील करण्यासाठी लोकप्रतिनिधी दखल घेत नाही. विशेष म्हणजे, दोन्ही जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधींकडे त्या त्या भागातील नागरिकांनी मागणी करून त्यांनी दखल घेतली नसल्याचे दिसून येत आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.