Pune News : नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी आणि आदिवासी यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा रविवार (ता.०३) ७ वा दिवस आहे. शेतकरी आणि आदिवासी यांच्या विविध मागण्यांसाठी किसान सभा आणि माकपने जोरदार आंदोलन पुकारले आहे. तर गेल्या वेळीचा अनुभव पाहता जोपर्यंत सर्व मागण्या मान्य होतील याची खात्री पटत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, इथेच थांबून प्रतीक्षा करू, असे माजी आमदार जे.पी.गावित यांनी म्हटले आहे.
वनजमिनीच्या प्रमुख मागणीसह विविध अशा १८ मागण्यांसाठी सोमवार (ता.२६) पासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किसान सभा आणि माकपच्या नेतृत्वात शेतकरी आणि आदिवाशी आंदोलन करत आहेत. तर सरकार दरबारी या मागण्या मांडण्याचे काम माजी आमदार जे.पी. गावित करत आहेत. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शुक्रवारी (१ मार्च) सायंकाळी मुंबईत बैठक पार पडली होती.
यावेळी पालकमंत्री दादा भुसे, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्यासह शिष्टमंडळाचे प्रमुख माजी आमदार जे. पी. गावित, डॉ. डी. एल. कराड आदी उपस्थित होते. मात्र कार्यवाहीबाबत अनुकूलता जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आंदोलनावर ठाम राहण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली होती.
शुक्रवारी (ता. ०१) मुख्यमंत्री आणि आंदोलकांच्या शिष्टमंडळासह संबंधीत मंत्री यांच्यात चर्चा झाली. यात आंदोलक बांधवांच्या विविध मागण्या या पुढील तीन महिन्यांत मार्गी लावाव्यात, दर १५ दिवसांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी आढावा बैठक घेऊन याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयास द्यावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रधान सचिव विकास खरगे यांना वन हक्क आणि तर इतर प्रश्न तीन महिन्यांच्या आतमध्ये सोडवण्याचे आदेश दिले आहे.
तसेच कांदा निर्यातबंदी उठवण्याबाबात केंद्र सरकारशी चर्चा असून आठ दिवसात यावर निर्णय होईल. अंगनवाडी सेवीका आणि आशा वर्कर यांच्याबाबत योग्य भूमिका घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी आंदोलक शिष्टमंडळासह गावित यांना दिले होते.
दरम्यान शनिवारी (ता.२) पुन्हा जिल्हाधिकारी दालनात पुन्हा बैठक पार पडली. यावेळी आंदोलन मागे घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव दिला. तो प्रस्ताव गावित यांच्यासह आंदोलकांच्या शिष्टमंडळाने मान्य केलेला नाही.
यावेळी गावित यांनी, सरकारवर आता विश्वास नसल्याचे स्पष्ट करत, मागण्यांवर थेट कारवाई सुरू करा, अशी मागणी केली. आम्ही आमच्या मागण्या सरकारपर्यंत पाठवल्या आहेत. यावर काम युद्ध पातळीवर करू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. तसेच जिल्हाधिकारी यांनी आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली आहे.
मात्र आम्ही आजवर पाच ते सहा दिवस आंदोलनाला बसलो आहोत. काही मिळालेले नाही. यामुळे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत. तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. कोणताही शेतकरी आदिवासी घरी परतणार नाही. सर्व रस्त्यावरच मुक्काम करतील, असा विश्वास गावित यांनी व्यक्त केला. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये उद्या बैठकीत ठोस निर्णय न झाल्यास जेलभरो आंदोलन करू, असा इशारा गावित यांनी दिला आहे.
बैठका निष्फळ
वनजमिनीच्या प्रमुख मागणीसह विविध अशा १८ मागण्यांसाठी सोमवार (ता.२६) पासून सुरू असणाऱ्या ठिय्या आंदोलनावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. पालकमंत्री दादा भूसे यांनी आंदोलनाच्या पहिल्यांच दिवशी बैठक घेतली होती. यावेळी कोणताच तोडगा निघाला नाही. यानंतर मुंबईत बैठका झाल्या या सुद्धा असफल झाल्या. यामुळे रविवार (ता.०३) सायंकाळी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत आंदोलकाच्या शिष्टमंडळाची बैठक पुन्हा होणार आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.