Sangli News : ऊसदरासंदर्भात दत्त इंडिया प्रा. लि. कारखान्याच्या (वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना) प्रशासनासोबतची चर्चा फिस्कटल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
ऊस दरासाठी स्वाभिमानीने रविवारी (ता. १०) सांगलीतील दत्त इंडिया कारखान्यावर धडक दिली. यावेळी पोलिसांनी गेटवर कार्यकर्त्यांना अडवले. यादरम्यान कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात झटापट झाल्याने कार्यकर्त्यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह गेटवर ठिय्या दिला.
कारखाना प्रशासनासोबत झालेल्या चर्चेत कोणतीही तोडगा न निघाल्याने स्वाभिमानीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. संघटनेचे पोपट मोरे, महेश खराडे, संदीप राजोबा आदींनी जोरदार घोषणाबाजी करत कारखान्याच्या मुख्य गेटकडे आगेकूच केली. पोलिसांनी मुख्य गेटसह कारखान्यात जाणारे सर्व रस्ते बंद केले होते.
कार्यकर्त्यांनी गेटमधून आत जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अडवल्यामुळे झटापट होऊन धक्काबुक्की झाली. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत व विनंती करत कार्यकर्त्यांना रोखले. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी गेटसमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले. काही वेळातच याठिकाणी शेट्टीही आले. त्यांनीही ठिय्या आंदोलनात सहभागी होत दर मिळाल्याशिवाय माघार नाही, अशी भूमिका घेतली.
सांगलीचे जिल्हाधिकारी कारखानदारांनी सामील झाल्याचे गंभीर आरोप शेट्टी यांनी केला आहे. शेट्टी म्हणाले की, ऊसदराचा तोडगा काढण्यात जिल्हाधिकारी अपयशी ठरले आहेत. सरकारने चुकीच्या माणसाला सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणून पाठवले आहे. जिल्ह्यात १६ कारखाने सुरू असून त्यापैकी ११ कारखाने जयंत पाटील आणि विश्वजीत कदम यांचे आहेत. त्या दोघांचे नियंत्रण कारखान्यांवर आहे. त्यामुळे दोघांनी शेतकऱ्यांचे पैसे द्यायचे नाहीत, असे ठरवले आहे.
शेट्टी पुढे म्हणाले, सांगलीतल्या साखर कारखानदारांचा अहंकार मोडून काढू. जिल्हा प्रशासन कोणाच्या इशाऱ्यावर चालते हे सर्वांना माहीत आहे. जयंत पाटील यांनी माझ्यावर आरोप करण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाचे आमदार काय करतात, याकडे पहावे.
१ डिसेंबररोजी ऊसदरासाठी राजारामबापू कारखान्यावर आंदोलन झाले होते. यावेळी इस्लामपूरचे प्रांताधिकारी, तहसिलदार यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करत याप्रश्नी आठवड्याभरात बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. पंरतु या दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांकडून बैठकीसंदर्भात कोणतीच कार्यवाही न झाल्याने बैठक झाली नाही. परिणामी स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, आज सकाळपासून दत्त इंडिया कारखान्यावर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले. कारखाना प्रशासन आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यात एक वाजता बैठक झाली. परंतु या बैठकीत कोणताही तोडगा निघाली नाही. त्यामुळे संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी गेट तोडून कारखान्यात घुसण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापटही झाली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.