
Vasai News : पालघर जिल्ह्यात (Palghar District) अवकाळी पावसाने ऐन हंगामातच ‘शिमगा’ केला. अवेळी झालेल्या पावसामुळे विविध पिके घेणाऱ्या बागायतदारांचे अतोनात नुकसान झाले. मोठ्या मेहनतीने उभी केलेली शेती-बागायती डोळ्यांदेखत भुईसपाट झाल्याने बळीराजा हतबल झाला आहे.
याबाबतचे पंचनामे शासकीय स्तरावर नोंद करता यावेत म्हणून जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी विभागाकडून तालुक्यातील अधिकाऱ्यांना तातडीने सूचना देण्यात आल्या असून, प्रशासनाकडून होणाऱ्या पंचनाम्यानंतरच जिल्ह्यातील शेती-बागायतीमधील नुकसानीचा नेमका आकडा समोर येणार आहे.
दरम्यान, अवकाळी पावसाने जिल्ह्यात कहर केला असल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला उत्पन्नाचा घास हिरावून घेतला गेला असून, शासकीय मदतीवरच शेती-बागायतदारांची मदार असणार आहे.
जिल्ह्यातील वसई, विक्रमगड, वाडा, मोखाडा, जव्हार, डहाणू, तलासरी, बोईसर व पालघर तालुक्याला पाऊस, ढगाळ वातावरणाची झळ सोसावी लागली.
अगोदरच चिकू व्यावसायिक बाजारभाव कमी मिळाल्याने मेटाकुटीला आले असून, यंदा आंबा चांगले उत्पन्न मिळवून देईल, अशी आशा होती.
परंतु अवकाळीमुळे मोहोर आंब्याचा मोहोर गळून पडल्याने हापूस, पाचपायरीसह अन्य जातीच्या आंबा लागवडीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्याची मेहनत व पैसा पाण्यात जाणार आहे.
शेतीमालाच्या विक्रीवर परिणाम
पावसाने हवामानात बदल झाल्यामुळे लागवडीखालील असलेल्या पिकांवर कीड, बुरशी व अन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊन उत्पादन घटू शकते. त्याचा थेट परिणाम बाजारपेठेत विक्रीसाठी जाणाऱ्या शेतमालावर होणार आहे.
कमी उत्पन्न व बाजारभाव या दोहोंचाही ताळमेळ गाठणे अशक्य होणार असल्यामुळे शेतीचे पंचनामे करून तात्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.