
Nandurbar Crop Damage News : नंदुरबार जिल्ह्यात रविवारी (ता. ४) आलेल्या वादळी वादळामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त भागात महसूल व कृषी विभागाच्या पथकाने पंचनामे पूर्ण केले आहेत. त्यात शहादा व तळोद्यातील केळी पिकाचे सुमारे ५०० हेक्टरवर नुकसान झाले आहे.
तळोदा तालुक्यातील सुमारे दीडशे हेक्टरवरील केळी पिकाचे तर जवळपास चारशे घरांचे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला आहे. पंचनामे पूर्ण झाल्याने आता प्रशासनाने संबंधितांना त्वरित नुकसान भरपाई मिळेल यासाठी प्रयत्न करावेत, अशी आशा नुकसानग्रस्तांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
गुजरातमध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या प्रभावामुळे तळोदा शहरासह तालुक्यातील ठिकठिकाणी रविवारी वादळी वाऱ्यांनी जोरदार हजेरी लावली होती.
यादरम्यान पावसाचा जोर कमी असला तरी दोन तास चाललेल्या वादळी वाऱ्यांचा थैमानात सातपुड्यातील खर्डी बुद्रूक, लक्कडकोट, केलवापाणी, कोठार, गढीकोठडा, सावरपाडा, धनपुर, रानापूर, राणिपूर, बंधारे, वाल्हेरी, इच्छागव्हाण, ढेकाटी तसेच तळवे, तऱ्हाडी, बोरद, आमलाड परिसरातील नागरिकांचे नुकसान झाले होते.
प्रशासनाकडून त्वरित नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून वादळाची तीव्रता जास्त असल्याने घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. जवळपास चारशेच्यावर घरांचे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे वादळी वाऱ्यांमुळे शेतकऱ्यांच्या शेतीतील पिकांचे विशेषतः केळी पिकाचे व फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.
वादळामुळे शेतांमधील उभे केळीची झाडे जमिनीवर आडवी पडली. तसेच, केळीचे घडच्या घड फेकले गेले होते. जवळपास अडीचशे शेतकऱ्यांचा १५८ हेक्टर क्षेत्रावरील केळीचे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला आहे.
यात आमलाड, मोड, बोरद, तळवे या भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच १६० हेक्टरवरील फळबागांचे देखील नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला आहे. दरम्यान वादळी वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब वाकले तर काही कोसळले होते.
यामुळे अनेक गावांमध्ये वीज पुरवठा देखील खंडित झाला होता. विद्युत पुरवठा सुरळीत होण्यासाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी युद्धपातळीवर परिश्रम घेत आहेत. त्यामुळे आता अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा सुरळीत झाला आहे.
शेतकऱ्यांवर अनेकदा आपत्ती
तळोदा तालुक्यात गेल्या चार महिन्यात अनेकदा नैसर्गिक आपत्ती अथवा अवकाळी पावसामुळे सातत्याने शेती पिकांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची मदत मिळत नाही तोच पुन्हा दुसरी आपत्ती शेतकऱ्यांवर ओढवत आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले असून येणाऱ्या खरीप हंगाम तरी आता चांगला जावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.