डॉ. अभिनंदन पाटील, डॉ. अशोक कडलग, प्रणाली ढेकाणेSustainable Soil Management: ऊस हे दीर्घ कालावधीचे पीक असल्याने उत्पादनाची शाश्वतता टिकवून ठेवण्यासाठी जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. सेंद्रिय पदार्थांचा नियमित पुरवठा आणि सूक्ष्मजीवांची सक्रियता यांचा योग्य समन्वय साधल्यास जमिनीचे जैविक आरोग्य सुधारण्यास मदत होते..जमिनीची सुपीकता, उत्पादकता आणि आरोग्य दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय कर्ब हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. सेंद्रिय कर्ब हा जमिनीच्या जैविक, भौतिक आणि रासायनिक गुणधर्मांचे संतुलन राखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. मात्र एकाच जमिनीत सातत्याने ऊस लागवड करणे, सेंद्रिय खताचा अपुरा वापर, रासायनिक खतांचा असमतोल, अयोग्य सिंचन व्यवस्थापन आणि पीक अवशेषाचा योग्य पुनर्वापर न केल्याने जमिनीतील सेंद्रिय कर्बाचा साठा कमी होताना दिसून येतो. परिणामी, जमिनीची सुपीकता, अन्नद्रव्यांची उपलब्धता आणि उत्पादनक्षमता यावर विपरीत परिणाम होतो. अशा परिस्थितीत शेणखत, कंपोस्ट, उसाचे पाचट, हिरवळीचे खत यासारख्या सेंद्रिय स्रोतांसोबत जीवामृत, घनजीवामृत आणि सेंद्रिय स्लरी आदी जैविक निविष्ठांचा योग्य पद्धतीने वापर केल्यास जमिनीतील सूक्ष्मजीवांची क्रियाशीलता वाढविण्यास मदत होते. त्यामुळे सेंद्रिय पदार्थांचे विघटन व अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. जमिनीतील सेंद्रिय कर्बाची पातळी कमी झाल्यास सूक्ष्मजीवांची क्रियाशीलता, जमिनीची रचना, जलधारण क्षमता, हवा-पाणी संतुलन आणि अन्नद्रव्यांचे चक्र यावर प्रतिकूल परिणाम होतो..Biostimulant of Sugarcane Farming: ऊस उत्पादकता, जमीन सुपीकतेसाठी जिवाणू अर्क.सेंद्रिय कर्ब म्हणजे काय?जमिनीतील वनस्पतींचे अवशेष, सूक्ष्मजीवांचे अवशेष, प्राणिजन्य पदार्थ आणि इतर सेंद्रिय पदार्थ यांचे सूक्ष्मजीवांमार्फत विघटन व रूपांतर होत असताना तयार होणाऱ्या सेंद्रिय पदार्थामध्ये असलेल्या कार्बनला ‘सेंद्रिय कर्ब’ असे म्हणतात. सेंद्रिय कर्ब हा जमिनीच्या आरोग्याचा आणि सुपीकतेचा महत्त्वपूर्ण निर्देशक आहे. तो जमिनीची संरचना, जलधारण क्षमता, सूक्ष्मजीवांची क्रियाशीलता, अन्नद्रव्यांची उपलब्धता यावर परिणाम करतो. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण हे मातीचा प्रकार, हवामान, पीक पद्धती, सेंद्रिय पदार्थाचा पुरवठा, मशागत आणि व्यवस्थापन पद्धतीनुसार बदलते. त्यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाची स्थिती माती परीक्षणाच्या आधारे निश्चित करून व्यवस्थापन करावे..सेंद्रिय कर्बाची स्थिती मोजण्याचे मापदंडमाती परीक्षणाच्या आधारे जमिनीतील सेंद्रिय कर्बाची पातळी निश्चित केली जाते. साधारणपणे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.२० टक्क्यापेक्षा कमी असल्यास अत्यंत कमी, ०.२१ ते ०.४० टक्का असल्यास कमी, ०.४१ ते ०.६० टक्का असल्यास मध्यम, ०.६१ ते ०.८० टक्का असल्यास मध्यम जास्त, ०.८१ ते १.०० टक्का असल्यास जास्त आणि १.०० टक्क्यापेक्षा अधिक असल्यास खूप जास्त असे वर्गीकरण केले जाते..कमी होण्याची कारणेसतत एकाच पिकाची लागवड.सेंद्रिय खताचा अपुरा वापर.रासायनिक खतांचा असंतुलित वापर.ऊस पाचट जाळणे.पीक अवशेष शेताबाहेर काढणे.अयोग्य मशागत.अयोग्य सिंचन व्यवस्थापन..उत्पादनातील महत्त्व मातीची सुपीकता व उत्पादकतासेंद्रिय कर्ब हा मातीच्या भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मांवर परिणाम करणारा प्रमुख घटक आहे. त्याच्या पुरेशा उपलब्धतेमुळे मातीची संरचना, सच्छिद्रता, अन्नद्रव्ये उपलब्धता आणि जैविक क्रियाशीलता सुधारते. त्यामुळे ऊस पिकाच्या मुळांच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होऊन वाढ व उत्पादन क्षमता सुधारण्यास मदत होते..सूक्ष्मजीवांची क्रियाशीलतामातीतील उपलब्ध कार्बन पदार्थ हे उपयुक्त सूक्ष्मजीवांसाठी ऊर्जा व कार्बनचा प्रमुख स्रोत म्हणून कार्य करतात. त्यामुळे सूक्ष्मजीव जैवभार तसेच विविध जैव रासायनिक अभिक्रिया सुधारून सेंद्रिय पदार्थांचे विघटन आणि पोषक घटकांचे जैविक रूपांतर अधिक कार्यक्षमतेने करतात..Soil Management : मातीचा जिवंतपणा जपण्यासाठी सेंद्रिय कर्ब आवश्यक.अन्नद्रव्यांचे खनिजीकरणसेंद्रिय पदार्थांच्या सूक्ष्मजीवांद्वारे विघटनामुळे नत्र, स्फुरद, पालाश व इतर अन्नद्रव्यांचे खनिजीकरण होते. त्यामुळे उसाच्या मुळांच्या सान्निध्यात अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढून पिकाच्या पोषण कार्यक्षमतेस चालना मिळते..ऊस पाचटाचे सेंद्रिय कर्ब व्यवस्थापनातील महत्त्वउसाचे पाचट हे सेंद्रिय कर्बाचा महत्त्वपूर्ण स्रोत असून, त्यामध्ये सेल्युलोज, हेमिसेल्युलोज आणि लिग्निन यासारखे कार्बनयुक्त घटक मोठ्या प्रमाणात असतात. पाचटाचे विघटन होत असताना त्यातील कार्बनचा काही भाग सूक्ष्मजीवांच्या जैवभार निर्मितीसाठी वापरला जातो, काही भाग कार्बन डायऑक्साइडच्या स्वरूपात वातावरणात मुक्त होतो, तर उर्वरित कार्बनाचा काही भाग जमिनीत स्थिर सेंद्रिय पदार्थाच्या स्वरूपात साठवला जातो. त्यामुळे पाचटाचे योग्य व्यवस्थापन केल्यास जमिनीतील सेंद्रिय कर्बाचा साठा वाढविण्यास व त्याचे संवर्धन करण्यास मदत होते..उसाच्या पाचटाचे कार्बन-नत्र गुणोत्तर साधारणपणे ९५:१ च्या आसपास असल्याने त्यामध्ये कार्बनचे प्रमाण अधिक असते. अशा कार्बन-नत्र गुणोत्तराच्या पाचटाच्या विघटनासाठी सूक्ष्मजीवांना अतिरिक्त नत्राची आवश्यकता असते. त्यामुळे योग्य प्रमाणात नत्र उपलब्ध करून दिल्यास सूक्ष्मजीवांची क्रियाशीलता वाढून पाचटाचे विघटन अधिक कार्यक्षम होते. विघटनाच्या प्रक्रियेत सेंद्रिय पदार्थांचे रूपांतर स्थिर ह्युमिक पदार्थामध्ये होत असल्याने जमिनीतील सेंद्रिय कर्बाची गुणवत्ता सुधारते..हिरवळीच्या पिकांचा वापरहिरवळीचे पीक हे मातीतील सेंद्रिय कर्बाचा पुरवठा वाढविणारी महत्त्वपूर्ण पद्धती असून, सेंद्रिय कर्बाचे संवर्धन, स्थिरीकरण आणि दीर्घकालीन संचयन यामध्ये त्याचे विशेष महत्त्व आहे. हिरवळीच्या पिकाद्वारे प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेत वातावरणातील कार्बन डायऑक्साइडमधील कार्बन जैविक स्वरूपात स्थिरीकृत केला जातो. पिकाची पाने, खोड, मुळे, मुळांचे अवशेष आणि मुळांमधून बाहेर पडणारे सेंद्रिय पदार्थ यांच्या माध्यमातून हा जैविक कर्ब मातीत समाविष्ट होतो..त्यानंतर या जैवभाराचे सूक्ष्मजीवांद्वारे विघटन होत असताना कार्बनाचे विविध स्वरूपांमध्ये रूपांतर होते. हिरवळीच्या खतांचा नियमित वापर केल्यास मातीत सेंद्रिय कर्बाचा सातत्यपूर्ण पुरवठा होऊन कर्बाचा साठा वाढविण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होते. विशेषतः ऊस पिकामध्ये दीर्घकाळ एकाच जमिनीचा वापर, वारंवार मशागत आणि पिकाद्वारे अन्नद्रव्यासोबत होणारा सेंद्रिय पदार्थाचा ऱ्हास यामुळे कमी होणाऱ्या सेंद्रिय कर्बाची भरपाई करण्यासाठी हिरवळीच्या पिकाचा खत म्हणून वापर उपयुक्त ठरतो..जिवाणू अर्काचा वापरजिवाणू अर्काच्या वापरामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे विघटन, रूपांतर आणि स्थिरीकरण या प्रक्रिया गतिमान होण्यास मदत होते. जिवाणू अर्कामध्ये असणारे उपयुक्त जिवाणू जमिनीत उपलब्ध असलेल्या सेंद्रिय पदार्थावर कार्य करून त्याचे जैविक विघटन व खनिजीकरण करतात. जिवाणूंच्या एन्झाइम क्रियाशीलतेमुळे जटिल सेंद्रिय पदार्थांचे विघटन होऊन त्याचे सोप्या कार्बनी संयुगांमध्ये रूपांतर होते. या प्रक्रियेत उपलब्ध कार्बनाचा काही भाग जिवाणूंच्या ऊर्जा-चयापचयासाठी वापरला जातो, तर काही भाग सूक्ष्मजीव जैवभार कार्बनमध्ये रूपांतरित होतो. जिवाणूंच्या मृत पेशी व अवशेषांपासून तयार होणारे कार्बन पदार्थ मातीतील खनिज कणांशी संयोग पावून अधिक स्थिर स्वरूपाच्या सेंद्रिय कर्बाच्या निर्मितीस हातभार लावतात. त्याचबरोबर सेंद्रिय पदार्थांचे ह्युमिफिकेशन व कर्ब स्थिरीकरण यामुळे जमिनीत दीर्घकाळ टिकणाऱ्या सेंद्रिय कर्बाचा साठा वाढण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे जिवाणू अर्क हा जमिनीत कर्बाचा थेट स्रोत म्हणून नव्हे, तर उपलब्ध सेंद्रिय पदार्थांचे जैविक रूपांतर, सूक्ष्मजीव जैवभार निर्मिती आणि सेंद्रिय कर्बाचे स्थिरीकरण यांना चालना देणारी जैविक निविष्ठा म्हणून कार्य करतो..सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी उपायउसाचे पाचट न जाळता त्याचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करणे.कुजलेले शेणखत व कंपोस्ट यांचा वापर करावा.हिरवळीच्या पिकांचा योग्य पद्धतीने खत म्हणून वापर करावा.जिवामृत, घन जिवामृत व सेंद्रिय स्लरी यांचा शिफारशीनुसार वापर करावा.माती परीक्षणाच्या आधारे संतुलित खत व्यवस्थापन करणे.पीक फेरपालट व आंतरपीक पद्धतींचा अवलंब करावा.- डॉ. अभिनंदन पाटील,९७३७२७५८२१(वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी (बु.), ता. हवेली, जि. पुणे).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.