
Beed News : सध्या सर्वत्र विधानसभा निवडणुकीचा फड तापलेला असताना दुसरीकडे राज्यातील अनेक साखर कारखान्यांच्या चिमण्या पेटल्या आहेत. ऊस तोडण्यासाठी चाळीसगाव तालुक्यातून तब्बल १५ हजार ऊसतोड कामगारांचे स्थलांतर झाले आहे.
ऐन विधानसभा निवडणूक मतदानाच्या तोंडावर हे स्थलांतर झाल्याने या ऊसतोड कामगारांना मतदानापासून वंचित राहावे लागणार असल्याचे दिसून येत आहे. परजिल्ह्यासह परप्रांतात स्थलांतर होणाऱ्यांमध्ये तालुक्यातील लोंजे, सांगवी, घोडेगाव, ओढरे, बोढरे परिसरातील ऊसतोड कामगारांचा सर्वाधिक समावेश आहे.
चाळीसगाव तालुक्यात ऊस तोड कामगारांची संख्या अधिक आहे. विशेषतः बंजारा तांड्यांवरील हे कामगार कुटुंबीय आपापल्या गावातून पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा, गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक आदी ठिकाणी ऊस तोडणीसाठी गेले आहेत.
साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आणि विधानसभा निवडणुकीची धामधूम एकाच वेळी सुरु आहे. त्यामुळे ऊस तोड कामगारांना विधानसभा निवडणुकीच्या मतदानापासून वंचित राहावे लागण्याची चिन्हे दिसत आहेत.
मतदानासाठी आणणे कठीण
ऊसतोड कामगार पोटासाठी आपले बिऱ्हाड घेऊन गेले आहेत. साधारणतः पुढील आठवड्यापासून कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होण्याची शक्यता आहे. तालुक्यातील काही मुकादमांनी ऊसतोड मजुरांच्या टोळ्या यापूर्वीच पाठवून दिल्या आहेत. ऊस तोड कामगार कुटुंबासह परजिल्ह्यात दाखल होऊ लागले आहेत.
ट्रॅक्टर, ट्रॉली व ट्रकद्वारे मजूर कुटुंबीय जाताना दिसत आहेत. एकीकडे लोकशाहीचा उत्सव सुरु असताना दुसरीकडे ऊस तोड कामगारांना पोटाची खळगी भरण्यासाठी गाव सोडून जावे लागत आहे. आपल्या गावापासून बऱ्याच अंतरावर ऊस तोड कामगार गेलेले असल्याने त्यांना खास मतदान करण्यासाठी पुन्हा गावी आणणे कठीण दिसत आहे. सुमारे १५ हजार ऊस तोड कामगार निवडणुकीपासून वंचित राहण्याची चिन्हे सध्या तरी दिसत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.