
Koyna Dam Satara : कोयना धरणातून यावर्षी पावसाळ्यात १८ टीएमसी पाणी वीजनिर्मितीसाठी वापरले. त्यातून ९३३ दशलक्ष किलोवॉट इतकी वीजनिर्मिती झाली. ती गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. गेल्या वर्षी दुष्काळाचे सावट होते. परिणामी, विजेची मागणी पावसाळ्यातदेखील अधिक असल्याने जून ते ऑक्टोबर वीजनिर्मिती अधिक करावी लागली होती. यंदा मागणी कमी असल्याने विनावापर धरणातून सोडलेल्या पाण्याचा टक्का अधिक आहे. या वर्षीच्या उन्हाळ्यात धरणातून पुरेशी वीजनिर्मिती होईल अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.
कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन पोतदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाळ्यात कोयना धरणातील पाण्यावर होणाऱ्या वीजनिर्मितीचे नियोजन केले होते. चिपळूण परिसरात पाऊस अधिक असेल तेव्हा कोयना प्रकल्पातून मर्यादित वीजनिर्मिती केली जात होती त्याशिवाय पोफळी येथे सांडव्याला लागलेल्या गळतीवर काम सुरू होते. त्याचा परिणाम वीजनिर्मितीवर झाला. महानिर्मिती कंपनी आणि जलसंपदा विभाग दोघांच्या समन्वयाने पाणी सोडले जात होते. आता धरणात समाधानकारक पाणीसाठा आहे.
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील धरण क्षेत्रात ५ हजार ७८७ मिलिमीटर, नवजा ६ हजार ८६२ मिलिमीटर, महाबळेश्वर ६ हजार ६४७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला धरणातील साठा अत्यंत कमी होता. १७.८७ टीएमसी साठा असताना पावसाला सुरुवात झाली. धरण १०० टक्के भरले. धरणातील एकूण पाण्याची आवक १७७.८४ टीएमसी झाली. पैकी सुमारे ५९ टीएमसी इतके पाणी दरवाजातून सोडले. हे संपूर्ण पाणी विनावापर सोडले.
त्याचवेळी विजेच्या मागणीच्या आधारावर सुमारे १८ टीएमसी पाणी वीजनिर्मितीसाठी वापरले. त्यात पोफळीतून ३४५.९१०, स्टेज चारमधून ३४४.५००, केडीपीएचमधून ४८.८३०, अलोरे दरवाजातून १९३.९९२ दशलक्ष किलोवॉट इतकी वीजनिर्मिती केली. परिणामी, यंदा पावसाळ्यात मागणीपेक्षा अधिक वीजनिर्मिती शक्य झाली. गतवर्षी राज्यातील अनेक भागात दुष्काळी स्थिती होती. कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रातही दुष्काळ जाहीर केला होता.
टेंभू, ताकारी, म्हैसाळ उपसा सिंचन योजना सलग चालवण्याची वेळ आली होती. कोयनेतून त्यासाठी अतिरिक्त वीजनिर्मिती करावी लागली. गतवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला धरणातील साठा १७.६४ टीएमसी होता. धरणातील एकूण साठा ९१ टीएमसीपर्यंत राहिला. एकूण पाण्याची आवक यंदाच्या तुलनेत तब्बल ७० टीएमसी कमी होती म्हणजेच केवळ १०७ टीएमसी पाणी धरणात आले होते.
यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस पडला; मात्र काही दुष्काळी टापूत पाऊस सुरू व्हायला उशीर लागला. म्हैसाळ उपसा सिंचनसारखी योजना जतसाठी चालवावी लागली. त्यामुळे धरणातून सुमारे १.१६ टीएमसी पाणीसाठा या योजना चालवण्यासाठी वापरण्यात आला असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.