
Akola News : आधीच विविध संकटांमध्ये अडकून पडलेल्या शेतकऱ्यांच्या मानगुटीवर सीबिलचे नवे संकट उभे ठाकले आहे. याविरुद्ध शेतकरी जागर मंचाच्या ‘मेरा गाव मेरी संसद’ अभियानांतर्गत तालुक्यातील १४८ गावांमध्ये जनजागृती करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्रदिनी सोमवारी (ता. १) येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
शेतकरी जागर मंचाचे अध्यक्ष प्रशांत गावंडे व जिल्हा परिषद सदस्य सम्राट डोंगरदिवे यांच्या पुढाकाराने मोर्चा निघाला. शेतकऱ्यांसाठी पीक कर्जाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे शासनाने बँका, वित्तीय महामंडळांच्या माध्यमातून तशी व्यवस्था केली आहे.
बँकांच्या राष्ट्रीयीकरणानंतरही राष्ट्रीयकृत बँकांना शेतीसाठीच्या कर्ज प्राधान्याच्या सूत्रात बांधून ठेवले. यापुर्वीच्या शासनाने शेतीचे पतधोरण आखताना शेतकऱ्यांच्या अडचणी विचारात घेऊन जाचक अटींमधून सूट दिली. मात्र आता शासनाने सीबिलचे भूत शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसवल्याचा आरोप होत आहे.
सीबिल म्हणजे कर्जासाठी पात्र होण्यासाठी गुण मिळविणे. हे गुणांकन ९०० पैकी किमान ७२० असणे आवश्यक आहे. कर्ज थकित असणे, कर्जाचे हप्ते नियमित न भरणे, वन टाइम सेटलमेंटअंतर्गत कर्ज भरणा करणे, यापुर्वी कधीही कर्ज न घेणे, अशा कारणांमुळे गुणांकन ७२० पेक्षा जास्त होऊ शकत नाही. अशा अटी शेतकऱ्यांना येत्या हंगामात पीककर्ज मिळवताना अडचणीच्या ठरू शकतात.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.