डॉ. सुरेंद्र पाटील, सोनाली लोखंडे, प्रशांत देबाजेआंबिया बहर घेण्याकरिता संत्रा-मोसंबीची झाडे डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून ताणावर सोडावीत. अधिक दर्जेदार उत्पादन घेण्याकरिता एकात्मिक अन्नद्वव्ये व्यवस्थापनाचा अवलंब करावा..संत्रा, मोसंबी बागेतून दर्जेदार उत्पादन मिळण्यासाठी आंबिया बहराची शास्त्रीय दृष्टीने निगा राखणे अत्यंत जरुरी आहे. निसर्गत: संत्रा किंवा मोसंबी फळझाडास वर्षातून तीन वेळा बहर येतो. पावसाळ्यात (जून-जुलै) येणाऱ्या बहरास ‘मृग बहर’ आणि पावसाळा संपल्यानंतर (ऑक्टोबरमध्ये) येणाऱ्या बहरास ‘हस्त बहर’ तर थंडी संपतेवेळी म्हणजेच जानेवारी- फेब्रुवारीमध्ये येणाऱ्या बहरास ‘आंबिया बहर’ म्हणतात. असे तीन बहर वेगवेगळ्या ऋतूमध्ये येतात. .Citrus Farming: संत्रा काढणीतील काळजी म्हणजे गुणवत्तेची खात्री.संत्रा, मोसंबीची झाडे निसर्गत: थंडीच्या आणि उन्हाळ्याच्या दिवसात कमी- जास्त तापमानामुळे दोनदा विश्रांती घेत असतात. साधारणतः या काळात वातावरण पोषक नसल्यामुळे झाडांवर नवीन वाढ होत नाही. त्यामुळे या विश्रांतीच्या काळात जास्तीचा साखरेचा संचय झाडाच्या ६ ते ९ महिन्यांच्या फांद्यांमध्ये होतो. नवीन वाढीसाठी खर्च होणारा साखरेचा भाग शिल्लक राहून फांद्यांमध्ये त्याचा जास्तीचा संचय होतो. .याचा हवामान अनुकूल झाल्यानंतर झाडावर फुले येण्यास उपयोग होतो. संत्रा, मोसंबी झाडांस येणाऱ्या आंबिया बहराला ‘नैसर्गिक बहर’ म्हणतात. या बहरात कडाक्याच्या थंडीमध्ये तापमान कमी झाल्यामुळे संत्रा, मोसंबी झाडाची वाढ थांबते. डिसेंबरचा दुसरा आठवडा ते जानेवारीचा दुसरा आठवडा या एका महिन्याच्या कालावधीत रात्रीचे किमान तापमान साधारणतः १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी होते. इतके तापमान कमी झाल्यामुळे झाडांना ताण बसतो. या ताणामुळे झाडे खराब होत नाहीत..Citrus Farming: उत्तम संत्रा शेतीसह प्रक्रिया, विक्रीपर्यंतची मूल्यसाखळी .आंबिया बहर घेण्याकरिता झाडाला ताण देणे झाडांची सतत होणारी वाढ थांबविण्याकरिता संत्रा-मोसंबी झाडाला पाण्याचा पुरवठा बंद करून ताण दिला जातो. पाण्याचा ताण दिल्यामुळे झाडांची वाढ थांबते. झाडे विश्रांती घेतात. त्यामुळे झाडाच्या फांद्यांत, पानात अन्नद्रव्यांचा संचय होतो.बहर घेण्याकरिता डिसेंबर महिन्याचा दुसरा आठवडा ते जानेवारीचा दुसरा आठवडा या कालावधीत संत्रा-मोसंबी बागेचे ओलित बंद करून झाडांना ताणावर सोडले जाते. या ताणाचा कालावधी जमिनीचा पोत, झाडाचे वय आणि जमिनीतील उपलब्ध ओलावा यावर अवलंबून असतो.आंबिया बहरासाठी हलक्या जमिनीत ३५ ते ४५ दिवस, मध्यम जमिनीत ४५-६० दिवस आणि भारी जमिनीत ५५ ते ७५ दिवस ताण द्यावा..झाडाला ताण बसल्याचे कसे ओळखावे?बागेस ताण देण्यापूर्वी झाडावरील आधीची सर्व फळे काढावीत. बागेचे पाणी हळूहळू कमी करत आणून नंतर पूर्ण बंद करावे. ताण सुरू केल्यानंतर झाडाच्या पानांचा मूळ रंग कमी होऊन पाने फिक्कट व नंतर पिवळी पडतात. हा बदल होत असताना पाने गळून पडेपर्यंत अन्न तयार करण्याची प्रक्रिया सुरूच ठेवतात. साधारणपणे २५ टक्के पानगळ झाल्यास ताण बसला असे समजावे. अशाप्रकारे झाडांना ताण दिल्यास एकाच वेळी फुलोरा येऊन बहरातून दर्जेदार फळे मिळण्याची शाश्वती वाढते..Citrus Farming: संत्रा काढणी होईपर्यंत अन्नद्रव्ये व्यवस्थापनावर भर.ओलित व्यवस्थापन आंबिया बहराची फळे उन्हाळ्यात झाडावर पोसली जातात. त्यामुळे पाण्याचा साठा उन्हाळ्यात उपलब्ध असणे जरुरी आहे. जमिनीतील ओलावा कमी झाल्यास फळगळ होते व फळांची प्रत खालावते. म्हणून आंबिया बहर घेताना ओलिताकडे कटाक्षाने लक्ष देणे जरुरी आहे. ओलितासाठी ठिबक पद्धतीचा अवलंब केल्यास पाण्याची बचत होते. जमिनीच्या पोताप्रमाणे पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. .भारी जमिनीत आंबिया बहर घेण्यासाठी नियोजनकाळ्या जमिनीचा थर हा किमान १.२० मीटरपासून १५ मीटरपर्यंत असतो. या जमिनीमध्ये लागवड केलेली झाडे ताणावर सोडताच, झाडाच्या मुळ्या पाण्याच्या शोधात खोलवर जातात. काळी जमीन ही उत्तम ओलावा टिकवून ठेवणारी असल्यामुळे झाडांना ओलावा मिळत राहतो. त्यामुळे झाडाला ताण बसत नाही आणि ती हिरवीगार राहून वाढत राहतात. अशा प्रकारची जमीन असलेली बाग संपूर्ण ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यांत वखरून स्वच्छ ठेवावी. .Citrus Crop Disease: कोळी या किडीच्या प्रादुर्भावाचं नियंत्रण कसं करावं?.डिसेंबरच्या १५ तारखेच्या आसपास झाडांच्या ओळींमधून खोल वखरणी करून झाडाच्या मुळ्या उघड्या कराव्यात. त्यामुळे टोकावरील तंतुमुळे तुटून त्यांना ओलावा घेणे शक्य होत नाही. परिणामी झाडांना ताण बसण्यास मदत होते. तसेच क्लोरमेक्वाट क्लोराइड (१००० पीपीएम) हे कायिक वाढ रोखणारे संजीवक असून या संजीवकाच्या फवारणीमुळे झाड नवतीत न जाता फुले येण्यास मदत होते..आंबिया बहर घेण्याकरिता संत्रा-मोसंबीची झाडे डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून ताणावर सोडावीत. ताणावर सोडल्यानंतर चांगले कुजलेले शेणखत प्रति झाड ४० ते ५० किलो प्रमाणे मात्रा देऊन उभी-आडवी वखरणी करावी. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा तापमानात वाढ होताच, हलके ओलित करावे. ताण तोडताना हलक्या ओलिता अगोदर प्रत्येकझाडाला नत्र ६०० ग्रॅम अधिक स्फुरद ४०० ग्रॅम अधिक पालाश ४०० ग्रॅम आणि भरखते द्यावीत. त्यानंतर पाच ते सात दिवसांनी दुसरे पाणी द्यावे. तिसऱ्या पाळीला भरपूर पाणी द्यावे. .Citrus Farming: कागदी लिंबू हस्त बहराचे नियोजन.संत्रा पिकाचे अधिक दर्जेदार उत्पादन घेण्याकरिता एकात्मिक अन्नद्वव्ये व्यवस्थापनाचा अवलंब करावा. संत्रा बागेस ५० किलो शेणखत, ९०० ग्रॅम नत्र, ३०० ग्रॅम स्फुरद, ३०० ग्रॅम पालाश प्रति झाड देण्याची शिफारसीत मात्रा आहे. यासह व्हॅम ५०० ग्रॅम अधिक स्फुरद विरघळवणारे जिवाणू १०० ग्रॅम अधिक अझोस्पिरीलम १०० ग्रॅम अधिक ट्रायकोडर्मा १०० ग्रॅम प्रति झाड देण्यात यावे. शिफारशीत खतमात्रा देताना शेणखत अधिक नत्राची अर्धी मात्र अधिक स्फुरद व पालाशची संपूर्ण मात्रा तसेच जिवाणू खते व संवर्धके शेणखतासोबत मिसळून पाण्याचा ताण तोडताना द्यावीत. उर्वरित नत्राची अर्धी मात्रा फळे वाटाण्या एवढी झाल्यावर देण्यात यावी. .वाफे गवताने आच्छादित करणे वाफ्यातील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी गवताचा ६ सेंमी जाडीचा थर देऊन वाफे आच्छादित करावेत. त्यामुळे ओलावा टिकतोच, शिवाय फळांची गळसुद्धा कमी होते. तसेच जमिनीतील उपयुक्त जिवाणू सक्रिय होऊन अन्नद्रव्य मुळांना सहज उपलब्ध होतात..संत्रा बहराची निगा राखणे बहर आल्यानंतर सर्वच फुलांचे फळात रूपांतर होत नाही. बहरामध्ये बरीच फुले नर फुले असतात. त्यामुळे ही नर फुले गळून पडतात. त्यामध्ये फलन क्रिया होत नाही. सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता, संजीवकांचा अभाव, हवामानाचा असमतोलपणा आणि किडींचा उपद्रव यामुळे फळांची गळ होते. सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढण्यासाठी झिंक सल्फेट, कॉपर सल्फेट, मँगेनीज सल्फेट, फेरस सल्फेट आणि बोरीक ॲसिड यांची ०.२ ते ०.५ टक्के तीव्रतेची फवारणी करावी. संजीवकांचा समतोल साधण्यासाठी एन.ए.ए.ची (१० पीपीएम) मार्च महिन्यात फवारणी करावी. या बहरावर ‘सिट्रस सिला’ किडीचा प्रादुर्भाव होतो. त्यासाठी बागेचे नियमित निरीक्षण करून आवश्यकतेनुसार रासायनिक फवारणीचे नियोजन करावे. - डॉ. सुरेंद्र पाटील ९८८१७ ३५३५३(फळशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.