डॉ. ए. के. दास, डॉ. ए. थिरुज्ञानवेलScientific Farming: संत्रा, मोसंबी किंवा लिंबू या लिंबूवर्गीय फळबागांची लागवड ही मोठी आणि दीर्घकालीन गुंतवणूक असते. एकदा लागवड केल्यानंतर पुढील सुमारे २० ते २५ वर्षांसाठी बाग एकाच ठिकाणी राहत असल्याने त्यानुसार लागवडपूर्व आणि लागवडपश्चात व्यवस्थापनाचा अवलंब अत्यंत महत्त्वाचा असतो. सुधारित लागवड तंत्राचा अवलंब करून सुरुवातीच्या काळात रोपांची योग्य काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. शासकीय, मान्यताप्राप्त अधिकृत परवानाधारक रोपवाटिका किंवा केव्हीके येथून ‘शूट टीप ग्राफ्टिंग’ पद्धतीने तयार केलेली प्रमाणित रोगमुक्त रोपे लागवडीसाठी निवडावीत. .प्रमाणित आणि रोगमुक्त रोपांची निवड लिंबूवर्गीय बागेचे यश हे पूर्णपणे मातृवृक्ष आणि रोपांच्या दर्जावर अवलंबून असते.लागवडीसाठी ‘शूट टीप ग्राफ्टिंग’ तंत्रज्ञानाने विकसित केलेली आणि पिशवीत वाढविलेली (कंटेनराइज्ड) रोगमुक्त रोपे निवडावीत. कारण उघड्या मुळांच्या रोपांमुळे मातीजन्य रोगांचा प्रसार होतो.रोपे शासकीय रोपवाटिका, नोंदणीकृत व परवानाधारक रोपवाटिका किंवा कृषी विज्ञान केंद्र यांच्याकडूनच खरेदी करावीत. यामुळे रोपांच्या जातीची आणि गुणवत्तेची खात्री मिळते आणि फसवणूक टाळली जाते..Citrus Orchard Management: गारपीटग्रस्त लिंबूवर्गीय बागेचे व्यवस्थापन.लागवडीसाठी शास्त्रोक्त खड्डेलागवडीच्या किमान एक महिना आधी जमिनीच्या प्रकारानुसार खड्डे खोदावेत. खोल व सुपीक जमिनीत २ बाय २ बाय २ फूट (६० बाय ६० बाय ६० सेंमी) आणि उथळ किंवा मुरमाड जमिनीत ३ बाय ३ बाय ३ फूट आकाराचे खड्डे घ्यावेत.काढलेले खड्डे किमान महिनाभर कडक उन्हामध्ये तापू देणे गरजेचे आहे. प्रखर सूर्यप्रकाशामुळे मातीचे नैसर्गिक निर्जंतुकीकरण होऊन हानिकारक रोगजंतू, कीटक व तणांच्या बिया नष्ट होण्यास मदत मिळते..खड्डा भरण्यासाठी खतांचे मिश्रणखड्ड्यातून काढलेल्या वरच्या थरातील मातीमध्ये चांगले कुजलेले शेणखत ३० ते ५० किलो, कडुनिंब पेंड १ किलो, सिंगल सुपर फॉस्फेट १ किलो आणि क्लोरपायरिफॉस (२० ई.सी.) १०० मिलि १ लिटर पाण्यात मिसळून प्रत्येक खड्ड्याच्या भिंतींवर फवारावे.फायटोप्थोरा/डिंक्या रोगापासून मुळांचे जैविक संरक्षण करण्यासाठी ट्रायकोडर्मा हरझियानम (Strain NRCfBA-४४) २५ ग्रॅम प्रति खड्डा याप्रमाणे वापर करावा. जर खड्ड्यात रासायनिक कीटकनाशक (क्लोरपायरीफॉस) वापरले असेल तर त्यासोबत जैविक बुरशीनाशक म्हणजेच ‘ट्रायकोडर्मा’चा वापर करू नये. रासायनिक कीटकनाशकामुळे ट्रायकोडर्मा बुरशी नष्ट होऊ शकते..रोपांची लागवड पूर्ण झाल्यानंतर मातीतून पसरणाऱ्या बुरशीपासून मुळांचे संरक्षण करण्यासाठी त्वरित कॉपर ऑक्सिक्लोराइड (५० टक्के डब्ल्यूपी) २.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात व्यवस्थित मिसळून प्रत्येक रोपाच्या बुंध्याजवळ आळवणी करावी.दाणेदार खते मातीत एकसमान मिसळली पाहिजेत. या खतांचा रोपांच्या नाजूक मुळांशी थेट संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा, नाजूक मुळे जळून झाडाची वाढ कायमची खुंटते.(लेबलक्लेम आहेत.).खड्डा भरणेखतांचे मिश्रण भरताना थोडी जास्तीची माती टाकून खड्ड्याचा जमिनीच्या पातळीपेक्षा थोडा उंचवटा तयार करावा.खड्डे भरल्याबरोबर लगेच रोपांची लागवड करू नये. मॉन्सूनचे २ ते ३ चांगले पाऊस झाल्यानंतर लागवड करावी. पावसामुळे खड्ड्यातील माती नैसर्गिकरीत्या दाबली जाते आणि उंचवटा खाली बसून जमिनीशी समांतर होतो..Citrus Orchard Management: अवकाळी पावसानंतर लिंबूवर्गीय बागेत घ्यावयाची काळजी.रोप लागवडपावसाने माती घट्ट बसल्यानंतर लागवड करावी. पिशवीतून रोप काढताना मुळांभोवतीचा मातीचा गोळा फुटणार नाही याची दक्षता घ्यावी.रोप खड्ड्याच्या मध्यभागी लावावे. मातीतून पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कलमाचा जोड जमिनीपासून किमान ९ इंच वर राहील याची खात्री करावी.लागवडीनंतर मातीतील हवेची पोकळी निघून जाण्यासाठी रोपाला लगेचच हलके पाणी द्यावे..उंच गादीवाफा पद्धतीने लागवडकाळ्या जमिनीत पाणी साचल्यामुळे फायटोप्थोरा (डिंक्या/मूळकुज) या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. यावर उपाय म्हणून संत्रा व मोसंबीची लागवड ६ बाय ३ मीटर अंतरावर ‘मॉडिफाइड उंच गादीवाफा’ पद्धतीने करावी. हे वाफे २ मीटर रुंद आणि मध्यभागी ५० सें.मी. उंच असावेत. त्यांचा उतार दोन्ही बाजूंच्या कडांच्या दिशेने असावा..गादीवाफा पद्धतीचे महत्त्वलिंबूवर्गीय फळपिकांची मुळे ही जमिनीच्या पृष्ठभागालगत म्हणजेच उथळ असतात. झाडाला अन्नद्रव्ये आणि पाणी पुरवणारी मुख्य मुळे जमिनीखाली केवळ ३५ ते ५० सें.मी. खोलीपर्यंत एकवटलेली असतात. मुळांचा हा विशिष्ट भाग दुष्काळ आणि जमिनीत अचानक वाढणारी अति आर्द्रता या दोन्ही परिस्थितींना अत्यंत संवेदनशील असतो. जमिनीत पाण्याचे प्रमाण सतत कमी-जास्त झाल्यास मुळांना मोठा फटका बसतो..मुसळधार पाऊस झाल्यास गादीवाफ्यामुळे अतिरिक्त पाणी वाफ्यांच्या दोन्ही बाजूंना असलेल्या सऱ्यांमधून त्वरित बागेबाहेर वाहून जाते. यामुळे मुळांच्या भागात पाणी साचून राहण्याची हानिकारक समस्या टळते. जमिनीत हवा खेळती राहते..कमी पावसाच्या किंवा दुष्काळसदृश परिस्थितीत दोन वाफ्यांमधील सऱ्यांमुळे जमिनीखालील भूजल पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे मुळांच्या कक्षेत झाडाला आवश्यक असणारा पुरेसा ओलावा दीर्घकाळ टिकून राहतो..जुन्या बागेसाठी महत्त्वाचेजुनी पारंपारिक सपाट वाफ्यांवर लागवड केलेल्या बागेतील झाडांच्या बुंध्याभोवती माती रचून त्याचे गादीवाफ्यात रूपांतर करण्याचा प्रयत्न कधीही करू नये. असे केल्याने नाजूक कलमाचा जोड मातीखाली गाडला जाऊन ‘फायटोप्थोरा’ (डिंक्या) बुरशीचा संसर्ग होतो. परिणामी संपूर्ण बाग नष्ट होण्याची शक्यता असते. जुन्या बागांमध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी दोन ओळींच्या मध्यभागी ३० सें.मी. रुंद आणि ३० सें.मी. खोल आकाराचा ‘निचरा चर’ तयार करावा..पीव्हीसी पाइप वापरातून वॉटर शूट्स व्यवस्थापनलागवडीनंतर साधारण ५ ते ६ दिवसांनी नवीन रोपाच्या खालच्या खोडाभोवती २ फूट लांबीचा आणि २ इंच व्यासाचा पीव्हीसी पाइप सुरक्षितपणे बसवावा. या पाईपमुळे मुख्य खोडापर्यंत सूर्यप्रकाश पोहोचत नाही. त्यामुळे खुंटावरील सुप्त डोळे दाबले जाऊन अनावश्यक फुटवे येत नाहीत. त्यामुळे झाडाची सर्व ऊर्जा केवळ मुख्य कॅनोपीच्या (विस्ताराच्या) वाढीसाठी वापरली जाते. हा पाईप नाजूक कलमाच्या जोडाला पूर्णपणे झाकून ठेवतो. त्यामुळे सिंचनाच्या पाण्याचा किंवा पावसाच्या दूषित मातीचा थेट संपर्क होत नाही. त्यामुळे रोपाचे जमिनीतून उद्भविणाऱ्या रोगांपासून संरक्षण होते.- डॉ. आर. के. सोनकर, ९५११७९७३५१(प्रमुख शास्त्रज्ञ,केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र, नागपूर).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.