
डॉ. सुमंत पांडे
गावातील प्रत्येक समस्येसाठी निश्चित योजना आहेत. त्यांच्या अंमलबजावणीसाठी विभाग आणि कर्मचारीदेखील आहेत. उदाहरणादाखल आपण काही समस्या येथे पाहणार आहोत.
पाणीदार गाव आणि पंचायत आज गावाच्या समस्यांमध्ये सगळ्यात मोठी समस्या आहे ती पाणी, घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनाची (Drainage Management). यामध्ये पिण्याचे पाणी आणि शेतीच्या पाण्याची. ती शाश्वत, दीर्घकाळ कशी राहील? किमान चार ते पाच दशके पिण्याचे पाणी स्वच्छ कसे मिळेल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
गावशिवारातील शेतीचे उत्पन्न कसे वाढेल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे . यासाठी पाण्याच्या स्त्रोताची माहिती, त्यांची सद्यःस्थिती, गावातील पाझर तलाव, विहिरींची स्थिती, त्याचप्रमाणे गावाच्या सूक्ष्म पाणलोट क्षेत्राची इत्थंभूत माहिती असणे आवश्यक आहे. पाणलोट क्षेत्रातील उपचार, संवर्धनाची देखील माहिती करून घ्यावी. पाण्याची गरज, उपलब्धता, पाण्याची गुणवत्ता याबाबींवर भर देणे गरजेचे आहे.
सरपंचांना कायद्याच्या चौकटीमध्ये असलेल्या ग्रामसभा, मासिक सभा, विशेष सभा यांच्या माध्यमातून लोकांचा विश्वास संपादन करून योजनांची अंमलबजावणी करणे उपयुक्त ठरेल.
संगणक साक्षरता आणि ग्राम पंचायत महाराष्ट्रात सध्या पंचायतीचे संगणकीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. बहुतांश योजनांची माहिती, त्यांचे नियोजन आणि पाठपुरावा संगणक प्रणालीचा वापर करून होतो. त्यात ई-मेल, संकेतस्थळ पाहणे, त्याची माहिती याबाबत पारंगत असणे गरजेचे आहे. यासाठी सरपंच संगणक साक्षर असणे अत्यंत गरजेचे आहे.
जे तरुण सरपंच आहेत ते संगणक साक्षरता असतीलही, तथापि इतरांना देखील संगणक साक्षर होणे गरजेचे आहे. बहुतेकांकडे सध्या स्मार्टफोन आहेत आणि बहुतांशी सुविधा या स्मार्टफोनच्या माध्यमातूनही तुम्हाला समजून घेता येतील. केंद्राचे पंचायती राज मंत्रालय, ग्राम विकास मंत्रालय तसेच विविध विभागांच्या माध्यमातून अनेक विकासाच्या योजना आखलेल्या आहेत, त्या योजनांची नीट माहिती होणे क्रम प्राप्त आहे.
आम्ही पंचायत सशक्तीकरण पुरस्कार प्राप्त झालेल्या केरळमधील पट्टणठीत्ता तालुक्यातील पंचायतीस भेट दिलेली होती; त्या वेळी त्यांच्या ग्रामपंचायतीचे सर्व व्यवहार उदा, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र, बांधकाम परवानगी आणि सर्व सुविधा एक खिडकीमार्फत होतात. ग्रामपंचायतीची वसुली १०० टक्के होती. गावाचे सरपंच कायदा पदवीधर होता. एक सदस्या पीएचडी प्राप्त होत्या. ग्रामपंचायतीचे सदस्य सर्व व्यवहार स्मार्टफोनद्वारे हाताळत होते.
आपल्याकडेही बऱ्याच ग्रामपंचायतीमध्ये ऑनलाइन व्यवहार होत असल्याचे निदर्शनास येते. त्याच धर्तीवर आपल्या ग्रामपंचायतीचा व्यवहार ऑनलाइन कसा करता येईल, हे सुनिश्चित करणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्व व्यवहारांमध्ये पारदर्शकता येईल.
संरपंचाचे दैनंदिन नियोजन
सरपंचाने दिवसातील किमानकाही वेळ आपला, उद्योग-व्यवसाय सांभाळून ग्रामपंचायतीला देणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतीच्या ई-मेल खात्यावर कोणती पत्रे आलेली आहेत? तातडीची पत्रे कोणती? अत्यंत महत्त्वाची कोणती? अर्धशासकीय पत्रे कोणती ही दैनंदिन पाहणे गरजेचे आहे.
सुरुवातीचा काही कालावधी सरपंचाला ग्रामसेवक, डेटा एन्ट्री ऑपरेटरची ई-मेल तपासणीसाठी मदत घ्यावी लागेल. सर्व पत्रव्यवहाराची दाखल घेऊन त्यावर कृती आणि कार्यवाही करण्यासाठी आदेश देणे, दिलेल्या आदर्शाप्रमाणे काम होते किंवा कसे याबाबत सातत्याने पाठपुरावा करणे हे गरजेचे आहे.
सरपंचानी दैनंदिन रोजनिशी ठेवावी, दिवसाच्या कामाचा प्राधान्यक्रम ठरवावा. त्याचा पाठपुरावा सातत्याने करावा. महाराष्ट्र भ्रमणामध्ये अनेक सरपंच दैनंदिन कामाचा पाठपुरावा सातत्याने करून त्याची अंमलबजावणी करताना मी पाहिले आहे.
गावाचा विकास आराखडा परिपूर्ण झाला आहे किंवा कसे हे तत्काळ बघणे गरजेचे आहे. यासाठी पहिल्या सभेमध्ये सरपंचांनी ग्रामसेवक आणि गावातील इतर अधिकारी कर्मचारी यांची बैठक बोलावून त्यांच्याकडून सर्व योजना समजून घेणे गरजेचे आहे. लोकांना लागणाऱ्या सार्वजनिक सुविधा ग्रामपंचायतीमार्फत पुरवता येऊ शकतील.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.