
Jalgaon News : हरितक्रांतीमुळे भुकेची समस्या दूर झाली. यासोबत काही संकटेदेखील समोर आली आहेत. ही संकटे दूर करण्यासाठी प्रभावी, पर्यावरणपूरक कार्यक्रम हवा असून, शास्त्रज्ञांची भूमिका त्यात महत्त्वाची आहे.
शेतीसमोरील संकटे दूर करण्यासंबंधीचे संशोधन बांधावर पोचायला हवे. शास्त्रज्ञांनी फक्त शोधनिबंध किती सादर केले याचा विचार न करता शेतकऱ्यांचा किती फायदा, विकास होत आहे, यावर काम करावे, असे मत माजी केंद्रीय फलोद्यान आयुक्त तथा माजी केंद्रीय सचिव सुरजित चौधरी यांनी जैन हिल्स येथे आयोजित राष्ट्रीय फलोद्यान परिषदेत व्यक्त केले.
नवी दिल्ली येथील अमितसिंग मेमोरियल फाउंडेशन व जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने जैन हिल्स येथे राष्ट्रीय फलोद्यान परिषदेचा रविवारी (ता. २८) प्रारंभ झाला. येत्या मंगळवारपर्यंत (ता. ३०) ही परिषद सुरू राहणार आहे. परिषदेत देशातील १०० शास्त्रज्ञ सहभागी झाले आहेत.
उद्घाटनाप्रसंगी व्यासपीठावर जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन, राजगुरुनगर (पुणे) येथील राष्ट्रीय कांदा व लसूण संशोधन केंद्राचे माजी संचालक डॉ. मेजर सिंग, इस्राईल येथील लसूण शास्त्रज्ञ एइर इशेल, इस्राईलचे आंतरराष्ट्रीय सिंचनतज्ज्ञ अॅम्नोन ऑफेन, चाईचे (कॉन्फेडरेशन ऑफ हॉर्टिकल्चर असोसिएशन ऑफ इंडिया) अध्यक्ष डॉ. एच. पी. सिंग, माजी सनदी अधिकारी तथा कृषितज्ज्ञ डॉ. अशोक दलवाई, झारखंडच्या भारतीय कृषी संशोधन परिषदेचे डॉ. विशाल नाथ, फ्यूचर ॲग्रिकल्चर लीडर्स इन इंडियाच्या (फाली) संचालक नॅन्सी बेरी, परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आय. एम. मिश्रा, जुनागड कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. ए. आर. पाठक, शिमला (हिमाचल प्रदेश) येथील बटाटा शास्त्रज्ञ डॉ. एस. के. चक्रवर्ती आदी उपस्थित होते.
सुरजित चौधरी पुढे म्हणाले, की जैन इगिरेशनसारख्या संस्था भविष्यातील शेतीचे मंदिर किंवा मार्गदर्शक आहेत. कृषी क्षेत्रातील समस्यांना पर्याय उपलब्ध करून देत आहेत. प्लॅस्टिकचा योग्य वापर करून शेतीला कसा लाभ मिळू शकतो, याचेही उदाहरण जैन इरिगेशनमध्ये दिसते.
रसायनांचा बेसुमार वापर झाला आहे. हरितक्रांतीनंतर ही समस्या तयार झाली आहे. पुढे पर्यावरणपूरक काम व्हायला हवे. धोरणकर्त्यांनी याबाबत गांभीर्याने विचार करावा, असेही ते म्हणाले.
अनिल जैन म्हणाले, ‘‘शेतकरी चांगल्या पगारदारापेक्षा अधिक कमाई करू शकतो. पण त्यासाठी योग्य तंत्रज्ञान हवे आहे. पुढे शेतीसाठी ड्रोन, सॅटेलाइट, स्मार्टफोनचा कार्यक्षम वापर व्हायला हवा. शेतीचा शाश्वत विकास व्हावा.
पारंपरिक बाबी महत्त्वाच्या आहेत. परंतु तरुणाईदेखील शेतीमध्ये सामर्थ्याने पुढे यायला हवी,’’ असेही जैन म्हणाले. प्रास्ताविक डॉ. एच. पी. सिंग यांनी केले. या वेळी चाईतर्फे शेतकरी व शास्त्रज्ञांना पुरस्कार देण्यात आले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.