
Karad News : सततच्या पावसाने जूनचा पहिला पंधरवडा संपला तरीही शेतीच्या मशागती आणि पेरण्या रखडल्या आहेत. त्यामुळे यंदा पेरण्या होणार की नाही? या विवंचनेत सातारा जिल्ह्यातील बळीराजा पडला आहे. पाऊस उघडीपच देत नसल्याने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील पेरण्या रखडल्या आहेत.
जूनच्या मध्यावरही जिल्ह्यातील तीन लाख ९६ हजार ३९२ हेक्टर क्षेत्रापैकी केवळ १४ हजार हेक्टरवर पेरणी झाल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. सातारा जिल्ह्यात केवळ चार ते पाच टक्केच पेरण्या झाल्याचे त्यावरून स्पष्ट होत आहे. अनेक तालुक्याच्या ठिकाणी शेतीच्या मशागतीही होणे बाकी आहे.
त्यातच पाऊस उघडीपच द्यायला तयार नसल्याने पेरणीची मोठी चिंता निर्माण झाली आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवल्याने जिल्ह्यातील शेतकरी हवालदील झाले आहेत.
सातारा जिल्हा हा खरिपाचा जिल्हा असल्याने जिल्ह्यातील शेतकरी दरवर्षी सोयाबीन, बाजरी, भात, भुईमूग, मका, ज्वारी, मुग, नाचणी, तूर, उडीद, इतर कडधान्य आणि उसासह अन्य पालेभाज्या, भाजीपाल्याची पिके मोठ्या प्रमाणात करतात.
पावसाच्या पाण्यावर पिके तरारून येत असल्याने त्याद्वारे शेतकऱ्यांना चार चांगले पैसेही मिळतात. दर वर्षी शेतकरी साधारणतः मे महिन्याच्या १५ तारखेनंतर शेतीच्या मशागतीस सुरुवात करून शेतजमिनी पेरणीसाठी तयार करून खरिपातील पेरणीच्या तयारीला लागतात.
खरिपातील पेरणीसाठी दरवर्षी शेतकरी चातक पक्षाप्रमाणे पावसाची वाट पहात असतात. यंदा मात्र उलट स्थिती झाली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झालेला पाऊस हा जून महिन्याच्या १५ तारखेनंतरही सातत्याने बरसत आहेत.
त्यामुळे अनेक ठिकाणच्या शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे शेतीच्या पेरणीपूर्व मशागतीही रखडल्या आहेत. अजून आठवडाभर उघडीप दिली तरच पेरणी होईल अशी जिल्ह्यात स्थिती निर्माण झाली आहे. मात्र पाऊस उघडीप घेईना अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदा खरिपातील पिकांची पेरणी होणार की नाही या चिंतेत बळीराजा आहे.
ज्या शेतकऱ्यांनी उन्हाळी पिके आणि केळी, टोमॅटो, काकडी, कोथिंबीर, गवारी, कारले, दोडका आदी पिके घेतली होती त्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्या शेतकऱ्यांवर आर्थिक कुऱ्हाड आली आहे. ऐन तोडणीस आलेली पिके पावसाच्या माऱ्याने वाया गेली आहेत. अनेक ठिकाणी त्या पिकांचे पंचनामे झाले नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्या पिकांचे पंचनामे करून तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
उगवून आलेली पिकेही पाण्यातच
ज्या भागात पावसाने मध्यंतरी काही दिवस उघडीप दिली होती त्या भागातीलच शेतकऱ्यांनी लगबग करून पेरणी केली. त्यांची पिकेही उगवून आली. मात्र सततच्या पावसाने त्या उगवून आलेल्या पिकांवरही पाणी साचल्याने ती पिके वाया गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार असल्याने त्यांना आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळेही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची कुऱ्हाड कोसळली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.