
Solapur News : शहर-जिल्ह्यात यंदा प्रथमच मे महिन्यात मॉन्सूनपूर्व पावसाने उच्चांक मोडला आहे. आतापर्यंत सुमारे १७१ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील पावसाची मे महिन्याची सरासरी ३२ मिलिमीटर इतकी आहे. आतापर्यंत जवळपास सात पट जादा पाऊस झाला आहे. अनपेक्षितपणे झालेल्या या पावसामुळे बेसावध असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
केळी, डाळिंब, पेरू, आंबा, द्राक्ष, पपई या बागांसह कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच वीज पडून जीवितहानी झाली असून मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे बांध तसेच छोटे-मोठे बंधारे फुटले आहेत.
मोहोळमध्ये पावसामुळे ८३० शेतकऱ्यांना फटका
मोहोळ ः गेल्या १३ दिवसांपासून मोहोळ तालुक्यात सुरू असलेल्या पावसाने २६ मेपर्यंत ८३० शेतकऱ्यांचे ४४३ हेक्टर क्षेत्रावरील विविध फळबागांचे तसेच कांदा मका पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.दरम्यान अद्यापही पंचनामे सुरूच आहेत.
१३ व १५ मे रोजी पापरी, खंडाळी, आष्टी, येवती परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्याने केळी, डाळिंब, पेरू, पपई, आंबा, भाजीपाला, शेवगा, दोडका व खरबूज या पिकांचेही मोठे नुकसान झाले. मका, ऊस ही पिके भुईसपाट झाली.
माढ्यात ७५२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान
माढा : माढा तालुक्यात २७ मेपर्यंत झालेल्या पंचनाम्यानुसार ५६ गावांतील ९७३ शेतकऱ्यांच्या ७५२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान अवकाळी पावसामुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अवकाळी पाऊस व विजांमुळे माढा तालुक्यातील नऊ जनावरे वीज पडून दगावली आहेत. यामध्ये भोसरे येथे एक, चिंचगाव येथे एक गाय, अंजनगाव खेलोबा एक गाय व दोन शेळ्या, उपळाई खुर्द एक गाय, जाधववाडी (माढा) येथे एक म्हैस, भुताष्टे दोन शेळ्या अंगावर वीज पडल्याने दगावल्या आहेत. मा
अक्कलकोटमध्य़े पावसामुळे द्राक्ष, पपई बागांना फटका
अक्कलकोट तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे शहर परिसर व तालुक्यातील शेतकऱ्यांची व पिकांचे नुकसान झाले आहे. अति पावसामुळे किणी व वागदरी मंडलातील किरनळी, घोळसगाव, देशमुख बोरगाव, बादोला, शिरवळ, शिरवळवाडी, वागदरी, भुरीकवठे, खैराट, गोगाव, सदलापूर, कोळीबेट आदी गावातील फळबागा, द्राक्ष, पपई व भाजीपाला शेतीचे नुकसान झालेले आहे.
सांगोल्यात पावसामुळे ५२.१ हेक्टर शेती क्षेत्र बाधित
सांगोला तालुक्यात १९९.९३ मिमी इतका मॉन्सूनपूर्व पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या फळपिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. या पावसामुळे ५१ शेतकऱ्यांच्या एकूण ५२.१ हेक्टर शेती क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला आहे.तालुक्यात गेल्या काही दिवसापासून मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. ऐन उन्हाळ्यात मे महिन्यातच मॉन्सूनपूर्व जोरदार पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला असला तरी अनेक पिकांचे नुकसान मात्र झाले आहे.
करमाळा तालुक्यात तीन हजार ४५९ हेक्टरवरील क्षेत्र बाधित
करमाळा तालुक्यात आत्तापर्यंत २५८ मिलिमीटर एवढा पाऊस झाला असून या पावसाने तालुक्यातील पिकांचे मोठे नुकसान केले आहे. तालुक्यातील ३ हजार ४५९ हेक्टर क्षेत्रावरील फळबागा व इतर पिके बाधित झाली आहेत. करमाळा तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक गावातील केळी पिकांचे नुकसान झाले आहे.
कंदर, दहिगाव, कविटगाव, शेटफळ, चिकलठाण, कुगाव, जिंती, उमरड, वाशिंबे, राजुरी, मांजरगाव, कावळवाडी, टाकळी, मांगी, वरकटणे, पांडे या गावातील पिकांची सर्वाधिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाकडे उपलब्ध झालेली आहे.
नुकसान झालेल्या पिकांमध्ये केळी, उन्हाळी उडीद, पालेभाज्या, डाळिंब, कांदा, आंबा या पिकांचा समावेश आहे. अचानक मुसळधार पाऊस पडल्याने अनेक शेतांमधील ताली फुटून शेत वाहून गेल्याचे प्रकार देखील घडले आहेत. याशिवाय शेतीची मशागत करणे बाकी आहे. या पावसात आंबा पिकांचेही नुकसान झाले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.