Maharashtra Rain : राज्यात मागच्या दोन दिवसांपासून अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दरम्यान झालेल्या पावसाने राज्यातील जवळपास ४ लाख हेक्टवरील नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यात पुन्हा पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात येत आहे. दक्षिण पूर्व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने १३ डिसेंबरच्या सुमारास चक्रीवादळ तयार होईल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
दरम्यान, डिसेंबरची सुरुवात पावसाने होत असून, शुक्रवारी राज्यातील बहुतांश भागांत हलका ते मध्यम पाऊस होईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे. सध्या राज्यात ढगाळ वातावरण असून, गार वारे वाहत असल्याने पावसाला अनुकूल वातावरण आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होत असल्याचीही माहिती हवामान विभागाने दिली आहे.
राज्यात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे २२ जिल्ह्यांतील चार लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. राज्यात २६ ते २८ नोव्हेंबर या तीन दिवसांत झालेल्या अवकाळीमुळे नुकसान झालेल्या क्षेत्राची ही आकडेवारी गुरुवारी जाहीर करण्यात आली.
यानुसार नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका यवतमाळ जिल्ह्याला बसला आहे. त्या खालोखाल बुलडाणा आणि नाशिक जिल्ह्याचे नुकसान झाले आहे. बाधित क्षेत्राचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
मदत आणि पुनर्वसन विभागाने दिलेल्या माहितीनुसार ठाणे जिल्ह्यातील शहापूर आणि मुरबाड तालुक्यांना या आपत्तीचा फटका बसला असून, ९१ हेक्टरवरील भाजीपाला आणि आंब्यांचे नुकसान झाले आहे. पालघर जिल्ह्यातील पालघर, वसई, वाडा, डहाणू, जव्हार,
विक्रमगड तालुक्यातील ५४८ हेक्टर क्षेत्रावरील भाजीपाला, भात, नागली, वरई, कडधान्य या पिकांचे नुकसान झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ५३ हेक्टर क्षेत्रावरील भात पिकाचे नुकसान झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक हेक्टरमधील फळझाडांचे नुकसान झाले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.