Jalgaon News : खानदेशात मागील तीन दिवसांत अनेक भागांत मध्यम ते जोरदार पाऊस झाला आहे. पावसाचे सुमारे सहा - सात दिवसांनंतर अनेक भागांत आगमन झाल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. जळगावात गिरणा व तापी नदीला प्रवाही पाणीही आले आहे.
शनिवार (ता.२२), रविवार (ता.२३) व सोमवारी (ता.२४) खानदेशात अनेक भागांत पाऊस झाला. शनिवारी नंदुरबार जिल्ह्यात अनेक भागांत जोरदार ते अतिजोरदार पाऊस झाला. शुक्रवारी (ता.२१) जळगाव जिल्ह्यातील भडगाव, पाचोरा, जामनेर भागांत वादळी पाऊस झाला होता. अतिपावसाने नंदुरबारातील अक्कलकुवा, नंदुरबार, तळोदा भागांत जमिनी खरडून नुकसान झाले आहे.
ठिबकच्या नळ्याही वाहून गेल्या आहेत. धुळे जिल्ह्यातही शनिवार आणि रविवारी अतिजोरदार ते जोरदार पाऊस झाला. यामुळे धुळे, शिंदखेडा तालुक्यातील अनेक गावांतील विहिरी खचून व जमिनी खरडून नुकसान झाले आहे. रविवारी रात्री व सोमवारी सायंकाळी, रात्रीही खानदेशात अनेक भागांत जोरदार पाऊस झाला आहे.
जळगाव जिल्ह्यात तापी नदीवरील भुसावळनजीकच्या हतनूर धरणाचे चार दरवाजे सोमवारी अर्धा मीटरने उघडण्यात आले. धरणाच्या लाभक्षेत्रात पाऊस झाला. धरणात पाण्याची आवक वाढली, यामुळे हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. रविवारी रात्रीच्या वेळेस झालेल्या पावसात वीज कोसळून पारोळा तालुक्यातील शिसोदे भागात १५ मेंढ्या मृत्युमुखी पडल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात पारोळा, आसोदा, म्हसावद, चहार्डी आदी महसूल मंडलांत जोरदार पाऊस झाला. पारोळा मंडलात ९१ मिलिमीटर पाऊस झाला. पाऊस सर्वत्र जोरदार नाही. काही भागांत पाऊस आहे.
धुळ्यात मोठी हानी
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील रोहाणे व दराणे या भागात अतिजोरदार पाऊस झाला. यामुळे परिसरातील विहिरी खचल्या असून, रस्तेही वाहून गेले आहेत. या दोन्ही गावांत नुकसान अधिक असल्याने पंचनाम्यांना तीन दिवस लागतील, अशी स्थिती आहे. सुमारे १०० हेक्टर क्षेत्रातील माती वाहून गेली असून, जमिनी खरडल्या आहेत.
चिमठावळ रस्त्यावरील बंधारा फुटल्याने रोहाने - चिमठावळ रस्ता वाहून गेला आहे. यामुळे हा रस्ता सोमवारीही बंद होता. शिरपूर तालुक्यातील अभानपूर येथे वीज पडून बैलजोडी मृत्युमुखी पडली. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस या भागात झाला. यामुळे रतू भिल यांच्या गोठ्यावर वीज पडली. त्यात बैलजोडी मृत्युमुखी पडली. पशुसंवर्धन विभागाने याबाबत पंचनामा करून अहवाल तयार केला आहे.
नद्यांना प्रवाही पाणी
खानदेशात पावसामुळे धुळे जिल्ह्यातील बुराई, सूर, जळगाव जिल्ह्यातील तापी व गिरणा नदीला प्रवाही पाणी आले आहे. सूर नदीला बऱ्यापैकी पूर आला. तापी नदीत हरनूर धरणातून विसर्ग सुरू आहे. पुढे धुळ्यातील तापी नदीवरील सुलवाडे बॅरेज, नंदुरबारातील प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजमधूनही विसर्ग सुरू झाला आहे. तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गिरणा नदीत प्रवाही पाणी आल्याने नदीकाठच्या विहिरी, कूपनलिकांचे पुनर्भरण होणार आहे. बुराई नदी धुळ्यातील शिंदखेडा, साक्री तालुक्यासाठी महत्त्वाची आहे. या नदीला पाणी आल्याने काही गावांना दिलासा मिळाला आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.