
Nashik News : निफाड तालुक्यातील दिक्षी, दात्याने, जिव्हाळे, थेरगाव, ओणे परिसरातील शेतीसाठी भारनियमन वगळता इतर वेळेत सुरळीत व सलग आठ तास वीजपुरवठा (Electricity Supply) करावा या मागणीसाठी दिक्षी परिसरातील शेतकऱ्यांनी ओझर येथील महावितरण कंपनीच्या (Mahavitaran) कार्यालयावर धडक मोर्चा काढून ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांना घेराव घातला.
या वेळी ओझर ग्रामीणच्या सहायक अभियंता सुवर्णा मोरे यांना नियमित वीजपुरवठ्याबाबत (Electricity Supply) निवेदन देण्यात आले.
सध्या उन्हाचा चटका वाढत असल्याने पिकांना वेळेवर सिंचन करावे लागत आहे; मात्र वीजपुरवठा खंडित होणे, शॉर्टसर्किट होणे, देखभालीअभावी ट्रान्स्फॉर्मर जळणे, वीज तारा लोंबकळणे असे प्रकार होत आहेत.
त्यामुळे शेतीमालाचे नुकसान होत असून शेतकरी त्रस्त आहेत. सुरळीत वीजपुरवठा होत नसल्यामुळे शेतीमाल उत्पादनावर त्याचा मोठा परिणाम होत आहे. याचा विचार करून आठ तास अखंडित वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, आनंदराव बोराडे, विनायक चौधरी, अरुण घुगे, डॉ. योगेश्वर चौधरी, देवीदास चौधरी आदींसह शेतकरी उपस्थित होते.
सुरळीत पुरवठ्याचे आश्वासन
परिसरातील अनेक शेतकरी नियमित कृषीपंपाचे बिल भरत असूनही अशी परिस्थिती होते, हे योग्य नाही. याशिवाय क्षेत्रीय पातळीवर काम करणाऱ्या मुजोर कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांसोबत सौजन्याने वागणे व बोलण्याबाबत सूचना द्याव्यात, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.
सहायक अभियंता मोरे यांनी शेतकऱ्यांच्या भावना वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून शेतीपंपांना सुरळीत वीजपुरवठा करण्याचे आश्वासन दिले. शेतीसाठी वीजपुरवठा सुरू असताना देखभालीची कामे शक्यतो केली जाणार नाहीत, असे आश्वासनही अधिकाऱ्यांकडून देण्यात आले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.