
Pune News : सद्यःस्थितीत राज्याच्या विविध भागांमध्ये थंडीची लाट पसरली आहे, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना द्राक्ष, केळीच्या यांसारख्या बागांवर विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. तर, जवस, मोहरी, गहू, हरभरा यांसारख्या पिकांसाठी ही थंडी लाभदायक आहे. तज्ज्ञांच्या सल्ल्याप्रमाणे बागांची निगा राखली तर थंडीचा ताण कमी राखण्यात मदत होणार आहे.
राज्यात थंडीची लाट पसरली असून, या स्थितीचा आंबा, केळी, मोसंबी, डाळिंब, पेरू, द्राक्ष अशा विविध फळबागांवर विपरीत परिणाम होतो. तो टाळण्यासाठी फळबागेत जमिनीवर आच्छादन करावे. बागेला शक्यतो संध्याकाळी किंवा रात्री पाणी द्यावे. लिंबूवर्गीय बागेत सल्फेट ऑफ पोटॅश (००ः००ः५०) १५ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
काढणीस असलेल्या डाळिंब फळाची काढणी करून घ्यावी. चिकू बागेत आंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे, अशी माहिती डॉ. कैलास डाखोरे (कृषी हवामान विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी) यांनी दिली आहे.
तसेच, रब्बी हंगामातील जवस, मोहरी, गहू, हरभरा यांसारख्या पिकांसाठी सध्या कमी झालेले तापमान उपयुक्तच ठरणार असल्याची माहिती डॉ. गोपाला (प्रादेशिक संशोधन केंद्र, नागपूर) यांनी दिली आहे.
केळी
केळी हे उष्ण कटिबंधीय पिकामध्ये सलग दोन दिवस तापमानात फार घट (१० अंशापेक्षा कमी) झाल्यास त्यात विविध शारीरिक विकृती दिसून येतात. नवीन पाने येण्याचा वेग कमी होतो. दोन पानांतील अंतरही कमी होते. घड बाहेर पडण्याच्या अवस्थेतील बागांमध्ये घड सामान्यपणे न बाहेर पडता, तो खोड फोडून (तडे पडून) बाहेर येतो.
असा घड पुढेही व्यवस्थित वाढत नाही. शाकीय वाढीच्या अवस्थेतील बागांमध्ये पानांच्या कडा करपून काळपट दिसू लागतात. त्यामुळे एकूणच केळीच्या वाढीवर विपरीत परिणाम दिसून येतो. ज्या बागांमध्ये काढणी सुरू आहे, अशा ठिकाणी घडातील केळीची लांबी वाढत नाही. तसेच घड पूर्ण भरत नाही.
तापमान कमी होत असल्याच्या स्थितीमध्ये आपल्या बागेमध्ये ओला-सुका कचरा एकत्र करून धूर करावा. शक्य झाल्यास रात्रीच्या वेळी पाणी द्यावे. त्यामुळे तापमानातील घट काही प्रमाणात रोखली जाते. ठिबकमधून सल्फेट ऑफ पोटॅश (००ः००ः५०) ३.५ ते ४ किलो प्रति १ हजार झाडे याप्रमाणे द्यावे. त्यामुळे झाडावर येणारा थंडीचा ताण कमी होण्यास मदत होईल, अशी माहिती निवृत्त फळबागशास्त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर पुजारी यांनी दिली.
द्राक्ष :
वातावरणात झालेल्या अचानक बदलामुळे दिवसाचे तापमान ३५ अंशापर्यंत असून, रात्रीच्या तापमान खूपच घसरण झाली आहे. निर्यातक्षम द्राक्ष बागा असलेल्या निफाड (जि. नाशिक) परिसरात तापमान ६ अंशाच्या खाली गेले आहे. यामुळे द्राक्षाच्या हिरव्या रंगद्रव्याचे रूपांतर गुलाबी रंगात होऊन ‘पिंक बेरी’ची समस्या उद्भवते.
त्याच प्रमाणे मण्यात पाणी उतरण्याआधीच्या अवस्थेतील बागेत मणी तडकण्याची किंवा चिरण्याची समस्यासुद्धा दिसून येते. या समस्या टाळण्यासाठी हवामानाचा अंदाज आधीच जाणून घेऊन द्राक्ष बागेमध्ये पाणी देण्याचे प्रमाण हळूहळू वाढवावे. त्यामुळे वेलीवर अचानक दाब (टर्गर प्रेशर) वाढून होणारी मणी तडकण्याची समस्या कमी होईल.
पिंक बेरी टाळण्याच्या दृष्टीने सध्या तरी ठोस उपाययोजना नसल्या तरी मण्यात पाणी उतरण्यापूर्वी पेपरने घड झाकणे, बागेत मोकळे पाणी देणे व जागोजागी शेकोटी पेटवणे यामुळे बागेतील तापमान वाढण्यास मदत होईल, असे माहिती या क्षेत्रातील फळबाग शास्त्रज्ञांनी दिली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.