Cotton Crop : पूर्वहंगामी कापूस पीक संकटात

Cotton Cultivation : पाऊस लांबल्याने कोरडवाहू कापसाची लागवड सुरू झालेली नाही. तसेच पूर्वहंगामी कापूस पिकालाही उष्णतेचा फटका बसत आहे.
Cotton
CottonAgrowon
Published on
Updated on

Jalgaon Cotton News : पाऊस लांबल्याने कोरडवाहू कापसाची लागवड सुरू झालेली नाही. तसेच पूर्वहंगामी कापूस पिकालाही उष्णतेचा फटका बसत आहे. खानदेशात ९० टक्के पूर्वहंगामी कापसाची लागवड पूर्ण झाली आहे. ही लागवड सुमारे सव्वालाख हेक्टरवर आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे ८० हजार हेक्टरवर पूर्वहंगामी कापूस पीक आहे.

सकाळपासून उष्णता असते. रात्री १० पर्यंत उष्ण वारे वाहतात. कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअसवरच आहे. यामुळे पिकाची स्थिती हवी तशी नाही, कापूस उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत.

वाढत्या उष्म्यामुळे मुळात नाजूक असलेले हे पीक मुबलक पाण्याअभावी करपत आहे. लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी लागवड केली, मात्र पावसाने पाठ फिरविल्याने ते संकटात सापडले आहेत.

यंदा देखील कूपनलिका उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून शेतकऱ्यांनी मेच्या मध्यापासून कापूस लागवड सुरू केली आहे. अजूनही लागवड सुरू आहे. काहींनी उष्णता कमी होईल यामुळे लागवड लांबविली, पण उष्णता कायम आहे.

Cotton
Cotton Market : वायद्यांमध्ये कापूस भाव सुधारले; बाजार समित्यांमध्ये कायम !

दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याने उन्हाच्या तीव्रतेमुळे कापसाची कोवळी रोपे करपू लागली आहेत. ठिबकचा उपयोग कमाल शेतकऱ्यांनी केला आहे. पण विजेचा पुरवठा व्यवस्थित नसतो. अनेकांची जमीन हलकी, मुरमाड आहे. अशा क्षेत्रात सिंचनास काही तास विलंब झाल्यास कोवळे कोंब होरपळतात.

मागील वर्षी अतिपावसामुळे कापूस पीक खराब झाले होते. त्यामुळे कापसाचे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन होऊ शकले नाही. मागील नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी कापूस लागवडीचे नियोजन केले, परंतु वाढत्या तापमानामुळे कापसालाही फटका बसत आहे. पिकात नांग्या भराव्या लागत आहेत.

रोपे होरपळण्याचे प्रमाण २० ते २५ टक्के आहे. त्यात नांग्या भरण्यासाठी बियाणे आणावे लागत आहे. एक एकरात सव्वा पाकिटे बियाणे यामुळे यंदा लागत आहे. यात उत्पादन खर्च वाढला आहे. अनेकांच्या कूपनलिका आटत आहेत. अमळनेर, पारोळा, धुळ्यातील धुळे, शिंदखेडा भागांत जलसाठे मुबलक नाहीत. यामुळे नवी अडचण तयार होत आहे. मुरमाड क्षेत्रात रोज सिंचन करावे लागते.

दिवसभर प्रतीक्षा

जळगाव तालुक्यात कानळदा, फुपनगरी भागात गुरुवारी (ता. १५) दिवसभर कृषिपांपांची वीज बंद होती. शेतकरी शेतात विजेची प्रतीक्षा करीत होते. पण रोहित्र बसविण्याच्या कामामुळे वीज बंद आहे, साडेतीन वाजता वीज सुरू होईल, असे सांगितले जात होते. वीज मात्र सायंकाळी सहापर्यंत शेतात आलीच नाही.

गुरुवारी सकाळी फक्त एक ते सव्वातास वीज शिवारात देण्यात आली. या प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. या समस्येमुळे काही शेतकऱ्यांनी कापूस लागवड अधिकची करणेही टाळले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com