Nashik Rain News : नाशिक जिल्हाभरात मार्च व एप्रिल महिन्यात वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीने पिकांची मोठी दैना केली आहे. त्यामध्ये जिल्ह्याचे प्रमुख नगदी पीक असलेल्या उन्हाळ कांद्याला मोठा फटका बसला आहे.
गारपिटीच्या तडाख्यात कांदा काढणीपूर्वीच जमिनीत सडू लागल्याने मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे हा कांदा काढायलासुद्धा परवडत नाही.
त्यामुळे इगतपुरीतील तरुण शेतकरी गोकुळ जाधव यांनी उभ्या कांदा पिकावर रोटाव्हेटर फिरवून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
गत खरीप हांगमापासून अतिवृष्टी, अवकाळी पाऊस तर आता वादळी वाऱ्यासह झालेल्या तुफान गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांची मोठी हानी झाली आहे. तर आता रब्बी हंगामात ऐन पिके काढणी अवस्थेत असताना अनेक भागांत मोठ्या प्रमाणात नुकसान शेतकऱ्यांच्या वाट्याला आले आहे.
एकीकडे शेतीमाल पिकला तर तो काढण्याच्या अगोदरच अस्मानीच्या संकटात जिल्ह्यात ३५ हजार ३०० हेक्टरवर लागवडी मातीमोल झाल्या.
ज्यामध्ये सटाणा, मालेगाव, सिन्नर, चांदवड, देवळा, दिंडोरी, सुरगाणा, इगतपुरी, येवला, निफाड, पेठ, इगतपुरी तालुक्यांत वाचलेला थोडाफार कांदा बाजारात नेला तर उत्पादन खर्चाच्या खाली कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. एकीकडे अस्मानीचा तर दुसरीकडे सुलतानीचा फटका असा दुहेरी फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
गारपिटीने कांद्याची पात तुटून पडली, मार बसल्याने कांद्याला पातच नाही. तर परत झालेल्या पावसाने काढणीपूर्वीच वाफ्यात कांद्याची सड झाल्याने पीक हातातून गेले आहे.
जिल्ह्यात सटाणा, देवळा, कळवण, नांदगाव तालुक्याच्या पूर्व भागांतही कांदा काढण्याच्या दरम्यान तो सडत आहे.
त्यातच इगतपुरीच्या पूर्व भागात शेणीत, बेलू, नांदगाव, साकुर परिसरात झालेल्या गारपिटीमुळे कांद्याची काढणीपूर्वीच माती झाल्याने शेतकऱ्याने पिकावर रोटाव्हेटर फिरवून आपली हतबलता व्यक्त केली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.