
Pune News : देशात हरितक्रांती डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांनी आणली; त्याचप्रमाणे डॉ. प्रमोद चौधरी यांनी जैवइंधन क्रांती आणली आहे. त्यांच्यामुळे जैवइंधनाच्या विविध क्षेत्रांत सध्या सुरू असलेल्या घडामोडींमुळे देशाच्या कृषी व्यवस्थेत अमूलाग्र बदल होऊ शकतील, असे गौरवोद्गार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी काढले.
प्राज इंडस्ट्रीज लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष व भारताचे ‘इथेनॉल मॅन’ अशी ओळख असलेल्या डॉ. प्रमोद चौधरी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘अमृतयोग’ सोहळ्यात दूरदृष्यप्रणालीद्वारे ते बोलत होते. प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शां. ब. मुजुमदार, फोर्स मोटरचे अध्यक्ष डॉ. अभय फिरोदिया,
‘पर्सिस्टंट’चे अध्यक्ष डॉ. आनंद देशपांडे, प्राज इंडस्ट्रीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक शिशिर जोशीपुरा, ‘प्राज’च्या ‘बायोएनर्जी बिझनेस’चे अध्यक्ष अतुल मुळे तसेच राज्याच्या विविध भागांतील उद्योजक तसेच साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. साखर उद्योगाच्या वतीने श्री.चौधरी यांना श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याच्या प्रतिनिधींनी मानपत्र दिले.
श्री.गडकरी म्हणाले, ‘‘अडचणीत आलेल्या कृषी व्यवस्थेमुळे खेड्यातील ३० टक्क्यांहून अधिक जनता शहरात स्थलांतरित झाली आहे. खेडेगावातील जीवनमानाला दर्जा राहिलेला नाही. शेतकरी वर्गाचे हाल होत आहे. अशावेळी डॉ. चौधरी यांनी परिश्रमपूर्वक आणलेली जैवइंधनाची क्रांती देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेला चालना देणारी ठरणार आहे. प्राजच्या शास्त्रज्ञांनी जैवइंधनाची कवाडे देशात उघडली.
त्यांनी जैवऊर्जेत इथेनॉल, हवाई इंधन, बायोसीएनजी असे भक्कम पर्याय देशाला दिले आहेत. यामुळे कृषी क्षेत्राला ऊर्जा निर्मिती क्षेत्राकडे वळाले आहे. इथेनॉलमुळेच मक्याची खरेदी वाढली. परिणामी शेतकऱ्यांकडील मक्याचे प्रतिक्विंटल भाव १२०० रुपयांवरून २४०० रुपयांपर्यंत गेले आहेत. डॉ. चौधरी यांच्या कर्तृत्वातून आकाराला येत असलेल्या जैवऊर्जा क्षेत्रामुळे देशाच्या कृषी विकासाचा दर २० टक्क्यांपर्यंत वाढणार आहे.’’
डॉ. मुजुमदार म्हणाले, ‘‘अहिल्यानगरच्या कोळपेवाडीमधील सामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या चौधरींनी देशाच्या जैवइंधन निर्मिती क्षेत्रात अतुलनीय काम केले आहे. त्यांच्यासारखे विद्यार्थी मला लाभले हे माझ्या शिक्षकी पेशाचे वैभव आहे.’’ चौधरींनी उद्योग क्षेत्रात केवळ संशोधनच नव्हे तर मूल्य आणि संस्कृतीदेखील आणली, असे श्री. देशपांडे यांनी नमूद केले.
श्री. फिरोदिया म्हणाले, की प्रमोद हा मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आला नसून मध्यम उत्पन्नाच्या उच्च दर्जाच्या कुटुंबात जन्मला आहे. त्याने मूल्य, संस्कार, राष्ट्रीयत्व जपले आहे. शिक्षणाला उद्यमशीलतेची व मूल्यांची जोड दिल्यास ते फलद्रूप ठरते हे त्याने कर्तृत्वपूर्वक दाखवून दिले आहे. त्याने आमच्या कंपनीत उमेदवारीचे प्रशिक्षण घेतले याचा आम्हालाही अभिमान वाटतो.
नितीन गडकरी म्हणाले...
भविष्यात भारताला इथेनॉल निर्यातदार होण्याची संधी
हवाई इंधन निर्मितीत देश अग्रेसर होणार.
बायोमास ते बायोसीएनजी ही जैवइंधनाची वाटचाल झपाट्याने होणार.
चार बड्या कंपन्यांच्या १०० टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या मोटारी काही महिन्यांत येणार.
डिझेलमधील इथेनॉलचे मिश्रण १५ टक्क्यांपर्यंत नेण्याचा निर्णय लवकरच होणार.
भाताच्या टाकाऊ अवशेषापासून इथेनॉल निर्मितीचे ४०० प्रकल्प उभारले जाणार.
इथेनॉलवर चालणारे ड्रोनदेखील बाजारात येणार.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.