Farming Disease Control: मागील आठवड्यात महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी चांगला पाऊस झाला. उत्तर कोकणपट्टीत व घाटमाथ्यावर जुलै महिन्याच्या सरासरीपेक्षा ९० टक्के पाऊस जास्त झाला. बऱ्याच ठिकाणी ढगफुटी झाली. लोणावळ्यासारख्या काही ठिकाणी अल्प काळात ५०० ते ७०० मि. मी. पाऊस झाल्याने जवळपासच्या नद्यांना पूर आला आणि दरड कोसळण्याचे प्रकार झाले. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे बरीच झाडे उन्मळून पडली. मुंबई शहरामध्ये इमारतींसह अनेक मालमत्तांचे नुकसान झाले. काही लोकांना आपले जीवन गमवावे लागले. .सर्व द्राक्ष बागांच्या भागात कमी जास्त प्रमाणात पाऊस झाला. नाशिक विभागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस मिळाला, पण नदी तलावामध्ये पाणी येण्याइतका पाऊस झालेला नाही. मुळा, मुठा आणि इंद्रायणीला भरपूर पाणी आल्यामुळे उजनीच्या धरणाची पाणीपातळी वाढली. त्यामुळे पंढरपूर, सोलापूर भागातील शेतकरी आनंदी असले तरी त्या भागात अद्याप पावसाळ्याचा पाऊस मिळालेला नाही. सोलापूर, अक्कलकोट, बार्शी अशा काही भागात मुसळधार, तर काही ठिकाणी कपडे ओले होण्याइतपतच रिमझिम पाऊस मिळाल्याचे शेतकरी सांगतात..Grape Crop Diseases: रोगांच्या प्रादुर्भावामध्ये पावसासोबतच तापमान महत्त्वाचे .सर्वच द्राक्ष विभागातील पाऊस आज (गुरुवार)पासून थांबण्याची शक्यता आहे. येत्या आठवड्यातही वातावरण कमीजास्त प्रमाणात ढगाळ राहणार असले तरी पुढच्या सात दिवसात पाऊस पडण्याची शक्यता कुठेच दिसत नाही. अनेक ठिकाणी मागील आठवड्यात पाऊस जरी फारसा झाला नसला तरी सर्वच विभागामध्ये वेगाने वाहणारे थंड वारे वाहत होते.ढगाळ वातावरण आणि थंड वारे यामुळे सर्व द्राक्ष विभागांतील तापमान ३० अंश सेल्सिअसपेक्षा कमी राहिले. वातावरणातील आर्द्रतेमुळे येत्या आठवड्यातही तापमानात फारसा बदल होईल असे वाटत नाही. थंड वारे आणखी काही दिवस चालूच राहतील..महाराष्ट्रात पुढील बुधवार - गुरुवार (ता. १५ -१६) नंतर वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे. ता. २१ -२२ नंतर पुन्हा चांगल्या पावसाची शक्यता दर्शविली जात आहे. या वेळी द्राक्ष विभागांमध्ये सुद्धा पाऊस होईल, अशी अपेक्षा करूया..या वर्षी अजूनही कोणत्याही द्राक्ष विभागांमध्ये केवडा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याची बातमी आली नाही. मागच्या आठवड्यातील पावसानंतर केवडा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता होती. जास्त पाऊस झालेल्या भागात केवडा दिसला तरीही येत्या आठवड्यात व नंतर बरेच दिवस पावसाची उघडीप राहणार असल्यामुळे केवडा रोग वाढण्याचा धोका आता किमान पुढील पाऊस येईपर्यंत तरी निश्चितच नाही. अशीच काहीशी परिस्थिती करपा रोगाच्या बाबतीत दिसते. पुढील काही दिवसांत नवीन फुटी येण्याची शक्यता आहे. .या फुटी पुन्हा पाऊस होण्याआधी खुडा करून काढून टाकल्यास बुरशीजन्य करपा रोगाचा धोका राहणार नाही. पाऊस झालेल्या भागात थंड वाऱ्यामुळे तापमानामध्ये बऱ्यापैकी घट झाली आहे. या कमी तापमानात जिवाणूजन्य करपा रोगाचा धोका अजिबात नाही असेच वाटते. म्हणूनच केवडा किंवा करपा रोगासाठी प्रतिबंधात्मक फवारणी घेण्याची घाई करू नका. पावसात चांगली उघडीप मिळाल्यानंतर ताम्रयुक्त बुरशीनाशकाची एक फवारणी देण्याची आवश्यकता आहे. ही फवारणी पावसाळी वातावरण नसलेल्या दिवशी द्यावी..ढगाळ वातावरणामुळे बागेत सूर्यप्रकाशाची तीव्रता कमी झाली आहे. सर्व द्राक्ष विभागांमध्ये आर्द्रता ८० ते ९० टक्क्यांच्या पुढे आहे. बागेत कॅनोपी आता बऱ्यापैकी दाट झालेली आहे. कॅनॉपीच्या आतील भागात सापेक्ष आर्द्रता जास्त आणि प्रकाशाची तीव्रता आणखी कमी असते. या दोन्ही गोष्टींमुळे भुरी रोग वाढण्यासाठी अत्यंत पोषक वातावरण आहे. सर्वसाधारणपणे थंडीच्या दिवसात भुरी वाढते, असे बोलले जात असले तरी खरे पाहता भुरीसाठी तापमान तितके महत्त्वाचे नाही. .Grape Orchard Management: एप्रिल छाटणीच्या बागेमध्ये घडनिर्मितीसाठी व्यवस्थापन.आर्द्रता असल्यास जास्त तापमानात सुद्धा भुरी वाढते. उदा. पॉलिहाउस किंवा प्लॅस्टिकच्या कव्हर खाली बाहेरच्या वातावरणापेक्षा ४ ते ५ अंश सेल्सिअस तापमान जास्त असते, तरीही तिथे भुरी जास्त वाढते. कारण तेथील जास्त आर्द्रता आणि कमी प्रकाश तीव्रता होय. तसेच जास्त सापेक्ष आर्द्रतेमध्ये भुरी वाढते, हे खरे असले तरी पानावर ओलावा असला की भुरी वाढत नाही. याचमुळे पावसाच्या दिवसांत भुरीला फारसे महत्त्व दिले जात नाही. या वर्षीच्या मॉन्सूनचा विचार केला तर आणि सध्याचे ढगाळ वातावरण द्राक्ष विभागांमध्ये असेच बरेच दिवस राहिल्यास या वर्षी द्राक्ष बागेत भुरी हा एक महत्त्वाचा रोग असेल असे मला वाटते. त्यामुळे या वर्षी भुरीच्या नियंत्रणाकडे बारकाईने लक्ष द्यावे लागेल..भुरी नियंत्रणासाठी उपयुक्त बाबीआपल्या सर्व द्राक्ष विभागांमध्ये कुठेही भुरी सुप्त अवस्थेमध्ये जात नाही तरी ती वर्षभर थोड्या प्रमाणात तरी कार्यरत राहते. पोषक वातावरणामध्ये भुरी वेगाने वाढते. भुरीचे बीजाणू (कोनिडिया) हवेद्वारे दूरवर पसरू शकतात. कोवळ्या किंवा जुन्या पानांवरही भुरी वाढू शकते. म्हणूनच भुरीसाठी पोषक वातावरण आढळल्यास भुरी नियंत्रणासाठी त्वरित प्रतिबंधात्मक फवारणी देणे आवश्यक आहे. या आठवड्यात सर्वच भागामध्ये भुरीसाठी वातावरण पोषक आहे. पहिली पावसाची उघडीप मिळताक्षणी बागेमध्ये भुरीच्या नियंत्रणासाठी फवारणी घ्यावी. सध्याच्या परिस्थितीत बहुतांश बागेमध्ये शेंड्याची वाढ थांबलेली असल्यामुळे भुरीच्या नियंत्रणासाठी आंतरप्रवाही बुरशीनाशकांची जरुरी नाही. सल्फरच्या फवारणीतूनही चांगले नियंत्रण मिळू शकेल..पानामध्ये पालाशची मुबलकता असणे भुरीच्या उत्तम नियंत्रणासाठी आवश्यक आहे. पालाश कमतरता असलेल्या पानांवर भुरी वेगाने वाढते. त्यावर मोठ्या प्रमाणात बीजाणू तयार होतात. भुरीचा प्रसारही वेगाने होतो. बागेत पोटॅश दिलेले असले तरीही पावसानंतर पानामध्ये काही काळ पोटॅशची कमतरता भासू शकते.कारण पावसाच्या पाण्यासोबत पानातील पोटॅश पानातून बाहेर जाऊ शकते. पोटॅशची कमतरता असलेल्या पानाच्या वाट्या (कर्लिंग) होतात. (छायाचित्र १). पानाच्या वाट्या झालेल्या भागात प्रकाश कमी असतो व वाटीच्या आतल्या भागात बुरशीनाशकाची फवारणी पोहोचत नाही. यामुळे अशा पानांवर भुरी वेगाने वाढून जास्त बीजाणू तयार होतात. मागील काही दिवसांत ज्या बागांमध्ये पाऊस झाला आहे, तिथे पोटॅशची (०:५२:३४ हे विद्राव्य खत २ -३ ग्रॅम प्रति लिटर) फवारणी जरूर घ्यावी. सध्या काडी परिपक्व होत आहे. पोटॅशची फवारणी काडी परिपक्व होण्यासाठीही मदत करेल..भुरीच्या नियंत्रणासाठी कॅनॉपीचे व्यवस्थापन अतिशय महत्त्वाचे असते. जास्त घन कॅनॉपी पानांच्या जवळपास कमी प्रकाश व जास्त आर्द्रता तयार करते. घन कॅनॉपीमध्ये बुरशीनाशकाच्या फवारणीचे तुषार आतल्या भागापर्यंत पोहोचत नाहीत.काड्या वाढवताना आणि त्यांना वर बांधून घेत असताना आतल्या भागात जास्तीत जास्त खेळती हवा राहील आणि सूर्यप्रकाश पोहोचेल याची काळजी घ्यावी. बागेत वापरले जाणारे फवारणी यंत्र विचारात घेऊन फवारणी करताना त्या यंत्राचे नोझल व कॅनॉपीतील पाने यामध्ये कमीत कमी १ -१.५ फूट अंतर राहील, याची काळजी घ्यावी. .त्यामुळे नोझलमधून द्रावण निघताना व त्याचे तुषार बनताना अडथळा होणार नाही. भरपूर तुषार बनले तर बुरशीनाशक आतल्या कॅनॉपीमध्ये चांगल्या रितीने पोचेल व रोग नियंत्रण चांगले मिळेल. भुरीच्या नियंत्रणासाठी पानाच्या पृष्ठभागावर सर्व ठिकाणी बुरशीनाशक पोचणे अतिशय महत्त्वाचे आहे. भुरीची बुरशी फक्त पृष्ठभागावरीलच पेशींवरच (इपिडर्मिस) प्रादुर्भाव करते. आंतरप्रवाही बुरशीनाशक फवारले तरी ते पृष्ठभागावरील सर्व पेशींमध्ये आंतरप्रवाही होईल, याची शाश्वती नसते. कारण बहुतांशी आंतरप्रवाही बुरशीनाशके स्वभावतः पानाच्या कडेभोवती गोळा होतात किंवा नव्या वाढत्या फुटींकडे वाहिले जातात. भुरीच्या चांगल्या नियंत्रणासाठी फवारणीच्या चांगल्या कव्हरेजला पर्याय नाही.- डॉ. एस. डी. सावंत ९३७१००८६४९(लेखक राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे निवृत्त संचालक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.