
Latur News : विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप लपून राहिला नाही. संघटनेच्या दबावापोटी प्रशासनाने बदल्यांची प्रक्रिया पार पाडली. यात पदाधिकाऱ्यांना सोयीच्या तर गॉडफादर नसलेल्यांना गैरसोयीच्या ठिकाणी जावे लागले. आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्याने जिल्ह्यात पाच तलाठ्यांना (भाऊसाहेब) मंडळ अधिकारीपदी पदोन्नती मिळणार आहे.
पदोन्नती मिळणाऱ्यांत संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. या पदाधिकाऱ्यांनी पदोन्नतीपूर्वीच क्रीम पोस्टिंगच्या जागी रुमाल टाकून ठेवत त्यांना कुठे पोस्टिंग मिळणार व त्यांच्या जागी कोणाला नियुक्ती मिळणार, याची चर्चा करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे गॉडफादर नसलेले तलाठी हतबल झाले असून, त्यांना गैरसोयीच्या ठिकाणी जावे लागणार आहे. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांमध्ये नेहमीच चांगल्या ठिकाणी पदोन्नती व बदलून येण्यासाठी स्पर्धा असते. या स्पर्धेत नेहमीच संघटनेचे पदाधिकारी आघाडीवर असतात, हे लपून राहिलेले नाही.
अनेक ठिकाणी पदाधिकारीच चांगल्या ठिकाणी स्वतःची सोय करतात व संघटनेच्या सभासदांची साध्या ठिकाणावर बोळवण करतात. चांगल्या ठिकाणी येण्यासाठी तलाठी कर्मचाऱ्यांना संघटनेच्या माध्यमातून जाण्याशिवाय पर्यायच उरला नसल्याचे चित्र आहे. लातूर जिल्ह्यात तर तलाठी संघटनेत दोन गट असून, कोणत्या गटाच्या माध्यमातून गेल्यास चांगल्या ठिकाणी बदली मिळेल, याबाबत तलाठ्यांमध्ये संभ्रम आहे.
अनेकदा तलाठ्यांना दोन्ही गटांना सांभाळूनच चांगल्या ठिकाणचा सज्जा पदरात पाडून घ्यावा लागत आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या बदल्यांमध्ये गटांतील वादामुळे काही तलाठ्यांच्या बदल्यांचा घोळ अनेक दिवस सुरू होता. आपल्या गटातील तलाठ्याला चांगल्या ठिकाणी पोस्टिंग देण्यासाठी ओढाताण सुरू होती. गेल्यावर्षी स्वतःला चांगल्या ठिकाणी बदली मिळावी म्हणून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीच तलाठी कर्मचाऱ्यांची मंडळ अधिकारी होणारी पदोन्नती लांबणीवर टाकण्यात आली.
बदलीतून चांगल्या ठिकाणी बदल्या झाल्यानंतर पदोन्नतीची फाइल हलली गेली. या घटनेवरून संघटनेत रणकंदन झाले. आरोप प्रत्योरापाच्या फैरी झडल्या. आता पुन्हा पाच तलाठ्यांना मंडळ अधिकारीपदी मिळणाऱ्या पदोन्नतीवरून जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे. पाच तलाठ्यांमध्ये संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश असून, त्यांनी काही महिन्यांपासूनच लातूरला क्रीम पोस्टिंगची फिल्डिंग लावून ठेवली आहे. त्यापुढे जाऊन त्यांना पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांचा पदभार कोणाला द्यावा, याचेही नियोजन त्यांनी लावले आहे. हे पदाधिकारी त्याची चर्चा घडवून आणत असल्याने प्रशासनावर त्यांची किती पकड आहे, याचे कुतूहल सर्वांना वाटत आहे.
धाराशिवलाही पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न
लातूरला पाच तलाठ्यांना पदोन्नती देण्याची प्रक्रिया नियोजित असून लवकरच त्याबाबत बैठकही होणार आहे. लातूरचे तलाठी संघटनेचे अध्यक्ष गोविंद शिंगडे हे स्वतः पदोन्नतीच्या यादीत असल्याने त्यांनी याबाबत जोरात पाठपुरावा सुरू केला आहे.
धाराशिवमध्ये सध्या तरी तलाठी कर्मचाऱ्यांना मंडळ अधिकारीपदी पदोन्नती देण्याबाबत प्रशासनाकडून प्रक्रिया सुरू नाही. तरीही पदोन्नतीच्या यादीत असलेल्या संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी पदोन्नती मिळवून चांगल्या ठिकाणी येण्याचे आतापासूनच नियोजन सुरू केले आहे. तशी चर्चाही ते करत असल्याने लातूरप्रमाणेच धाराशिवलाही तलाठी संघटनेचे जिल्हा प्रशासनावर वर्चस्व दिसून येत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.