Cotton Management : चौदा एकरावर कपाशी लागवडीचे नियोजन

Cotton Crop : अकोला जिल्ह्यातील निंभारा (ता. बार्शीटाकळी) येथे गणेश नानोटे यांची ४५ एकर शेती. मागील ३० वर्षांपासून ते कपाशी लागवड करत आहेत. या वर्षी त्यांनी १४ एकरांत कपाशी लागवड केली आहे.
Cotton  Management
Cotton ManagementAgrowon

शेतकरी नियोजन पीक ः कपाशी

शेतकरी ः गणेश श्‍यामराव नानोटे

गाव ः निंभारा, ता. बार्शीटाकळी, जि. अकोला

एकूण क्षेत्र ः ४५ एकर

कपाशी क्षेत्र ः १४ एकर

Cotton : अकोला जिल्ह्यातील निंभारा (ता. बार्शीटाकळी) येथे गणेश नानोटे यांची ४५ एकर शेती. मागील ३० वर्षांपासून ते कपाशी लागवड करत आहेत. या वर्षी त्यांनी १४ एकरांत कपाशी लागवड केली आहे. या वर्षी प्रथमच लागवडीनंतर चार जुलैपर्यंत पावसाची वाट पाहावी लागली. दरम्यानच्या काळात तापमान ४० अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. उन्हामुळे पीक लागवड लांबणीवर पडली. पीक वाचविण्यासाठी खूप मेहनत करावी लागली. तसेच पिकाची वाढसुद्धा अपेक्षेपेक्षा कमी राहिली. निसर्गाच्या असमतोलामुळे पिकाच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम झाल्याचे दिसते आहे. लागवडीच्या सुरुवातीच्या काळात पावसाचा खंड, नंतर सतत पाऊस अशी स्थिती कायम होती.

लागवड

लागवडीपूर्वी जमिनीची चांगली मशागत करून जमीन लागवडीसाठी तयार केली. बैलजोडीच्या साह्याने सऱ्या पाडून घेतल्या.

दरवर्षी मागील वर्षी चांगले उत्पादन मिळालेले आणि काही निवड वाण लागवडीसाठी निवडले जातात. साधारण १४० ते १५० दिवसांच्या मध्यम कालावधीच्या बियाण्यांची यंदा लागवडीसाठी निवड केली आहे. जेणेकरून साधारण १६५ दिवसांत पीक शेतातून निघून शेत रिकामे होईल.

लागवडीसाठी खासगी कंपनीचे एकरी २ ते ३ पॅकेट बियाणे (प्रति पॅकेट ४५० ग्रॅम) वापरले. मजुरांकडून बियाणांची टोकण करून घेतली.

हलक्या जमिनीत ३ बाय सव्वा फूट तर केळी पिकाची बेवड असलेल्या शेतामध्ये साडेचार बाय सव्वा फूट अंतरावर बियाणे लागवड केली. एका जागी एकच बियाणे सरीच्या वरील टोकावर टोकण पद्धतीने लावण्याचे काटेकोर पालन केले. त्यामुळे नांग्या भरण्याची आवश्यकता भासत नाही शिवाय जास्त पाऊस झाला तरी बियाणे दडपले जाण्याची शक्यता कमी होत असल्याचे नानोटे सांगतात.

Cotton  Management
Cotton Crop Management : शेतकरी पीक नियोजन : कपाशी

मागील कामकाज

सध्या पीक ४० ते ६० दिवसांचे झाले आहे.

या वर्षी निसर्गाच्या असमतोलामुळे पिकाच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम झाल्याचे दिसते आहे. लागवडीच्या सुरुवातीच्या काळात पावसाचा खंड, नंतर सतत पाऊस अशी स्थिती कायम होती.

कापूस पिकाला कमी पावसाची गरज असते. वाफसा नसल्यामुळे मशागतीची कामे करताना खूप अडचणी येत आहेत.

या वर्षी प्रथमच जून महिन्यातील जास्त तापमानामुळे पिकांत काही प्रमाणात पांढऱ्या मुळाची वाढ झालेली नाही. त्यामुळे झाडे प्रथम पिवळसर होऊन लाल झाली आहेत. हा परिणाम फक्त जूनच्या पहिल्या आठवड्यात लागवड केलेल्या शेतामध्येच दिसून आला आहे. इतर लागवडीमध्ये नाही. त्यासाठी ह्युमिक ॲसिड, १९ः१९ः१९ यांचे ड्रेचिंग केले.

सततच्या पावसामुळे बैलजोडीचलित अवजारांद्वारे मशागतीच्या कामांत अडचणी येत आहेत. शेतामध्ये तणांचा प्रादुर्भाव जास्त वाढला आहे. तणनियंत्रणासाठी रासायनिक तणनाशकांची फवारणी घेतली. तर काही प्रमाणात मोठे तण मजुरांद्वारे काढून घेतले.

पुढील आठवड्यात पुन्हा आवश्यकतेनुसार तणनियंत्रण केले जाईल. पाऊस आणि जमिनीतील वाफसा पाहून बैलजोडीचलित अवजार किंवा रासायनिक तणनाशकाचा वापर केला जाईल.

आगामी नियोजन

रासायनिक खताची दुसरी व शेवटची मात्रा देण्याचे नियोजन आहे. यामध्ये १०ः२६ः२६ हे खत ५० किलो, पोटॅश ३५ किलो, मॅग्नेशिअम ७ किलो प्रमाणे दिले जाईल.

पिकामध्ये रसशोषक किडींचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात दिसतो आहे. लवकर लागवड केलेल्या पिकामध्ये फुलकिड्यांचा प्रादुर्भाव काही प्रमाणात जाणवतो. तर उशिरा लागवडीतील पिकावर तुडतुड्यांचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यासाठी पिकाचे सातत्याने निरीक्षण करत आहे. योग्य निदान,

योग्य वेळ आणि नियंत्रणासाठी योग्य मात्रा या त्रिसूत्रीचा कीड नियंत्रणासाठी वापर करतो. त्याप्रमाणे सध्या तरी पिकावर फवारणीची आवश्यकता करण्याची गरज नसल्याचे दिसून येत आहे.

फुलकिड्यांचा प्रादुर्भाव जास्त वाढला, तर शिफारशीत रासायनिक कीटकनाशक आणि निंबोळी अर्काची फवारणी घेतली जाईल.

सध्या तरी पिकामध्ये डोमकळ्या अपवादात्मक दिसून येत आहेत. पिकाचे सतत निरीक्षण करून दिसलेल्या डोमकळ्या हाताने नष्ट करत आहे.

शेतामध्ये क्रायसोपा या मित्र कीटकाचे पतंग दिसून येत आहेत. याचा जैविक पद्धतीने कीड नियंत्रणासाठी नक्कीच फायदा होईल.

मिलीबगचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणार आहे.

मिश्रपीक पद्धती

यावर्षी कपाशी लागवडीतील काही क्षेत्रामध्ये मिश्र पीक म्हणून तूर लागवड केली. त्यानुसार दोन ओळी कपाशीच्या तर १ ओळ तूर पिकाची अशाप्रकारे लागवड केली आहे. कपाशी लागवडीत जंगली श्वापदांचा उपद्रवामुळे मोठे नुकसान होते. मिश्रपीक पद्धतीमुळे जंगली श्वापदांपासून होणारे नुकसान आणि बाजारातील अनिश्चिचता या बाबींमुळे एक पीक गेले तरी दुसऱ्या पिकापासून उत्पादन मिळते. त्यामुळे संभाव्य आर्थिक नुकसान काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते, असे गणेश नानोटे सांगतात.

- गणेश नानोटे,

९४२१८३२२९३

(शब्दांकन ः गोपाल हागे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com